01 July, 2026

मतदार पडताळणी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करा; जबाबदारीत कसूर केल्यास होणार कार्यवाही – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 




हिंगोली (जिमाका), दि. 1 : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 30 जून 2026 पासून जिल्ह्यात प्रत्यक्ष मतदार पडताळणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करून आवश्यक अर्जांचे वितरण करीत आहेत. या मतदार पडताळणी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी याप्रसंगी दिले. 

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या प्रत्यक्ष मतदार पडताळणी मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी आज (दि. 1) जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रगती चोंडेकर, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने, श्रीमती प्रतिक्षा भुते, समाधान घुटुकडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 30 जून 2026 पासून जिल्ह्यात प्रत्यक्ष मतदार पडताळणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करून आवश्यक अर्जांचे वितरण करीत आहेत. नागरिकांनी बीएलओंना आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देत या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

जिल्ह्यातील सर्व बीएलओंना या मोहिमेसंदर्भात प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले असून, मतदार पडताळणीचे काम अचूक, पारदर्शक व वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात दि. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत घरोघरी जाऊन अर्जांचे वितरण, 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत हरकती व सूचना स्वीकारणे, 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबरदरम्यान हरकतींवरील सुनावणी घेणे आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडाव्यात. या महत्त्वाच्या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा टाळाटाळ केल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बैठकीत दिला.

******

No comments: