09 April, 2020

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि संगणक परिचालकांना 25 लाख रुपयांचे विमा संरक्षण -ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ



·   गावपातळीवरील कर्मचारी म्हणजे कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील सैनिकच
·   हिंगोली जिल्ह्यात कोरोना विरुध्दच्या लढाईत गावपातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात 1 हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम प्रदान

मुंबई,दि.9: कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणारे अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याबरोबरच आता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि आपले सरकार सेवा केंद्रातंर्गत काम करणारे केंद्र चालक (संगणक परिचालक) यांनाही 25 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतांबाबत घरोघरी जाऊन लोकांचे प्रबोधन करणे, संशयीत रुग्णांना मार्गदर्शन व मदत करणे यासाठी गावपातळीवरील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, संगणक परिचालक आदी सर्वजण अहोरात्र काम करीत आहेत. जीवाची जोखीम पत्करुन काम करणारे ग्रामीण पातळीवरील हे सर्व कर्मचारी म्हणजे कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील सैनिकच आहेत. केंद्र सरकारने कोरोना रोखण्यासाठी कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांचा 50 लाख रुपयांचा विमा उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात ग्रामीण भागात या कामात इतर ग्रामीण कर्मचारीही कार्यरत असल्याने राज्य शासनाने 31 मार्च रोजी परिपत्रक काढून गावपातळीवरील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांना 90 दिवसांकरीता 25 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा निर्णय अधिक व्यापक करुन यामध्ये ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि संगणक परिचालक यांचाही समावेश करण्यात आला असून आता त्यांनाही 90 दिवसांकरीता 25 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आह, असे त्यांनी सांगितले.
संगणक परिचालक हे कंत्राटी पद्धतीवर कार्यरत कर्मचारी आहेत. पण तरीही कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ते गावागावांमध्ये जीवाची जोखीम पत्करुन काम करीत आहेत. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी हे ही अहोरात्र काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने घेतला असल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. यासंदर्भात 31 मार्च, 2020 रोजीच्या परिपत्रकात दुरुस्ती करणारे शुद्धीपत्रक आज निर्गमित करण्यात आले आहे.
दरम्यान, 31 मार्च रोजीच्या परिपत्रकान्वये गावांमध्ये कोरोना रोखण्यासाठी कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांना त्यांच्या नियमीत वेतनाव्यतिरिक्त 1 हजार रुपये अतिरिक्त रक्कम देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून, त्यासंदर्भात सर्व जिल्हा परिषदांना सूचना पाठविण्यात आल्या आहेत. लवकरच हे मानधन या कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
ग्रामविकास विभागाच्या 31 मार्च, 2020 रोजीच्या परिपत्रकातील निर्देशाप्रमाणे गट ग्रामपंचायत जामठी बु. गोंधनखेडा ता. सेनगाव, जिल्हा हिंगोलीच्या वतीने आज कोरोना विरुध्दच्या लढाईत गावपातळीवर काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी  मदतनीस आणि आशा कार्यकर्ती यांना प्रातिनिधीक स्वरुपात रू. 1,000/- प्रोत्साहनपर रक्कम सामाजिक अंतर  ठेवून प्रदान करण्यात आली. 
****

No comments: