21 March, 2024

जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के नागरिकांनी न घाबरता सतर्क रहावे - जिल्हाधिकारी

हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्ह्यातील सर्व तालुक्यात आज गुरुवारी, सकाळी ६ ते ६:२४ दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या संकेतस्थळावरून जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्रास प्राप्त झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या संकेतस्थळावरून घेतलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे 4.5, 3.6 व 2.6 अशी नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यात झालेल्या भूकंपाचे केंद्रबिंदू कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यातील गावांमध्ये होते. सकाळी 6:08 मिनिटांनी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू कळमनुरी तालुक्यातील जांब तर सकाळी 6:19 मिनिटांनी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू रामेश्वर तांडा आणि सकाळी 6:24 मिनिटांनी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे असल्याची माहिती दिल्लीस्थित संकेतस्थळावरुन प्राप्त झाली आहे. याशिवाय हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, यवतमाळ या जिल्ह्यातही धक्के जाणवले असल्याचे जिल्हा नियंत्रण कक्षास सांगण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क राहावे. या नैसर्गिक आपत्तीसंदर्भात सर्व संबंधित यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. तसेच भूकंप होण्याआधी, दरम्यान व नंतर नागरिकांनी सतर्क राहत विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. भूकंपापूर्वी घ्यावयाची काळजी : तुमचे घर भूकंपाला तोंड देऊ शकेल, असे होण्यासाठी बांधकाम अभियंत्याचा सल्ला घ्या. ग्रामीण भागात काही घरांचे छत पत्र्यांचे असून त्या पत्र्यावर आधारासाठी मोठे दगड ठेवले आहेत. प्रामुख्याने अशा घरांवरचे दगड काढून त्यांना तारेच्या सहाय्याने आधार द्यावा. भूकंपप्रवणता माहिती करुन घ्यावी आणि त्यानुसार घरात आवश्यक ते बदल करावेत. तुमच्या घराची आरेखने, नकाशे भविष्यातल्या उपयोजनासाठी जपून ठेवा. भिंती व छतावरच्या प्लास्टरला खोल तडे असल्यास ते दुरुस्त करुन घ्यावेत. कपाटे, फडताळ भिंतीला सुरक्षितपणे बांधून ठेवा, जड वस्तू फडताळात खालच्या कप्प्यांमध्ये ठेवा. विजेच्या तसेच गॅसच्या वस्तूंना भक्कम आधार द्या. सुरक्षितता तसेच जीव वाचवण्याच्या दृष्टीने आपत्कालीन वस्तू संच तयार ठेवा. कुटुंबासाठी आपत्कालीन दळणवळण आणि आपत्तीप्रसंगी बाहेर जाण्याचा आरखडा तयार करा. ड्रॉप कव्हर होल्डचं म्हणजे खाली पडा, संरक्षित व्हा, पकडा हे तंत्र शिकून घ्या. शक्य तो बांधकामासाठी पुराच्या ठिकाणी नदी वा किनाऱ्यालगतचा भाग तसेच भराव टाकून विकसित केलेला भाग टाळा. भूकंपात असलेल्या धोक्याबद्दल स्वत:ला तसेच कुटुंबातल्या माहिती द्या. भूकंपाच्या वेळी घ्यावयाची काळजी : शांत राहा, घाबरुन जाऊ नका, चार भिंतीच्या आत वा मोकळ्या जागी असाल तर तिथेच थांबा. काडीपेटी, मेणबत्या किंवा कोणत्याही प्रकारची ज्योत वापरु नका. नादुरुस्त किंवा भंग पावलेली गॅस पाइपलाइन आणि आग एकत्र येणे योग्य नाही. मोटारीमध्ये असाल तर गाडी तिथेच थांबवून भूकंप थांबेपर्यंत गाडीतच थांबा. टेबलाखाली झोपा, एका हाताने तोंड झाका आणि भूकंपाची कंपनं थांबेपर्यंत टेबल धरुन ठेवा. खिडक्या तसेच आरशांपासून लांब थांबा. जमीन हादरत असताना इमारत सोडून जाऊ नका. कंपन थांबल्याबरोबर बाहेर पडा, लिफ्टचा वापर करु नका. खुल्या जागी असाल तर इमारती, झाडं, भिंती, विजेचे खांब, विजेच्या तारांपासून दूर राहा. एखाद्या वाहनात असाल तर मोकळ्या जागी या आणि पुलावर थांबू नका. भूकंपरोधक बांधकाम असलेल्या सुरक्षित इमारतीत असाल, तर जमीन हादरणे थांबेपर्यंत इमारतीतच थांबा. एखाद्या कोपऱ्याचा आधार घेऊन, एखाद्या भक्कम टेबलाखाली, पलंगाखाली लपून किंवा खिडक्या तसेच आरशापासून लांब अशा एखाद्या आतल्या भिंतीचा वापर करुन स्वत:ला वाचवा. इमारतीतून बाहेर जायच्या दाराच्या जवळ असाल तर लवकरात लवकर बाहेर पडा. एखाद्या जुन्या कमकुवत वास्तुत असाल तर बाहेर पडायचा सुरक्षित मार्ग लवकरात लवकर पकडा. भूकंपानंतर घ्यावयाची काळजी : मोडकळलेल्या इमारतीत प्रवेश करु नका. इमारतीखाली, राडारोड्यात अडकलात तर, काडीपेटीची काडी पेटवू नका, तोंड कापडाच्या तुकड्याने झाकून घ्या, मदतीसाठी एखाद्या पिंप किंवा भिंतीवर हात आपटा, शिट्टी वाजवा. शेवटचा उपाय म्हणूनच फक्त ओरडा, त्यानं अंगात जीव राहील आणि ऊर्जा कमी खर्च होईल. सरकते जिने किंवा लिफ्टचा वापर न करता जिने वापरा. काळजीपूर्वक चाला, तुमच्या भोवतीच्या डोक्यावरच्या धोकादायक, अस्थिर वस्तूंचा अंदाज घ्या. तुम्ही जखमी होणार नाही याची काळजी घ्या. मोठ्या भूकंपानंतर अनेक छोटे धक्के बसतात, याची जाणीव ठेवा. अफवांवर विश्वास ठेवू नका, त्या पसरवू नका. तुम्हाला घर सोडायचच असेल तर तुम्ही नेमके कुठे जाताय, याविषयीचा संदेश सोडून जा. उद्ध्वस्त क्षेत्रात गाडी घेऊन जाऊ नका, कारण मदत पुनर्वसन कामासाठी रस्त्यावरची वाहतूक खोळंबू शकते. पूल किंवा उड्डाणपूल वापरु नका, कारण त्यांची मोडतोड झालेली असू शकते, असे आवाहन केले आहे. *******

No comments: