15 March, 2024

जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू

हिंगोली (जिमाका), दि. 15 : मार्च महिन्यात विविध सण-उत्सव, स्पर्धा आणि महापुरुषांच्या जयंती, सभा, बैठका, धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. दि. 24 मार्च, 2024 रोजी होळी, 25 मार्च रोजी धुलीवंदन, 28 मार्च रोजी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, 29 मार्च रोजी गुड फ्रायडे व दि. 31 मार्च, 2024 रोजी इस्टर संडे असून, रमजान मास सुरु आहे. जिल्ह्यात विविध देवस्थानचे, ग्रामदेवताच्या वतीने यात्रेचे आयोजन करण्यात येत आहेत. यानिमित्त कब्बडी, कुस्त्या, कीर्तन, संदल व इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात. तसेच व्हीव्हीआयपी व स्वरक्षित व्यक्ती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असतात. सध्या घडणाऱ्या राजकीय, सामाजिक घडामोडी, सकल मराठा समाज, ओबीसी समाज, धनगर समाज, आदिवासी व बंजारा समाजाच्या वतीने आरक्षण संबंधाने मोठ्या प्रमाणात बैठका, सभा, मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे, आमरण उपोषणे करण्यात येत आहेत. शेतकरी, नागरिकांच्या वतीने, विविध संघटना, पक्ष यांच्यातर्फे हिंगोली जिल्ह्यात त्यांच्या मागणीसंदर्भात मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दिनांक 17 मार्च, 2024 रोजीचे 23.59 वाजल्यापासून ते दिनांक 02 एप्रिल, 2024 रोजीचे 23.59 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे. त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्याजवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तूजवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटकद्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल, अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना जाणून बुजून दुखावतील, या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. ********

No comments: