14 March, 2026

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त आध्यात्मिक मानवंदना


 “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” कार्यक्रम हिंगोली येथे आयोजन 



   हिंगोली, दि. १७ मार्च – महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेतील तेजस्वी संत व्यक्तिमत्त्व असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध आध्यात्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” हा विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मंगळवार, दिनांक १७ मार्च २०२६ रोजी सायं. ६.०० वाजता शिवाजी देशमुख सभागृह, हिंगोली येथे आयोजित करण्यात आला आहे.

   संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी, भावार्थदीपिका यांसारख्या ग्रंथांद्वारे अध्यात्म आणि तत्त्वज्ञान सर्वसामान्यांच्या बोलीभाषेत मांडले. समता, प्रेम, भक्ती आणि मानवतेचा संदेश देत त्यांनी समाजमनात प्रबोधनाची ज्योत पेटवली. त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक जीवनावर स्पष्टपणे जाणवतो. त्यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित हा कार्यक्रम त्यांच्या विचारसंपदेचा आणि संतपरंपरेचा गौरव करणारा ठरणार आहे.

   या कार्यक्रमात “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” या संकल्पनेवर आधारित विशेष सादरीकरण होणार असून प्रख्यात व्याख्याते व स्वास्थ्य व समाज विषयक प्रबोधनकार श्री. गणेश शिंदे यांचे संत ज्ञानेश्वरांच्या अध्यात्मदर्शनावर आणि त्यांच्या विचारांच्या सामाजिक परिणामांवर आधारित प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून ज्ञानयोग, भक्तियोग आणि समाजप्रबोधन या संत परंपरेतील महत्त्वपूर्ण मूल्यांचा उलगडा होणार आहे.

   सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. संतपरंपरेचे संवर्धन, सांस्कृतिक वारशाचे जतन आणि समाजात आध्यात्मिक जागर निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

   हिंगोली व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, संत साहित्याचे अभ्यासक तसेच भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समृद्ध अध्यात्मपरंपरेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम पांडे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.

******

No comments: