01 March, 2026

बदलत्या सामाजिक परिस्थितीत सार्वजनिक ग्रंथालयांची भूमिका अत्यंत महत्त्वाची * परिसंवादात मान्यवर वक्त्यांचा सूर

 






हिंगोली (जिमाका), दि. 01 :  बदलत्या सामाजिक परिस्थितीत सार्वजनिक ग्रंथालयांची भूमिका अत्यंत महत्वाचे असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी परिसंवादातून व्यक्त केला.

येथील कै. रं. रा. बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयाच्या प्रांगणात आयोजित हिंगोली ग्रंथोत्सव–2025 अंतर्गत दुसऱ्या दिवशी “बदलती सामाजिक परिस्थिती आणि सार्वजनिक ग्रंथालयांची भूमिका” या विषयावर व्याख्यान उत्साहात पार पडले. या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी अशोक अर्धापूरकर होते.

या प्रसंगी प्रा. डॉ. विलास खरात यांनी बदलत्या सामाजिक परिस्थितीत ग्रंथालयांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा, विशेषतः एआयचा वापर करून सेवा अधिक प्रभावी व गतिमान करण्याची गरज अधोरेखित केली. भविष्यात ग्रंथालय व्यवस्थापन आणि माहिती सेवा अधिक सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाची सांगड घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तर गजानन शिंदे यांनी सार्वजनिक ग्रंथालये ही केवळ पुस्तकांचे भांडार नसून ती माहितीची केंद्रे बनली पाहिजेत, असे मत व्यक्त केले. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एनपीएसएससारखे उपयुक्त ग्रंथ उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी बोलताना विजय जयस्वाल यांनी बालकांच्या सर्वांगीण विकासात ग्रंथालयांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. बालपणापासून वाचनाची सवय लावल्यास सामाजिक व सांस्कृतिक जडणघडण अधिक सक्षम होते. यासाठी बालसाहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. तर  कल्याण वसेकर यांनी माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माहितीची सत्यता व विश्वसनीयता पडताळणे आवश्यक असल्याचे सांगितले. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस एकाकी होत चालला असून सार्वजनिक ग्रंथालये ही लोकसंस्काराची केंद्रे ठरत आहेत. कोणताही भेदभाव न करता सर्वांसाठी ज्ञानाची दारे खुली करणारी ही ग्रंथालये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वरदान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाचन संस्कृती ही व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली असून सखोल विचार आणि विवेक निर्माण करण्याचे कार्य ग्रंथालये करतात, असेही त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय समारोप करताना अशोक अर्धापूरकर यांनी सार्वजनिक ग्रंथालयांनी विद्यार्थ्यांपर्यंत घरपोच सेवा पोहोचवून वाचनाची गोडी निर्माण करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांना सभासद करून घेत त्यांच्या घरापर्यंत पुस्तके उपलब्ध करून देण्यावर भर देत, ग्रंथालयांनी ज्ञानाचा नवा सूर्योदय घडवावा, असे ते म्हणाले. बदलत्या साहित्यिक प्रवाहांचा विचार करून युवक व तरुण पिढीत वाचनाची आवड निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राधिका देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती पारिजात देशमुख यांनी मानले. या व्याख्यानास जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयांचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, शिक्षक, विद्यार्थी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

********

No comments: