25 May, 2022

 

रासायनिक खताची एमआरपीपेक्षा जास्त किंमत सांगणाऱ्या

कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबित

 

            हिंगोली (जिमाका), दि. 25 : सद्यस्थितीत जिल्ह्यात खरीप हंगाम-2022 ची पूर्वतयारी सुरु असून खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे, खते, किटकनाशके यांची बाजारात उपलब्धता झालेली आहे. शेतकऱ्यांकडून हंगामासाठी लागणाऱ्या निविष्ठांची खरेदी सुरु आहे. मागील काही दिवसात समाज माध्यमावर जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्र चालक शेतकऱ्यांना रासायनिक खताची विक्री करतांना खताच्या एमआरपीपेक्षा अधिक दर सांगत असल्याची तसेच खतासोबत अन्य निविष्ठा खरेदी करण्याची सक्ती करत असल्याचे व्हिडिओ क्लीप, बातम्या आढळून आल्या होत्या. या बातम्यांची दखल घेऊन कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कृषि सेवा केंद्राची तपासणी केली असता तपासणी अहवालात आढळून आलेल्या त्रुटींच्या आधारे परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी जिल्ह्यातील कनेरगाव नाका येथील प्रगती कृषि केंद्र , शेतकरी कृषि केंद्र, ठाकरे कृषि केंद्र या तीन कृषि केंद्राचे रासायनिक खत किरकोळ विक्रीचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.   

            तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी कृषि निविष्ठांची खरेदी करताना अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करावी. निविष्ठा खरेदीचे पक्के बील विक्रेत्याकडून घ्यावेत. खते खरेदी करताना आधारकार्ड घेऊन जावे. एमआरपी पेक्षा जास्त दराने कोणत्याही कृषि निविष्ठांची खरेदी करु नये. खरेदी केलेल्या बियाण्याचे रिकामी पिशवी, टॅग, खरेदीची पावती, त्यातील थोडे बियाणे जतन करुन ठेवावे. तसेच कृषि निविष्ठासंदर्भातील आपल्या तक्रारी, समस्याबाबत 9527494578 या क्रमांकाशी तसेच कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी एस.ए.घोरपडे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी एन.आर.कानवडे यांनी केले आहे.

******

No comments: