30 May, 2022

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त 31 मे रोजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार निवडक लाभार्थ्यांशी संवाद

 

            हिंगोली (जिमाका), दि. 30 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मंगळवार, 31 मे 2022 रोजी सकाळी 10.15 ते 10.50 या वेळेत राज्य आणि जिल्हा कार्यक्रमांच्या स्वरुपात तर सकाळी 11 ते दुपारी 12.10 या कालावधीत सिमला (हिमाचल प्रदेश) येथून केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहाऐवजी जिल्हा परिषदेच्या डीआरडीए सभागृहातून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

पंतप्रधान श्री.मोदी यांचा परिसंवाद कार्यक्रम दोन भागांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. संवादाचा पहिला भाग राज्य आणि जिल्हा कार्यक्रमांच्या स्वरुपात सकाळी 10.15 वाजता सुरु होईल आणि सकाळी 10:50 वाजता समारोप होणार आहे.

            संवादाच्या दुसऱ्या भागात राज्य आणि जिल्हा स्तरावरील कार्यक्रम शिमला येथील राष्ट्रीय कार्यक्रमाशी जोडला जाणार असून पंतप्रधान श्री.मोदी हे निवड केलेल्या योजनांच्या जिल्ह्यांसोबत निवडक लाभार्थ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत.

            या राष्ट्रीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन आणि इतर राष्ट्रीय स्तरावरील चॅनेलवर केले जाणार असून युट्यूब आणि NIC चॅनलद्वारे वेबकास्ट देखील केले जाणार आहे.

            जास्तीत जास्त नागरिकांनी  या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

******

No comments: