नवी मुंबई,दि.१: हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर, नवी मुंबई येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रमासाठी लाखो भाविक उपस्थित राहणार असल्याने नियोजन अत्यंत बारकाईने करण्यात आले आहे.
या नियोजनाचा एक अत्यंत भावनिक आणि आध्यात्मिक भाग म्हणजे कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेले ‘जुता घर’ भाविकांची पादत्राणे, बूट व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रवेशद्वाराजवळच डाव्या आणि उजव्या बाजूस उभारण्यात आलेले हे जुता घर चार विभागांत विभागलेले असून त्याची क्षमता जवळपास दहा हजार पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था येथे करण्यात आली आहे.
प्रत्येक विभागनिहाय नियोजनासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करून शिस्तबद्ध सेवा सुनिश्चित करण्यात आली आहे.परंतु हे केवळ पादत्राणे ठेवण्याचे ठिकाण नाही…
हे आहे अहंकारातून अहं-शून्यतेकडे नेणाऱ्या प्रवासाची सुरुवात.
माणसातला अहंकार कमी करण्याच्या भावनेतून अनेक भाविक स्वतःहून येथे सेवा देतात. इतरांची पादत्राणे नीट लावणे, त्यांची काळजी घेणे, हरवू नयेत म्हणून दक्ष राहणे—ही केवळ व्यवस्था नाही; ही नम्रतेची साधना आहे. सेवेतून आत्मिक समाधान मिळते, आणि ‘मी’पणाचा अंश हळूहळू विरघळत जातो.
मलाड, नेरुळ तसेच गुरु तेज बहादूर नगर येथील सेवक जत्थे या जुता घरात अहोरात्र सेवा बजावत आहेत. हजारो भाविकांच्या ये-जा मध्येही त्यांच्या चेहऱ्यावर समाधान, डोळ्यांत भक्ती आणि मनात समर्पण दिसून येते.
या सेवेमुळे कार्यक्रमस्थळावर शिस्त, स्वच्छता आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिथे पादत्राणे काढली जातात, तिथेच अहंकारही उतरवला जातो आणि खरी भक्ती तेव्हाच सुरू होते.
०००००००

No comments:
Post a Comment