07 August, 2023

 

आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाचा समारोपीय उपक्रमांतर्गत

मेरी माटी मेरा देश अभियान राबविण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 07 : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे प्रधान सचिव ग्रामविकास व पंचायत राज्य विभाग यांच्या सुचनेनुसार मेरी मिटी मेरा देश (मिटी काम नमन विरों को वंदन) अभियान राबविण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात सर्व नगर परिषदा, नगर पंचायतीत व 563 ग्रामपंचायतीमध्ये मेरा मिटी मेरा देश अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

ग्रामपंचायत स्तरावर या उपक्रमांतर्गत 9 ऑगस्ट, 2023 या दरम्यान कोणत्याही एका दिवशी खालील पाच उपक्रम आयोजित करावेत.

शिलाफलक : हिंगोली जिल्ह्यात एकूण 563 ग्रामपंचायती असून ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यांसाठी व सुरक्षेसाठी बलिदान दिले अशा थोर व्यक्तीची नावे निश्चित करुन शिलाफलकाची उभारणी अमृत सरोवर, शाळा, ग्रामपंचायत  या ठिकाणी करावी.

वसुधा वंदन : वसुधा वंदन म्हणून 75 देशी वृक्षांच्या रोपाची लावगड करुन अमृत वाटिका करावयाची आहे. त्यासाठी जिल्ह्यातील 563 ग्रामपंचायत अंतर्गत अमृत सरोवर असलेल्या गावातील जागा, परिसर निश्चित करुन आमृत वाटिका तयार करावयाच्या आहेत.

स्वातंत्र्य सैनिक, वीरांना वंदन : ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी व सुरक्षेसाठी बलिदान केलेल्या, निवृत्त वीरांचा (स्थलसेना, नौसेना, वायुसेना तसेच पोलीस दल), स्वातंत्र्य सैनिक यांच्या परिवारातील सदस्य यांचा कार्यक्रमावेळी शाल, बुके, श्रीफळ देउुन सन्मान करावा. अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांच्या अधिनस्त ग्रामपंचायतींना कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार स्वातंत्र्य सैनिक यांच्या परिवारातील सदस्यांचा सन्मान गावपातळीवर स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पंचप्रण (शपथ घेणे) : जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, गावकऱ्यांनी हातात दिवे लावून पंचप्रण शपथ घेण्याबाबत सूचना निर्गमित केलेल्या आहेत.

ध्वजारोहण : गावक्षेत्रातील अमृत सरोवर, शाळा, ग्रामपंचायत या एका योग्य ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेऊन राष्ट्रगीत गायन, तिरंगा फडकविणे तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एक-दोन मूठ माती घेऊन पंचायत समितीस्तरावरील समन्वयक अधिकारी यांच्याकडे सोपविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याच बरोबर संपूर्ण कार्यक्रमामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, युवक मंडळ, महिला बचत गट, शेतकरी मंडळ, सर्व नागरिक यांचा लोकसहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तालुकास्तरावर दि. 16 ते 20 ऑगस्ट, 2023 दरम्यान माती कलशामध्ये गोळा करणे या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावातील आणलेली माती एका कलशामध्ये गोळा करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. वसुधा वंदन या उपक्रमांतर्गत 75 देशी वृक्षांच्या रोपाची लागवड करुन अमृत वाटिका करणे. तसेच तालुकास्तरावर (अमृत सरोवर, शाळा, ग्रामपंचायत इ.) या एका योग्य ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेऊन राष्ट्रगीत गायन, तिरंगा फडकविणे या संपूर्ण कार्यक्रमामध्ये स्थानिक लोक प्रतिनिधी, युवक मंडळ, महिला बचत गट, शेतकरी मंडळ, सर्व नागरिक यांचा लोकसहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

*******

No comments: