10 May, 2022

 

‘जनता दरबार मधील प्राप्त तक्रारींचा पालकमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड यांच्याकडून आढावा’

 

जिल्ह्यातील सिंचन अनुशेषाकडे लक्ष घालण्याच्या

पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

 



            हिंगोली (जिमाका), दि. 10 : जिल्ह्यातील हिंगोली आणि सेनगांव तालुक्यासाठी प्रामुख्याने सिंचन प्रश्नावर लक्ष द्यावे आणि जलसिंचन विभागाच्या संबंधित यंत्रणा प्रमुखांनी तांत्रिक बाबी समजून घेवून जिल्ह्यातील सिंचन अनुशेष भरुन काढावा. तसेच यासाठी  लागणाऱ्या निधी मागणी साठी प्रस्ताव तात्काळ शासनास सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी दिल्या.

मराठवाडा जनता विकास परिषद, हिंगोली यांचे दि. 01 मे, 2022 रोजी पत्राद्वारे मांडण्यात आलेले विषय तसेच हिंगोली येथील घेण्यात आलेल्या जनता दरबारात प्राप्त  झालेल्या तक्रांरींचा आढावा आज ऑनलाईन झूम प्रणालीद्वारे  पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार,  निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, तहसीलदार नवनाथ वगवाड, शिक्षणाधिकारी (प्रा.) संदिपकुमार सोनटक्के, जिल्हा क्रीडा अधिकारी,  नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे, मराठवाडा जनता विकास परिषदेचे सदस्य राकेश भट्ट यांची उपस्थित होती.

यावेळी पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड पुढे म्हणाल्या की, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली व सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जलसिंचनाच्या प्रश्नावर संबंधित यंत्रणेनी तांत्रिक बाब तपासून त्याबाबतचा प्रस्ताव तयार करुन त्वरीत पाठवावा. तसेच हिंगोली शहरातील जलेश्वर तलाव व चिरागशहा दर्गा शुशोभीकरणासाठी लागणाऱ्या निधीबाबत पाठपूरावा करावा तसेच त्यासाठी अगोदर डिपीआर (DPR) मंजूर करुन घ्यावा.  जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे बांधकाम 15 दिवसात पूर्ण करुन त्यात पाणी उपलब्धतेचे नियोजन करुन जलतरण तलाव लवकरात लवकर सुरु करावे. हिंगोली तालुका क्रीडा संकुलासाठी निधी उपलब्धतेसाठी प्रस्ताव तयार करुन सादर करण्याच्या सूचना दिल्या.

या बैठकीत पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी हिंगोली व सेनगाव तालुका सिंचन प्रश्न, कयाधू नदीवरील बंधारा, हिंगोली शहरातील जलेश्वर तलाव व चिरागशहा दर्गा शुशोभीकरण, खाजगी माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रलंबित वेतन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हिंगोली येथील भूखंड वाटप विषय, जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचा विषय, तसेच तालुका क्रीडा संकुलास लागणारा निधी  इत्यादी विषयावर आढावा घेण्यात आला.

यावेळी मराठवाडा जनता विकास परिषद, हिंगोली  चे सदस्य राकेश भट्ट यांनी मुंबईसाठी रेल्वे सुरु करण्याबाबत, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत 20 टक्के निधी जिल्ह्यातील सिंचनासाठी राखीव ठेवण्याबाबत पालकमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांना  विनंती केली.

*****

No comments: