हिंगोली (जिमाका), दि. ३ : पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि हरित क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने ‘एक पेड माँ के नाम 2.0’ अभियान तसेच वन महोत्सवानिमित्त शुक्रवार, (दि.३) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून जिल्ह्यातील वृक्षलागवड मोहिमेला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते वड, पिंपळ व उंबर या देशी वृक्षांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी विभागीय वन अधिकारी श्रीमती पुष्पा पवार, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षलागवडीबरोबरच वृक्षांचे संगोपन करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. वृक्ष हे पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच भावी पिढ्यांना निरोगी व सुरक्षित जीवन देणारे महत्त्वपूर्ण साधन असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘एक पेड माँ के नाम 2.0’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने आपल्या मातृऋणाची जाणीव ठेवून किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
वन महोत्सवानिमित्त भारतीय देशी प्रजातींच्या वड, पिंपळ व उंबर या पर्यावरणपूरक आणि दीर्घायुषी वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणासोबतच त्यांचे संवर्धन व जतन करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमास सामाजिक वनीकरण विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी संदीप शिंदे, वनपाल संदीप वाघ, गोपाल बिरसोने, वनरक्षक बालाजी जाधव, सूरज शेळके, श्रीमती सुनीता लोणे, देवराव दिपके, तुषार भालेराव, शाहू भालेराव यांच्यासह सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत विविध शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायती तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार असून, या अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
*******





No comments:
Post a Comment