07 April, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बँक व पोस्ट ऑफीसकरीता प्रतिबंधात्मक आदेश जारी




हिंगोली,दि.07:  जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोवीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात तसेच महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजी पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्‍याबाबतची नियमावली तयार करण्‍यात आलेली आहे. त्‍याशिवाय भारत सरकार आरोग्‍य मंत्रालय, महाराष्‍ट्र शासन आरोग्‍य मंत्रालय यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्‍णांच्या संपर्कात नागरिकांनी येवू नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तींनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे इत्यादी बाबीमुळे विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्व सामाय जनतेस व त्यांच्या आरोग्यास धोका होत असल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 खालील तरतुदींच्‍या अनुषंगाने जनतेस, खालील व्‍यक्‍ती, आस्‍थापना यांना उद्देशून आदेश काढण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया सं‍हिता 1973 चे कलम 144 जमावबंदी आदेश लागू केले आहेत.
कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणुन सर्व बँकामध्ये गर्दी व विविध लोकांनी हाताळलेले पासबुक  व चलनी नोटा यामुळे कोरोना विषाणुचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरीता हिंगोली जिल्ह्यातील सर्व बँक आणि पोस्ट ऑफिस यांना खालील सूचना देवून त्याचे पालन करणे बाबत आदेशित करण्यात येत आहे.   
या आदेशान्वये (1) नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच बँक – पोस्ट ऑफिस मध्ये जावे. (2) सर्दी,ताप,खोकला इत्यादीचा त्रास असलेल्या ग्राहकांनी बँकेत येणे टाळावे. (3) मुख्य प्रवेशद्वारावर गार्ड नेमण्यात यावा तसेच शाखेमध्ये एका वेळेस फक्त 4 ग्राहकांना प्रवेश दिला जाईल. (4) पोस्ट व बँकामध्ये येणा-या ग्राहकांची एका काऊंटरवर एका वेळी एकच  ग्राहक हजर राहील याची दक्षता घ्यावी. (5) ग्राहकांनी बँकेच्या काऊंटर पासून 3 ते 5 फुटांचे अंतर ठेवावे. (6) सर्व बँका सकाळी 10.00 ते 02.00 पर्यंत रोखीचे व्यवहार करु शकतील. (7) बँक फक्त रोख पैसे देणे व पैसे जमा करुन देणे व पैसे पाठविणे व मागविणे हे काम करु शकतील. (8) कर्ज विषयक कामे बंद राहतील. (9) सर्व ग्राहकांनी दिनांक 14 एप्रिल, 2020 पर्यंत आर्थीक व्यवहाराशी संबंधीत नसलेल्या बाबीसाठी जसे की, शिल्लक रक्कम चौकशी, केवायसी अद्यावतीकरण, आधार कार्ड व पॅन कार्ड संलग्नीकरण, बँक खाते अद्यावतीकरण, बँक स्टेटमेंट, पासबुक प्रिंटींग इत्यादी व इतर यासाठी बँकेत येवू नये. (10) पोस्ट ऑफीस व बँकेच्या एटीएम मध्ये एका वेळी एकच ग्राहक प्रवेश करेल व उर्वरीत ग्राहकांना 02 ते 03 फुट अंतरावर थांबण्यास सांगावे, एटीएम मशीनचे दरवाजे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. (11) सर्व बँकांनी आप-आपल्या शाखेतील एटीएम, कॅश, चेक, डिपॉजिट मशिन, पासबुक, प्रिंटर्स व शाखेतील उपकरणे याच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी. (12) बँकेमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांना हात धुन्याच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्यात यावी. (13) बँक इमारत  व परिसरामध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्यात यावी. (14) सर्व ग्राहकांनी बँकेच्या इतर वितरण पर्यायांचा उदा. इंटरनेट बँकीग, मोबाईल बँकींग, युपीआय, एटीएम, कॅश डिपॉझिट मशिन इ. सुविधांचा जास्तीत-जास्त वापर करणेबाबत बँकानी नागरीकांना प्रेरित करावे. (15) सर्व शाखा आपल्या कर्मचाऱ्यांच्या किमान उप‍स्थिती संबंधी योजना करुन ग्राहकांना सेवाप्रदान करतील. एक अधिकारी असलेल्या शाखांच्या कामकाजांच्या संदर्भात बँक सुचित करतील अशा शाखा आवश्यकता असल्यास एक दिवस आड काम करतील.
आदेशात विहित करण्यात आलेल्या निर्बंधाची किंवा आदेशाची अवज्ञा करणाऱ्या व्यक्तीस भारतीय दंड सहिता (1860 चा 45) याच्या कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल. तसेच संबंधीतावर कार्यवाही करण्यात येईल याची जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

****

No comments: