“क्षयरोग
मुक्त जिल्हा” अभियानाला गती; 304 ग्रामपंचायतींचा गौरव, 100 टक्के उद्दिष्टाचा
संकल्प
येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात
सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत अभियान स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव जिल्हाधिकारी राहुल
गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड,
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता
डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
कैलास शेळके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी
भाकरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की,
क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असला तरी तो पूर्णपणे प्रतिबंधित व उपचारयोग्य आहे. शासनामार्फत
यासाठी प्रभावी उपचार सुविधा उपलब्ध असून, वेळेत निदान व उपचार घेतल्यास रुग्ण पूर्णपणे
बरा होऊ शकतो. जिल्ह्यातील 304 ग्रामपंचायतींनी क्षयरोग मुक्ततेची घोषणा केल्याबद्दल
त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
क्षयरोगाची लक्षणे दिसल्यास त्वरित आरोग्य
केंद्रात तपासणी करणे, संशयित रुग्णांची लवकर ओळख करून त्यांना उपचाराशी जोडणे अत्यंत
महत्त्वाचे आहे. तसेच रुग्णांनी किमान सहा महिन्यांचा उपचार पूर्ण करणे आवश्यक असून,
उपचार अर्धवट सोडल्यास औषध-प्रतिरोधक क्षयरोगाचा धोका वाढतो. त्यामुळे ग्रामपंचायती,
आशा कार्यकर्त्या व आरोग्य कर्मचारी यांनी रुग्णांच्या उपचार प्रक्रियेवर सातत्याने
लक्ष ठेवावे, असे निर्देश त्यांनी दिले.
गावपातळीवर ग्रामसभांद्वारे जनजागृती,
संशयित रुग्णांची माहिती तात्काळ आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचविणे व रुग्णांना सामाजिक
आधार देणे यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले. क्षयरोग रुग्णांबाबत भेदभाव न करता
त्यांना सहकार्य करणे ही समाजाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या जिल्ह्यातील 304 ग्रामपंचायतींपैकी
सुमारे 40 ते 45 टक्के प्रगती क्षयरोग मुक्ततेकडे झाली असून, चालू वर्षात 100 टक्के
उद्दिष्ट पूर्ण करून संपूर्ण जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक
गायकवाड यांनी सांगितले की, संपूर्ण भारतात 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत
‘क्षयरोग मुक्त भारत’ अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक गाव क्षयरोगमुक्त करण्यासाठी
प्रभावी प्रतिबंध, लवकर निदान व नियमित उपचार यावर भर देणे आवश्यक आहे. “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” मोहिमेत जिल्ह्याने राज्यस्तरावर प्रथम
क्रमांक मिळवावा, असेही त्यांनी नमूद केले.
राज्यस्तरावर 5 कोटी रुपयांच्या पारितोषिकाचे
लक्ष्य गाठण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. अभियानात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना
पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
माझं गाव आरोग्य संपन्न गाव" अभियान
जिल्ह्यात 1 एप्रिल पासून राबविण्यात येणार आहे
आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली माझं गाव आरोग्य संपन्न
गाव" अभियान बाबत जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य
विभागामार्फत राज्यातील नागरिकांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी आणि निरोगी समाज निर्मितीसाठी
'माझे गाव आरोग्य संपन्न गाव' हे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात येत आहे. हिंगोली
जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक
गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
'माझां गाव, आरोग्य संपन्न गाव' जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या नियोजनानुसार,
१ एप्रिल २०२६ पासून संपूर्ण जिल्ह्यात या अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात होणार
आहे. १ एप्रिलला विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये
'विशेष आरोग्य ग्रामसभा' आयोजित करण्याचे निर्देश
देण्यात आले आहेत.
ग्रामस्थांना अभियानाच्या उद्दिष्टांची
सविस्तर माहिती दिली जाईल. आरोग्य, स्वच्छता आणि शुद्ध पाणीपुरवठा या विषयांवर चर्चा
करून ग्रामस्थांची भूमिका स्पष्ट केली जाईल. लोकसहभागातून गाव 'आरोग्य संपन्न' करण्यासाठी
सामूहिक संकल्प केला जाईल.
अभियानाचे स्वरूप व पुरस्कार
ग्रामपंचायत यांना राज्यस्तरावर पुरस्कार
रक्कम प्रथम 5 कोटी रुपये, द्वितीय 3 कोटी रुपये, तृतीय 2 कोटी रुपये विभाग स्तरावर
प्रथम 1 कोटी रुपये, द्वितीय 75 लाख रुपये, तृतीय 50 लाख रुपये आणि जिल्हास्तर प्रथम 25 लाख रुपये द्वितीय 20 लाख रुपये
तृतीय 15 लाख रुपये, आरोग्य उपकेंद्र यांना राज्यस्तरावर पुरस्कार रक्कम प्रथम 25 लाख
तर जिल्हास्तरावर प्रथम 5 लाख रुपये, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना राज्यस्तरावर पुरस्कार
रक्कम प्रथम 50 लाख तर जिल्हास्तरावर प्रथम 10 लाख रुपये ग्रामीण रुग्णालय राज्यस्तरावर
पुरस्कार रक्कम प्रथम 75 लाख रुपये असे असणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य
कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
पुरस्कार मिळाल्याबद्दल आरोग्य विभागाकडून दोन्ही अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
सुधीर ठोंबरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” मोहिमेबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजन
व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. क्षयरोग मुक्त ग्रामपंचायतींना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह
देऊन गौरविण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा जिल्हा निर्देशांकात प्राविण्य
मिळविल्याबद्दल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा सेवाकर्मी पुरस्काराबद्दल
सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास संबंधित गावांचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा कार्यकर्त्या तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. अभिजित बांगर व बालाजी उबाळे यांनी तर आभार राजेश्वर पुंडगे यांनी मानले.
*******
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment