01 July, 2026

पालखी सोहळ्यासाठी सर्वांनी समन्वयाने आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात – जिल्हाधिकारी


 


हिंगोली (जिमाका), दि. 1 : हिंगोली जिल्ह्यातून मार्गस्थ होणाऱ्या श्री गजानन महाराज, श्री संत नामदेव महाराज व श्री रुक्मिणी संस्थान, श्रीक्षेत्र कौंडण्यपूर यांच्या पालख्यांसह विविध दिंड्यांच्या वारकऱ्यांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आयोजित बैठकीत दिले. 

हिंगोली जिल्ह्यातून मार्गस्थ होणाऱ्या पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित हाते. 

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या निर्देशानुसार विविध विभागांचे नोडल अधिकारी व समन्वय पथके नियुक्त करण्यात आली आहेत. पालखी मुक्कामस्थळी स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे व स्वच्छता पथक, पुरेसा पोलीस बंदोबस्त, फिरते वैद्यकीय पथक, व्हेंटिलेटरसह अॅम्ब्युलन्स, प्रथमोपचार सुविधा, फूट मसाजची व्यवस्था, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जंतुनाशक फवारणी, अखंडित वीजपुरवठा व प्रकाशव्यवस्था, महाप्रसाद व अन्नदान स्थळी अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती, पालखी मार्गावरील आवश्यक रस्ता दुरुस्ती व रुंदीकरण तसेच अग्निशमन व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

या कामांसाठी संबंधित विभागप्रमुखांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले असून, वारकऱ्यांना सुरक्षित व सुरळीत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी निर्देशित केले आहे.  

******

No comments: