• हिंगोली जिल्ह्यास 7.98 लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट; 'एक पेड माँ के नाम' अभियानालाही गती देण्याचे निर्देश
हिंगोली (जिमाका), दि. 01 : जिल्ह्यात वनाच्छादित व वृक्षाच्छादित क्षेत्र वाढविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. येत्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश सरोदे, विभागीय वन अधिकारी पुष्पा पवार तसेच विविध विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
राज्य शासनाने 300 कोटी वृक्षारोपण मोहिम तसेच इतर हरित उपक्रमांचे नियोजन, अंमलबजावणी व संनियंत्रण करण्यासाठी 'हरित महाराष्ट्र आयोग' स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. सन 2026 ते 2047 या कालावधीत राज्यातील हरित आच्छादन वाढविण्याचा शासनाचा निर्धार असून, त्याअनुषंगाने आवश्यक नियोजन, जागेची उपलब्धता, रोपे, मनुष्यबळ तसेच विभागनिहाय कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.
ही मोहीम परिणामाधारित अंमलबजावणी आराखड्यानुसार राबविण्यात येणार असून, लागवड केलेल्या वृक्षांच्या दहा वर्षांच्या जतन व संवर्धनाची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे वृक्षांचे दीर्घकालीन अस्तित्व व वाढ सुनिश्चित होण्यास मदत होणार असून, राज्यातील हरित आच्छादनाची गुणवत्ता, शाश्वतता आणि पर्यावरणीय मूल्य वाढविण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.
हिंगोली जिल्ह्यास 7 लाख 98 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, सर्व विभागांनी आपापल्या वाट्याचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करून वृक्षलागवडीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले.
ते पुढे म्हणाले की, जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 33 टक्के क्षेत्र वनाच्छादित व वृक्षाच्छादित असणे अपेक्षित आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्ह्यातील 5 हजार 815 हेक्टर पोटखराब जमिनीवर वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात यावे.
सध्या विविध यंत्रणांकडे सुमारे 11 लाख रोपे उपलब्ध असून, त्यापैकी जास्तीत जास्त रोपे प्राधान्याने ग्रामपंचायतींना उपलब्ध करून द्यावीत. त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कृषी विभागास आवश्यकतेनुसार रोपांचे वितरण करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. नदीकाठच्या पूरप्रवण गावांमध्ये पूरनियंत्रणाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागांना दिले. प्रत्येक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावाने एक झाड लावून त्या झाडाच्या संगोपनाची जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यावर सोपविण्याचे नियोजन करावे. तसेच 'एक पेड माँ के नाम' अभियानांतर्गतही मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून जनसहभाग वाढविण्यात यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी केले.
*******

No comments:
Post a Comment