30 April, 2020

हिंगोलीत चार नवीन कोरोना बाधीत रुग्ण


    जिल्ह्यात एकुण 20 कोरोना बाधीत रुग्ण ; सर्वांची प्रकृती स्थीर
-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास
हिंगोली दि.30: येथील राज्य राखीव बलातील मालेगाव बंदोबस्ताहून आलेल्या नवीन तीन जवानास कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्य राखीव बल, जालना येथील जवानाच्या संपर्कात आल्याने एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याने त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून, जिल्ह्यात आज चार नव्या कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे.
सद्यस्थितीत हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात कोविड-19 ची लागण झालेल्या हिंगोली व जालना येथील राज्य राखीव बलातील एकूण 16 जवान, तसेच जालना येथुन आपल्या गावी आलेल्या जवानाच्या संपर्कात आलेले 02 व्यक्ती, सेनगाव येथील क्वारंटाईन सेंटरमधील एक बालक, आणि बार्शी येथून वसमत येथे आलेला 1 व्यक्ती असे एकूण 20 रुग्णांना हिंगोली, वसमत आणि सेनगाव येथील आयसोलेशन वार्ड आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे. या सर्व रुग्णांवर तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत असुन, सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 1172 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी आज रोजी 773 रुग्ण भरती असून, 411 रुग्णांचा थ्रोट स्वॅब अहवाल प्रलंबीत आहे. तर 20 रुग्णांचा कोवीड-19 अहवाल हा पॉझिटीव्ह आला असून 737 व्यक्तींचा कोवीड-19 अहवाल हा निगेटीव्ह आला आहे. 395 रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीवास यांनी दिली आहे.
कोरोना विरुध्द लढ्यात हिंगोलीकरांनी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच सर्व नागरिकांनी अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 
****

No comments: