10 May, 2022

 

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त विविध उपक्रमाद्वारे जनजागृती

डेंग्यू आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 10 :  राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राज्यात दि. 16 मे, 2022 रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात येतो. या राष्ट्रीय डेंग्यू दिनाविषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाद्वारे नागरिकामार्फत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करणे हा मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र डेंग्यू दिवस साजरा करण्यात येतो.

राज्यात तापाच्या साथीमध्ये प्रामुख्याने डेंगीच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. सध्या उन्हाळा सुरु आहे. राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाण्याचा तुटवडा असल्याने पाणी पुरवठा पुरेशा प्रमाणात न झाल्याने लोकाची पाणी साठवण्याची प्रवृत्ती आढळून येणे नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने अशा साठवलेल्या पाण्यात एडीस एजिप्टाय डास अंडी घालून डासोत्पत्ती होते. या डासाची उत्पत्ती कमी करणे, नियंत्रणात ठेवणे यासाठी जनतेस आरोग्य शिक्षण देणे आवश्यक आहे. यासाठी जनतेच्या सहभागाशिवाय या आजाराचे नियंत्रण शक्य नाही.

केंद्र शासनाने डेंग्यू विषयावर इंडिया फाईट डेंग्यू (India Fights Dengu) हे मोबाईल ॲप्लीकेशन तयार केलेले आहे. त्याचप्रमाणे अँड्राइड मोबाईलवर प्ले स्टोअर (Play Store) मध्ये जाऊन  इंडिया फाईट डेंग्यू (India Fights Dengu) हे ॲप शोधावे व मोबाईलवर ते डाऊनलोड करुन घ्यावे. यामध्ये डेंग्यू विषयी सर्व माहिती उपलब्ध आहे.

हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय डेंग्यू दिन यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक यांचा लोकसहभाग घेऊन गावपातळीवर सदरील राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात येणार आहे.  

यामध्ये पत्रकार परिषद, खाजगी वैद्यकीय व्यवसायिक सभा, जलद ताप रुग्ण सर्वेक्षण, तालुकास्तरावर सभा, सर्व स्तरावर रॅलीचे आयोजन, ग्रामसभेचे आयोजन, बाजाराच्या ठिकाणी प्रदर्शनाचे आयोजन, हस्तपत्रिका वाटप, आशा बळकटीकरणासाठी कार्यशाळेचे आयोजन, कंटेनर सर्वेक्षण, सर्व स्तरावर स्वच्छता माहिमेचे आयोजने, दिंडीचे आयोजन, डासोत्पत्ती स्थानात गप्पीमासे सोडण्याचा धडक कार्यक्रम सर्व स्तरावरील अधिकाऱ्यांनी फवारणी कार्यक्रमाचे पर्यवेक्षण व एक दिवस कोरडा पाळणे या विषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

डेंग्यू, चिकुनगुनिया बाबतची लक्षणे : एडीस एजिप्टाय डासाच्या संक्रमणात्मक चाव्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर डेंग्यूची लागण होते. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक हा ताप अधिक तीव्र स्वरुपाचा असून त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो. लहान मुलांमध्ये शक्यतो सौम्य स्वरुपाचा ताप येतो. मोठ्या माणसामध्ये अधिक तीव्रपणे ताप, सोबत डोके, डोळे दुखणे, अंगदुखी, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. यावर सर्व शासकीय रुग्णालयात मोफत उपचार होतो.

उपाययोजना : डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार हा एडीस एजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी 8 दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालून अंड्याचे रुपांतर डासात होते. त्याअनुषंगाने कोणतेही साठवलेले पाणी 8 दिवसापेक्षा जास्त ठेवू नये ही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. डासोत्पती नियंत्रणासाठी गप्पी माशांची उपयुक्तता, परिसर स्वच्छता, व्यक्तीगत सुरक्षेअंतर्गत मच्छरदाण्यांचा वापर, डासांच्या चाव्यापासून रक्षणासाठी इत्यादी विविध उपाययोजना कराव्यात.

कोरडा दिवस पाळून किटकजन्य आजार डेंग्यू, चिकुनगुनिया आजारावर नियंत्रण ठेवण्यास जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा हिवताप अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: