17 February, 2024

'जाणता राजा'च्या माध्यमातून हिंगोलीकरांनी अनुभवला शिवरायांचा अतुलनीय पराक्रम महानाट्याच्या प्रयोगांना प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद

हिंगोली (जिमाका), दि. 17 : छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व तेजस्वी व्यक्तीमत्व प्रभावीपणे मांडणाऱ्या ‘जाणता राजा’ महानाट्याला हिंगोली जिल्ह्याच्या विविध भागातील जनतेने उदंड प्रतिसाद दिला. या महानाट्याच्या माध्यमातून शिवचरित्र घराघरात पोहचल्याचे समाधान प्रशासनाने अनुभवले. गेल्या तीन दिवसांपासून रामलीला मैदान येथे सुरु असलेल्या महानाट्याचा समारोप शुक्रवार दि. 16 फेब्रुवारीला झाला. शेवटच्या दिवशीही प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये शिवचरित्रावर आधारित महानाट्य राज्यात आयोजित करण्यात येत आहे. बुधवार दि. 14 फेब्रुवारी रोजी आमदार तानाजी मुटकुळे आणि जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते ‘जाणता राजा’ महानाट्याचा प्रारंभ झाला. जिल्हा प्रशासनाने या महानाट्याचे यशस्वी आयोजन केले होते. प्रयोगाआधी दररोज मान्यवरांच्या हस्ते आरती झाली. समारोपाच्या प्रयोगाची आरती प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आदिंच्या उपस्थितीत झाली. शिवरायांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र आणि त्यांच्या जन्मानंतर राजमाता जिजाऊ माँ साहेब यांनी लहानग्या शिवबांना दिलेले बाळकडू व मावळ्यांची मोट बांधून शिवबांनी स्वराज्य निर्मितीची घेतलेली शपथ, अशा या महानाट्यातील अनेक प्रसंगांनी उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला. एकूण 150 पेक्षा अधिक कलाकार व तंत्रज्ञांचा भव्य फिरत्या रंगमंचावर लिलया व नेटका वावर प्रेक्षकांना खिळवून ठेवत होता. जवळपास साडे तीन तास चालणाऱ्या या महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, मुत्सदेगिरी, प्रशासनावरील जरब, सौहार्द, निर्णयशक्ती दर्शविणारे प्रसंग, अफजलखानाचा वध, शाहिस्ते खानाची लाल महालातील कोंडी, छत्रपतींची आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक आदी प्रसंगाचा गतइतिहास डोळ्यासमोर उभा झाला. सोबतीला पोवाडे, भारुड, गवळणी, गोंधळ, वाघ्या -मुरळी, लावणी, कोळी नृत्य आदी लोककलांची महानाट्यातील नेमकी गुंफण आकर्षक ठरली. रंगमंचावरील प्रसंगानुरुप देखावे, घोडे, उंट, तोफांचा वापर, साजेसे नेपथ्य, प्रकाश व संगीत संयोजन, संवादाची उत्तम फेक या सर्वानीच प्रेक्षकांना खिळवून ठेवले. शिवराज्याभिषेकाचा प्रसंग प्रेक्षकांमध्ये स्वराज्याच्या महानायकाचा सर्वोच्च सन्मान असल्याची प्रचिती उपस्थित प्रेक्षकांनी अनुभवली व छत्रपती शिवरायांचा प्रताप आपल्या काळजात बिंबवून घेतला. या महानाट्याच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये उपस्थित विद्यार्थी, पालक, पाल्य, अबाल वृध्दांनी शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास याची देही याची डोळा अनुभवला. महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्य आणि परदेशात या महानाट्याचे हजारावर प्रयोग झाले. जिल्हा प्रशासनाने राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनात आयोजन केले आहे. नागरिकांच्या भरघोस प्रतिसादासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आभार व्यक्त केले आहे. *******

No comments: