06 April, 2024

लोकसभा निवडणूक भयमुक्त आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करा - निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना

• निवडणूक निरीक्षक आर.जयंथी, कमलदीप सिंह यांनीही घेतला आढावा हिंगोली (जिमाका), दि 06: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 15-हिंगोली लोकसभा मतदार संघातील सर्व यंत्रणा निवडणूक कामासाठी सज्ज झाली असून, हिंगोली मतदारसंघातील संपूर्ण यंत्रणेने चांगले नियोजन केले आहे. यापुढील काळातही निवडणूक भयमुक्त आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याचे निर्देश निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती एम. एस. अर्चना यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आज सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना यांच्या अध्यक्षतेखाली मतदारसंघाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस निवडणूक निरीक्षक आर. जयंथी, खर्च निवडणूक निरीक्षक कमलदीप सिंह, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, सहायक जिल्हाधिकारी श्रीमती कावली मेघना, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, एनआयसीचे अब्दुल बारी, सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह निवडणूक यंत्रणेतील सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मतदारसंघाच्या निवडणूक तयारीचे सादरीकरण केले. याशिवाय जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यासह विभाग प्रमुखांनी सादरीकरण केले. गेल्या तीन दिवसांपासून लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांना भेटी देत तपासणी केल्याचे सांगून श्रीमती अर्चना म्हणाल्या की, येथील मतदान केंद्रांवर मतदारांना मतदानाच्या दिवशी सर्व आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. यामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, पुरेसा विद्युत पुरवठा, रॅम्प, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, त्यांना ने-आण करण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देत प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करावी. तसेच मतदानाच्या दिवशी घरातील प्रत्येक मतदार मतदानासाठी केंद्रावर येईल, याकडे यंत्रणेने विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था परिस्थिती कठोरपणे हाताळा आणि कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याचे त्यांनी निर्देश दिले. यासाठी पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनाने निवडणूक काळात संवेदनशीलतेने समन्वय ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. पोलीस निवडणूक निरीक्षक आर. जयंथी यांनी यावेळी स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षा व्यवस्थेपासून तपासणी पथकाच्या तत्परतेबाबत आढावा घेतला. सर्व वरिष्ठ अधिकारी निवडणुकीच्या काळात कार्यरत असून, सर्वांनी या काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची सर्व त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात व योग्य समन्वय राखत काम करण्याची सूचना त्यांनी केली. निवडणूक निर्णय कक्ष, स्वीप, प्रशिक्षण व व्यवस्थापन, आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था, ईव्हीएम कक्ष, मतदान, मीडिया, माहिती व्यवस्थापन तक्रार निवारण कक्ष, सी-व्हीजील, वाहतूक व संपर्क व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, तसेच हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्राच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना असलेल्या समस्यांबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी कमलदीप सिंह यांनी उमरखेड, किनवट आणि हदगाव विधानसभा मतदारसंघातील नाक्याबाबत तिन्ही जिल्ह्यातील यंत्रणेने योग्य समन्वय राखून काम करावे, अशा सूचना केल्या. *********

No comments: