26 March, 2023

 

जिल्हा कृषि महोत्सवाचा तिसरा दिवस हळद या पिकासाठी समर्पित

चर्चासत्र व परिसंवादाचा लाभ घेण्याचे आवाहन

·         आज तृणधान्य व हळद या विषयावरील चर्चासत्र संपन्न

 

                          हिंगोली (जिमाका), दि. 26  :  जिल्हा कृषि महोत्सचा दि. 27 मार्च 2023 रोजी  प्रदर्शनाचा तिसरा दिवस आहे. दि. 27 मार्च हा संपूर्ण दिवस हळद या पिकासाठी समर्पित आहे. यामध्ये हळद पिकासाठी जमिनीचे आरोग्य या विषयावर डॉ. कौसडीकर यांचे मार्गदर्शन होणार आहे. तर शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत हळद पिकाचे मार्केटिंग कसे करावे याचे अनुभव कथन प्रल्हाद बोरगड हे करणार आहेत. हळदीमध्ये विक्रमी उत्पादन घेणारे कळमनुरी तालुक्यातील नितीन चव्हाण हे आपली यशोगाथा सादर करणार आहेत. नव्याने  विकसित होत असलेल्या ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरावर गरुडा ॲरो स्पेसचे इंजिनियर आदित्य तटके यांनी उपस्थित शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. चर्चासत्राचा समारोप महाराष्ट्र कृषि पणन मंडळ मार्फत आयोजित खरेदीदार विक्रेता संम्मेलन याने होणार आहे. चर्चासत्राचे आयोजन मुख्य दालनामध्ये दृक-श्राव्य माध्यमाद्वारे करण्यात येत आहे. तसेच ज्या शेतऱ्यांना प्रदर्शनाचे स्टॉल पाहत-पाहत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा आहे. त्यांच्यासाठी  प्रदर्शन स्टॉलमध्ये मेगा फोनद्वारा व्याख्यानाचे प्रसारण करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच मुख्य दालनामध्येही बैठक व्यवस्था केलेली असून त्या ठिकाणी बसून या चर्चासत्र व परिसंवादाचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  विशेषत: हळद उत्पादकांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन घ्यावा, असे आवाहन युवराज शहारे,  प्रकल्प संचालक, आत्मा, हिंगोली यांनी केले आहे. या चर्चासत्रामध्ये होणारी व्याख्याने यूट्यूब च्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.  चर्चासत्रानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून लोकशाहीर श्यामभाऊ वानखेडे यांचा लोकजागराचा पंचरंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचाही लाभ  हिंगोली  परिसरातील  नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन कृषि विभागा मार्फत करण्यात आले आहे.

जिल्हा कृषि महोत्सवामध्ये आज दि. 26 मार्च, 2023 रोजी तृणधान्य, हळद या विषयावरील चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तोंडापूर येथील कृषि विज्ञान केंद्राच्या श्रीमती रोहिणी शिंदे यांनी तृणधान्य पिकावरील प्रक्रिया उद्योग व त्यांची प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन योजनेशी सांगड या विषयावर मार्गदर्शन केले. दत्तगुरु फार्मर प्रोडयुसर कंपनीचे संचालक  गंगाधर श्रृगांरे यांनी कंपनीची स्थापना तसेच कंपनीद्वारे शेतकऱ्यांना विपणनामध्ये करण्यात येत असणारे बदल या विषयी आलेले अनुभव कथन केले. कृषि विज्ञान केंद्राचे प्रा.अनिल ओळंबे यांनी कांदा बिजोत्पादन तंत्रज्ञान या विषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच हळद पिकाची लागवड व त्यामध्ये शेतकऱ्यांनी हाती घ्यावयाचे उपक्रम या विषयी सखोल मार्गदर्शन केले. वर्धा जिल्ह्यातील वायगांव हळदीवर उल्लेखनीय काम केलेले मनोज गायधने यांचे हळद लागवड, त्याचे भौगोलिक मानांकन व प्रभावी विपणन या विषयी मार्गदर्शन केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील शास्त्रज्ञ एल.एन जावळे यांनी खरीप व रब्बी हंगामातील ज्वारी पिक लागवड व विकसित केलेल्या सुधारित वाणाची  माहिती  दिली. तसेच श्री. कल्याणकर यांनी सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावर आपले विचार मांडले. तृणधान्यवर्गीय पिकाचे वैरण प्रक्रिया व महत्व या विषयावर निकृष्ट  दर्जाच्या वैरणीचे पौष्टिक वैरणीमध्ये रुपांतर करण्याबाबत कृषि विज्ञान केंद्राचे  कैलास गिते यांनी मार्गदर्शन केले. कृषि विज्ञान केंद्राचे राजेश भालेराव यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले.

आज झालेल्या वरील चर्चासत्रात शेतकऱ्यांचा कालापव्यय होऊ नये म्हणून चर्चासत्राचे प्रसारण प्रदर्शन स्थळी मांडलेल्या स्टॉलमध्ये सुध्दा मेगा फोनच्या द्वारे करण्यात आले आहे. मेगा फोनच्या माध्यमातुन स्टॉलमध्ये उपस्थित शेतकऱ्यांनी सुध्दा चर्चा सत्रातील व्यक्त्यांच्या मार्गदर्शनाचा स्टॉल पाहत-पाहत लाभ घेतला आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सुध्दा शेतकऱ्यांनी कृषि महोत्सवाला मोठ्या संख्येने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. सांयकाळी 5.00 वाजेपपर्यंत झालेल्या नोंदणी नुसार 850 पेक्षा अधिक लोकांनी प्रदर्शनास भेट दिली आहे. तसेच नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या सुध्दा 800 पेक्षा अधिक असल्याचे कृषि विभागाने कळविले आहे.

*****

No comments: