27 February, 2026

 "हिंद दी चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त भव्य नगर कीर्तन


सीबीडी बेलापूर ते ओवे मैदानापर्यंतचा परिसर भक्तीमय वातावरणात निघाला न्हावून


'बोले सो निहाल'चा जयघोषाने दुमदुमले खारघर 


   नवी मुंबई, दि.27(विमाका) : 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या महान शहिदी समागम सोहळ्यानिमित्त खारघर नगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली. 'बोले सो निहाल... सत श्री अकाल' चा गगनभेदी जयघोष आणि या सोहळ्यात संत, भाविक, लोकप्रतिनिधी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांचा ओसंडून वाहणारा उत्साह... अशा पवित्र आणि मंगलमय वातावरणात आज भव्य 'नगर कीर्तन' सोहळा पार पडला.

      या ऐतिहासिक नगर कीर्तनाला आज (दि.27) सायंकाळी 5.00 वाजता गुरुद्वारा श्री गुरुसिंह सभा, सीबीडी बेलापूर येथून प्रारंभ झाला. यानंतर डी.वाय.पाटील चौक बेलापूर, आरबीआय कॉलनी चौक, बेलपाडा मेट्रो, खारघर रेल्वे स्टेशन चौक, उत्सव चौक, ग्राम विकास चौक, गुरुद्वारा श्री गुरुसिंह सभा, खारघर येथून समागम स्थळ ओवे खारघर येथे या नगर किर्तनाचा समारोप करण्यात आला. हे किर्तन केवळ एक शोभा यात्रा नाही तर गुरुसाहेबांच्या त्याग, सहास, धर्म रक्षा आणि मानवतेचा संदेश सर्व जनतेपर्यंत पोहोचविण्याचा माध्यम आहे. 

    सुशोभित आणि भव्य रथामध्ये श्री गुरु ग्रंथ साहिबजी विराजमान होते. या पवित्र पालखीमध्ये भाई कश्मीर सिंघ जी यांनी पवित्र सेवा अत्यंत भक्तीभावाने केली.

   कलगीधर दशमेश पित्याच्या छत्र छायाखाली, शब्द किर्तन आणि सेवेच्या सहवासात ही अलौकिक यात्रा आपल्या एकता, बंधुभाव आणि अध्यात्मिक जागृतीकडे घेवून जाणार आहे, असा विश्वास या नगर किर्तनातून मिळाला. धार्मिक कीर्तन, गुरु वाणीचे पठण आणि शिस्तबद्ध मिरवणुकीमुळे परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. विविध समाजघटक, स्वयंसेवक तसेच स्थानिक नागरिकांनी नगर कीर्तनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

      या नगर कीर्तनात शीख धर्माची परंपरा आणि महाराष्ट्राची लोकधारा यांचा संगम पाहायला मिळाला. मिरवणुकीच्या अग्रभागी शीख तरुणांची थरारक 'गतका' प्रात्यक्षिके लक्ष वेधून घेत होती, तर हजारो शालेय विद्यार्थिनींनी सादर केलेले 'लेझीम' नृत्य आणि ढोल-ताशांचा गजर वातावरणात उत्साह भरत होता. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी हातात 'मानवता की सच्ची मिसाल' आणि 'हिंद दी चादर' असे फलक घेऊन सामाजिक संदेश दिला.

      या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहिदी समागम समितीचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक, कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) विजयकुमार म्हसाळ, रायगड उपजिल्हाधिकारी व नवी मुंबई समागम समन्वय अधिकारी रविंद्र राठोड, कोकण प्रांत प्रमुख महेंद्र रायचुरा, नवी मुंबई गुरुद्वाराचे अध्यक्ष जसपाल सिंग सिध्दू, खारघर गुरुद्वाराचे अध्यक्ष परमजित सिंग बल, महाराष्ट्र राज्य शीख समितीचे चरणदिप सिंह (हॅपी सिंग), हिंद दी चादर कार्यक्रमाचे नवी मुंबई सचिव सुखविंदर धिल्लन आदींसह लोकप्रतिनिधी यांनी विशेष उपस्थिती लावून गुरुचरणी नतमस्तक होत कीर्तनात सहभाग नोंदवला. 

    यावेळी शीख, मोहयाल, बंजारा, सिकलीगर, लबाना, सिंधी, वाल्मिकी, उदासीन तसेच भगत नामदेव संपद्राय या विविध समाज्याचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर भाविकांनी गुरुंच्या शहादतीचे स्मरण करत देशाच्या एकात्मतेचा आणि धार्मिक सहिष्णुतेचा संदेश दिला. संपूर्ण आयोजनात प्रशासनाने वाहतूक, सुरक्षा आणि इतर सुविधांची योग्य व्यवस्था केल्यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला.

     हा समागम पुढील दोन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांनी रंगणार असून, मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

       शालेय विद्यार्थ्यांकडून स्वागत

 रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हजारो शालेय विद्यार्थ्यांनी रांगा लावून शिस्तीत उभे राहत रथाचे भव्य स्वागत केले आणि गुरु ग्रंथ साहिबजींचे दर्शन घेतले.विद्यार्थ्यांनी केलेली फुलांची उधळण आणि त्यांचा उत्साह पाहून उपस्थित भारावून गेले. या संपूर्ण मार्गावर खारघरवासियांनी आपल्या घरांसमोर सडा-रांगोळी काढून नगर कीर्तनाचे जंगी स्वागत केले.

000000






No comments: