हिंगोली (जिमाका), दि. 10 : जल जीवन मिशन अंतर्गत
नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांबाबत विविध गावांमधून प्राप्त झालेल्या तक्रारींचा
आढावा घेऊन संबंधित गावांतील योजनांची कामे तात्काळ पूर्ण करून नियमित पाणी पुरवठा
सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी
राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या
प्रगतीचा आढावा आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) श्रीमती समृद्धी दिवाणे, सर्व संबंधित
उपअभियंता व कनिष्ठ अभियंते, सर्व उपविभागांचे अधिकारी, टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स
लिमिटेड या त्रयस्थ तांत्रिक तपासणी संस्थेचे प्रतिनिधी तसेच वॅपकॉस लि. या अंमलबजावणी
संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नळ पाणी पुरवठा योजनांसाठी महावितरण कंपनीकडून विद्युत
पुरवठा उपलब्ध करून घेणे आवश्यक असलेल्या गावांतील विद्युत जोडणीसाठी लागणाऱ्या कोटेशनची
आवश्यक रक्कम संबंधित ग्रामपंचायतींनी भरणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामपंचायतींनी 15
व्या वित्त आयोग निधीतून कोटेशनची रक्कम भरण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असेही
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जल जीवन मिशनची कामे
मंजूर करण्यात आली असल्यामुळे यावर्षी टंचाईच्या काळात एकाही गावात टँकरची आवश्यकता
भासू नये, या दृष्टीने नियोजन करून सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी
दिले. तसेच योजनांच्या कामांबाबत प्रतिसाद न देणाऱ्या कंत्राटदारांविरुद्ध आवश्यक ती
कारवाई करून त्यांची नावे काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्याचेही निर्देश जिल्हाधिकारी
राहुल गुप्ता यांनी दिले.
याशिवाय जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक
घरगुती नळ जोडणीची जी कामे अद्याप सुरू झालेली नाहीत, ती तात्काळ सुरू करून त्याची
नोंद शासनाच्या संकेतस्थळावर करण्याचे निर्देशही देण्यात आले.
यावेळी पाणी पुरवठा विभागामार्फत सध्या सुरू असलेल्या
कामांच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली.
*****
No comments:
Post a Comment