08 August, 2023

 

‘हर घर तिरंगा’ अभियानात 13 ते 15 ऑगस्टपर्यंत

प्रत्येकांनी आपल्या घरावर तिरंगा लावावा

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

  • ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानातही सहभागी होण्याचे आवाहन


 

हिंगोली (जिमाका), दि. 08 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हा अमृत सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे. यामध्ये 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार असून आपल्या घरावर तिरंगा लावून यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

येथील जिल्हाधिकारी सभागृहात जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपजिल्हाधिकारी मोरे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभाग नोंदवून प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर, कार्यालयात तिरंगा लावून ही मोहिम यशस्वी करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी केले.

 

नागरिकांनी ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानात हातात दिवे लावून पंचप्रण शपथ घेण्याचे आवाहन

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची समारोपानिमित्त अमृत सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनापासून जिल्ह्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यात प्रामुख्याने ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान राबविले जाणार आहे. जिल्ह्यात अमृत रोपवाटिका आणि अमृत वन निर्माण केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालये, शाळा, ग्रामपंचायत अशा ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी किमान 75 व 75 च्या पुढील पटीत झाडे लाऊन अमृत वाटिका तयार कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मुख्‍य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी दिले.

उद्या दि. 9 ऑगस्ट, 2023 रोजी सकाळी 10 वाजता सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, गावकऱ्यांनी हातात दिवे लावून पंचप्रण शपथ घ्यावी आणि त्याची सेल्फी काढून अपलोड करावेत व या अभियानात लोकांनीही उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी यावेळी केले आहे.

या बैठकीस जिल्ह्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

*****

No comments: