*लाखो भाविकांनी घेतला लंगर सेवेचा लाभ*
नवी मुंबई, दि. २८ : “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर, नवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात भाविकांसाठी भव्य लंगरची व्यवस्था करण्यात आली आहे. लाखो भाविक या लंगर सेवेचा लाभ घेत असून संपूर्ण परिसर सेवाभाव आणि समतेच्या संदेशाने भारावून गेला आहे. आज पहिल्या दिवशी अंदाजे दोन लाखांपेक्षा अधिक भाविक लंगर सेवेचा लाभ घेतील अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
कार्यक्रमस्थळी सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड लंगर व्यवस्था सुरू असून सर्व धर्मीय भाविकांना भोजन दिले जात आहे. संपूर्ण परिसरात आठ ठिकाणी लंगर सुरू असून एका वेळेस एका लंगर मध्ये सुमारे दोन ते अडीच हजार भाविकांना एकत्रितपणे भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत अखंडपणे भोजन व्यवस्था सुरू असून स्वयंसेवक आणि सेवाभावी संस्थांच्या मदतीने वाढप, स्वच्छता व व्यवस्थापन सुरळीत पार पडत आहे.
स्वयंसेवक, सेवाभावी संस्था आणि गुरुद्वारातील सेवादार यांच्या संयुक्त प्रयत्नातून अन्न तयार करणे, वाढप, स्वच्छता आणि व्यवस्थापनाची चोख जबाबदारी पार पाडली जात आहे.
लंगरमध्ये पारंपरिक पद्धतीने रोटी, भाजी, डाळ, भात तसेच गोड पदार्थांची व्यवस्था करण्यात आली आहे. हजारो स्वयंसेवक सेवेत सहभागी झाले असून ‘सेवा’ हीच खरी श्रद्धा असल्याचा संदेश या माध्यमातून दिला जात आहे.
या समागमात गुरु ग्रंथ साहिब यांच्या पावन उपस्थितीत कीर्तन सुरू असून “वाहे गुरु” व “बोले सो निहाल सत श्री अकाल” च्या जयघोषात भाविक दर्शन व लंगर सेवेचा लाभ घेत आहेत.
लंगर ही केवळ भोजन व्यवस्था नसून समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारी परंपरा आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग आणि धर्मनिष्ठेच्या स्मरणार्थ आयोजित या कार्यक्रमातून समाजात एकात्मतेचा संदेश दिला जात आहे.
00000


No comments:
Post a Comment