01 May, 2022

 

पंचायत राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून तळागाळातील जनतेला न्याय देण्याचे काम करावे

                                                                - पालकमंत्री वर्षाताई गायकवाड

 


हिंगोली, (जिमाका) दि. 01 : महाराष्ट्र दिन आणि जिल्हा परिषदेचा हिरक महोत्सव एकाच वेळी साजरा होत आहे. हा दुग्धशर्करा योग आहे. ग्रामीण भागात विकासाची गंगा आणण्यासाठी व पंचायत राज व्यवस्था मजबूत करण्यासाठी 1962 साली त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थाची निर्मिती केली आहे. या माध्यमातून तळागाळातील जनतेची सामाजिक कामे करुन जनतेला न्याय देण्याचे काम करावे, असे आवाहन पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केले.

येथील जिल्हा परिषदेच्या षटकोनी सभागृहात आज पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक स्वराज्य संस्थेला 60 वर्षे पूर्ण झाल्यामुळे हिरक महोत्सव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार विप्लव बाजोरिया, माजी आमदार संतोष टारफे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल राठोड यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या, पंचायराज व्यवस्थेमुळे सर्व स्तरातील घटकांना सत्तेत सहभागी होता आले. मागासलेल्या समाजाला, महिलांना या माध्यमातून लाल दिव्याच्या गाडीपर्यंत पोहोचण्याचे काम झाले आहे. या माध्यमातून सर्वात शेवटच्या स्तरापर्यंत शिक्षण, आरोग्य, विविध योजनांचा लाभ मिळवून देता आला आहे.  यास 60 वर्षे पूर्ण होत असल्याने आपण हिरक महोत्सव साजरा करीत आहोत. या त्रिस्तरीय व्यवस्थेमुळे मागास समाजातील तसेच महिलांना प्रतिनिधीत्व मिळत असल्यामुळे जवळून काम करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा चांगल्या प्रकारे वापर करुन येणाऱ्या काळातील आव्हाने समजून घेऊन काम केले पाहिजे. पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून चांगले काम व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन या हिरक महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एल. बोंद्रे यांनी केले, यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे यांनीही मनोगत व्यक्त केले. तर आभार शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी मानले.

यावेळी विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

****

No comments: