हिंगोली (जिमाका), दि. 2 : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी राज्यात 20 जुलैपर्यंत विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत आहे.
ऑगस्ट 2020 मध्ये आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेली ही योजना पिक काढणीनंतरच्या कृषी पायाभूत सुविधा तसेच सामुदायिक शेतीसाठी आवश्यक सुविधांच्या निर्मितीसाठी सवलतीच्या दराने कर्ज उपलब्ध करून देते. या योजनेमुळे शेतमालाचे मूल्यवर्धन, साठवणूक, प्रक्रिया, वाहतूक आणि विपणन यांना चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होत आहे.
या योजनेअंतर्गत बँकांमार्फत मंजूर होणाऱ्या 2 कोटी रुपयापर्यंतच्या कर्जावर 3 टक्के व्याज सवलत तसेच क्रेडिट गॅरंटीची सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून दिली जाते.
या योजनेअंतर्गत गोदामे, शीतगृहे, पॅक हाऊस, ग्रेडिंग व सॉर्टिंग युनिट, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, कृषी लॉजिस्टिक्स, सायलो, रिपनिंग चेंबर, ई-मार्केट सुविधा, जैव-इनपुट उत्पादन युनिट, कस्टम हायरिंग सेंटर तसेच इतर कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांना अर्थसहाय्य करण्यात येते.
या योजनेचे लाभार्थी म्हणून वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या/संस्था, प्राथमिक कृषी पतसंस्था, सहकारी संस्था, कृषी उद्योजक, स्टार्टअप्स, स्वयं सहाय्यता गट तसेच कृषी क्षेत्रातील इतर पात्र संस्थांचा समावेश आहे.
विशेष अंमलबजावणी मोहिमेदरम्यान जिल्ह्यात जनजागृती कार्यक्रम, शेतकरी मेळावे, कार्यशाळा, बँक समन्वय बैठका तसेच लाभार्थी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. पात्र शेतकरी व संस्थांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी, आत्मा, कृषी विभाग अथवा जवळच्या राष्ट्रीयीकृत/अनुसूचित बँकेशी संपर्क साधावा.
तसेच जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, कृषी उद्योजक व इतर लाभार्थींनी कृषी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा. इच्छुक लाभार्थ्यांनी https://agriinfra.dac.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी संचालक, आत्मा, कृषी आयुक्तालय, पुणे यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment