16 September, 2023

 

मराठवाडा मुक्तीदिन विशेषांकासाठी


मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या सशस्त्र लढ्यात हिंगोली जिल्ह्याचे महत्वपूर्ण योगदान

 

            ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात 563 संस्थाने होते. संस्थानाचा राज्यकारभार देशी संस्थाने पाहत असत. हैदराबाद संस्थानात असफिया घराण्याची सत्ता होती. हैदराबाद राजाचा असफिया घराण्याचा संस्थापक मीर करीमुद्दिन उर्फ निजाम उल मुल्क हा होता. त्याने इ.स. 1724 मध्ये  हैदराबाद या ठिकाणी स्वतंत्र राज्याची स्थापना केली. यामध्ये आजचा मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक या प्रदेशाचा समावेश होता. या राज्यांच्या गादीवर सत्ताधीशाला निजामाच्या नावाने ओळखले जात होते. 15 ऑगस्ट, 1947 रोजी भारत स्वतंत्र  झाला. परंतु निजामाने आपले राज्य स्वतंत्र ठेवण्याची घोषणा केली. निजाम अन्याय व अत्याचारी  होता. याशिवाय देशाच्या मध्यभागी असलेले हैदराबाद हे राज्य स्वतंत्र आणि  जनतेच्या हिताचे नव्हते. त्यामुळे हैदराबाद निजामी सत्तेला हद्दपार करण्यासाठी या राज्यातील जनतेने 7 ऑगस्ट, 1947 पासून संघटितपणे सशस्त्र आंदोलनाला सुरुवात केली. शेवटी 13 सप्टेंबर, 1948 रोजी भारत सरकारने लष्करी कारवाई केली. परिणामी 17 सप्टेंबर, 1948 रोजी निजामाने भारतीय लष्करापुढे शरणागती पत्करली. अशा रीतीने हैदराबाद राज्य भारतीय संघराज्यात सामील झाले .

            हैदराबाद मुक्तिसंग्राम हा भारताच्या स्वातंत्र्याचा अविभाज्य असा भाग आहे. हैदराबाद मुक्ती संग्रामात मराठवाडा सर्व क्षेत्रावर आघाडीवर होता. हैदराबाद स्वातंत्र्य लढ्यात मराठवाडा अग्रेसर होता. त्यांनी पुढे सशस्त्र आंदोलनातही आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे. मराठवाड्यातील अग्रगण्य पत्रकार अनंत भालेराव यांच्या मतानुसार - मराठवाड्यातील जनतेने हा प्रश्न समूळ नष्ट करण्यासाठी या प्रदेशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मे पत्करण्याची उज्वल परंपरा निर्माण केली. गोविंदभाई श्राफ यांच्या मते-हैदराबाद स्वतंत्र्य संग्रामाची परिस्थिती अत्यंत वेधपूर्वक साधरणाने भिन्न-भिन्न घटनाक्रमातून वाटचाल करणारी आहे. त्यामुळे संग्रामाचे स्वरुप अद्वितीय असे आहे. निजाम राजवटीची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करणारे बरेच प्रयत्न मराठवाड्यामधून झाले आणि निजामाच्या गुलामगिरीविरुद्ध दंड थोपटण्याचे काम मराठवाड्यातील जनतेने केले आहे. त्या हैदराबादच्या स्वातंत्र्य लढ्यात किंवा मराठवाड्याच्या स्वातंत्र्य लढ्यात हिंगोली जिल्ह्याचे महत्त्वपूर्ण योगदान आपल्याला दिसून येते.

            15 सप्टेंबर, 1947 पासून जंगल सत्याग्रहास प्रारंभ झाला. चळवळ विस्तृत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी निरनिराळ्या भागात दौरे काढले. प्रचारसभा घेतल्या. लोकांच्या मनात सत्याग्रहाची कल्पना रुजविली. कळमनुरी तालुक्यात सत्याग्रहासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले आणि दि. 15 सप्टेंबर, 1947 रोजी कुर्तडी येथे श्री. दिपाजी पाटील, श्री. संपत पाटील उर्फ प्रभाकर वाईकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो लोकांनी जंगल सत्याग्रह केला. हजारो शिंदीची झाडे तोडली. सत्याग्रहात दोन हजाराच्यावर जनसमुदाय उपस्थित होता. आडा, दाती, पिंपरी, साळवा, बेलथर, कोंढूर, दिग्रस, राजदरी, पिंपळदरी, येहळेगाव, घोडा, जरोडा, तुप्पा आदी ठिकाणी जंगल सत्याग्रह केला. दि. 15 सप्टेंबर, 1947 ते दि. 30 सप्टेंबर, 1947 पर्यंत अनेक गावातून हजारो शेतकऱ्यांनी शिंदीची व मोहाची झाडे तोडली. निजामी जुलमी राजवटीविरुध्द असंतोष व प्रचंड उठाव पाहून सरकार घाबरले होते. सरकारने शेतकऱ्यांची चळवळ मोडून काढण्यासाठी दडपशाहीस प्रारंभ केला. मिलिटरी, पोलीस व रझाकाराच्या मदतीने चळवळी करणाऱ्या गावावर हल्ले चढवण्यात आले. सत्याग्रहातील कार्यकर्त्यांना अटक वारंट काढून निरपराधांना बेदम मारहाण करुन जेलमध्ये टाकण्यात आले.

            भाटेगाव येथील रोहिल्या साथीदाराच्या मदतीने खेड्यापाड्यातील लोकांना फार त्रास देत होता. हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हालचालीची माहिती पोलिसांना तो देत होता. रोहिल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेंबाळपिंपरी येथील लष्करी केंद्रावरील विठ्ठलराव नाईक, माणिकराव टाकळगव्हाणकर, दीपाजी पाटील, रावसाहेब पेडगावकर, मार्तंडराव नाईक आदींनी भाटेगावच्या रोहील्यावर हल्ला केला. त्यावेळी रोहिला येथे साथीदारासह शेतात झोपला होता. सैनिकांची त्यास चाहूल लागताच त्यांनी गोळीबार करत स्वातंत्र्य सैनिकांवर हल्ला  सुरु केला. त्यात सैनिक व रोहिला यांच्यात गोळीबारानेच संघर्ष होऊन या गोळीबारात भाटेगावचा रोहिल्या ठार करण्यात आले होते.

कळमनुरी तालुक्यातील वाकोडी या गावावर हल्ला करण्याकरता निजामी पोलीस येत असल्याची माहिती शेंबाळपिंपरी कॅम्पला मिळाली. स्वातंत्र्य सैनिक निजामी पोलिसांचा हल्ला होण्यापूर्वी त्यांच्यावर चालून गेले. उन्हाळ्याचे दिवस होते भर उन्हात चकमक चालू होती. शेवटी निजाम पोलिसांना माघार घ्यावी लागली व तेथून शस्त्रे व दारुगोळा टाकून पळ काढावा लागला होता. या चकमकीत सहा पोलीस ठार करण्यात आले. कापरखेडकर व गोविंद विठोबा, रा. ना. वाकोडे यांना यामध्ये वीरमरण प्राप्त झाले.

वलाना हे गाव रझाकाराचे केंद्र होते. गोरेगाव पोलीस स्टेशनपासून जवळ होते. त्यामुळे वलाना रझाकार केंद्राला गोरेगाव पोलीस स्टेशनचा फार मोठा आधार होता. रजाकरांनी वलाना गावाच्या आजूबाजूच्या प्रदेशात धुमाकूळ घातला होता. रझाकार व पोलीसांनी येथे आपली सर्व शक्ती एकवटली होती. धानोरा कॅम्पच्या सैनिकांनी बाबुराव भापकर यांच्या नेतृत्वाखाली वलानाच्या रजाकार केंद्रावर जबरदस्त हल्ला केला. या हल्ल्यात आठ रझाकार ठार झाले होते. या हल्ल्यापुढे रजाकरांचा टिकाव लागला नाही म्हणून ते तेथूनच पळून गेले. स्वातंत्र्य सैनिकांनी गडीचा ताबा घेतला व गाडीवर तिरंगा राष्ट्रध्वज फडकला. परंतु गोरेगाव पोलिसांनी मिलिटरीच्या तुकड्याच्या साह्याने वलाना गावावर जोरदार हल्ला करुन गडीवर फडकवलेला तिरंगा ध्वज काढून टाकत निजामाचा झेंडा लावला. नागोबा दारिवार आपल्या सरदारसह सर्व धोका पत्करुन जीवाची बाजी लावली. पोलीस व मिलिटरीचा प्रतिकार केला. या मिलिटरीकडे आधुनिक शस्त्रास्त्रे होती. गावातील लोकांनी हल्ल्याची खबर कॅम्पवर पोहोचवली असता कॅम्पमधील विनायकराव चाटणकर यांनी 60 ते 70 सैनिक वालांना येथे नागोबा दारिवार यांच्या मदतीला आणले. दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. त्यानंतर पोलिसांनी व मिलिटरी सैनिकांनी माघार घेतली होती.

            हिंगोली जिल्ह्यातील नरसी, पुसेगाव, आजेगाव येथे रझाकारांचे केंद्रे होती. रझाकार आणि संस्थान बाहेरुन आणून बसवलेले निर्वासितांनी भयंकर धुमाकूळ घातला होता. याविषयीच्या बातम्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कॅम्पवर येत होत्या. आजेगाव रझाकार केंद्रावर हल्ला करण्याची योजना परभणी जिल्हा कार्यालयावर योजन्यात आली. त्यासाठी लोणी, व्याड, धानोरा व शेंबाळपिंपरी कॅम्पचे विशेष सैनिकी प्रशिक्षण घेतलेले निवडक असे 100 सैनिक एकत्र करण्यात आले. या हल्ल्याचे नेतृत्व परभणी जिल्हा उपप्रमुख गंगाप्रसाद अग्रवाल यांनी केले होते. लोणी कॅम्पचे सैनिकाचे नेतृत्व उपप्रमुख द. रा. मेंढेकर यांनी केले होते. व्याड सैनिक कॅम्पचे प्रमुख बाबुराव जामकर हे होते. धानोरा सैनिक कॅम्पचे नेतृत्व नागोबा दारिवार यांनी केले.  यात बहिर्जी शिंदे, मास्तर फुलाजी आदींसह अनेक सैनिक होते. शेंबाळपिंपरी कॅम्पचे नेतृत्व संभाजी पाटील, अण्णासाहेब टाकळगव्हाणकर, राजाराम निशानकर इत्यादींनी केले होते. 18 जुलै, 1948 रोजी गंगाप्रसाद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली चार कॅम्पचे सैनिक आजेगावाकडे हल्ला करण्यासाठी निघाले. आजेगाववर हल्ला होणार असल्याची बातमी ज्यावेळेस मिळाली त्यांनी हल्ल्याचा प्रतिकार करण्याची सर्व तयारी केली. स्वातंत्र सैनिकांनी आजेगाव येथे असणारे पोलीस व रजाकारांवर हल्ला केला. परंतू त्याच वेळी हिंगोलीहून गोळकोंडा मिलिटरी रेजिमेंटचे  सैनिक आजेगाव येथे आले होते. त्यांनी खंदक खोदून मोर्चा बंदी केली होती. गावाच्या ज्या लोकांनी फितुरी केली त्यांना त्या गावाच्या लोकांनी झाडाला बांधून ठेवले होते. गंगाप्रसाद अग्रवाल यांनी अशा अनेक गुप्त  योजनाही आखल्या होत्या. आपल्या सैनिकाच्या  दोन तुकड्या केल्या.  यांनी रजाकारवर हल्ला करावा असा आदेश दिला. एक तुकडी समोरुन वेशीकडे आणि दुसरी तुकडी पिछाडी वरुन हल्ला करणार अशी योजना केली. रा.रा.मेंढेकर यांनी या तुकडीच्या मागील बाजूने व गंगाप्रसाद आग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली धानोरा कॅम्पच्या तुकडीने समोरच्या बाजूने हल्ला करावा असा निर्णय झाला. रजाकरांना  सर्व गावातून घेरले होते. गावातील तटबंदीला प्रत्येक घरात घराघराच्या मातीच्या भिंतीला छिद्र पाडून मारायच्या जागा ठरवल्या होत्या. वेशीच्या दोन्ही बुरुजावर पहारा लावला होता. वेशीचे दार बंद करण्यात आले अशा परिस्थितीत सैनिकांनी तळ्याचा आश्रय घेतला होता. ही लढाई तीन चार तास चालली होती. दिगाजी आडेकर, फुलाजी आणि मारुती निराळे शत्रूच्या गोळ्यांनी जखमी झाले होते. या धामधुमीत या जखमी सैनिकांना सुरक्षित स्थळी हलविणे व त्यांच्या जवळच्या शस्त्राचा इतर सैनिकांना वापर करण्याची जबाबदारी युवा असलेल्या बहिर्जी यांनी सांभाळली होती.  शत्रूचा अंदाज घेण्यासाठी डोक्यावरचे हेल्मेट काढून गावाच्या वेशीकडे उंचावून बघितले असता शत्रूची गोळी कानामध्ये लागून आरपार निघून गेल्याने बहिर्जी शिंदे खाली कोसळले. त्यावेळी  गंगाप्रसाद अग्रवाल यांनी सर्व सैनिकांना माघार घेण्यास सांगत, सर्व जखमी सैनिकांना सुरक्षित स्थळी आणले व  कॅम्पकडे वाटचाल केली. परंतु दुर्दैवाने बहिर्जी शिंदे यांचा वाटेतच मृत्यू झाला. वाशीमला त्यांची मोठी अंत्ययात्रा निघाली होती. परंतु गावाच्या मागील बाजूने द. रा. मेंढेकर यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सैनिकांनी आजेगाव काबीज केले. त्यामध्ये 30 ते 40 रजाकार मारले गेले, अनेक जखमी झाले होते. अशा प्रकारचे आजेगाव रणसंग्राम होय. या संग्रामात बहिर्जी शिंदे यांना होतात्म्ये मिळाले.  

वसमत तालुक्यातील सशस्त्र लढ्याचे केंद्र गंगाप्रसाद अग्रवाल आणि बापुराव आपटेकर चालवीत होते. वापटी या गावी पोलीस चौकी असल्याने सुरक्षिततेसाठी गंगाप्रसाद अग्रवाल यांनी पांगरा शिंदे येथील माळावर रामचंद्र जोशी यांच्या शेतात केंद्र हलवले. पोलिसांच्या त्रासामुळे नंतर वसमत तालुक्यातील दगड धानोरा ता. पुसद जि. यवतमाळ येथे कॅम्प घेण्यात आला. बापुराव आपटेकर यांनी धानोरा कॅम्प प्रमुख नागोबा दारिवार यांची उपप्रमुखपदी नेमणूक केली. नागो वादळ यांना चार आठवड्यात या विशेष प्रशिक्षणासाठी परळी येथे पाठविण्यात आले होते. त्याचप्रमाणे नागोबाजी, बहिर्जी वापटीकर, नागोराव मास्तर, बन्सीलाल शर्मा यासारख्या अनेक सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी नागपूर व जबलपूर येथे पाठविण्यात आले. नागोबा अलसटवार यांनी परभणी जिल्ह्यात सर्व कॅम्पवर शस्त्रास्त्रे आणण्याचे काम यशस्वीरित्या पार पाडले होते. या कॅम्पच्या सैनिकांनी हिंगोली तालुक्यातील मुलना, वाढवणा, वाघजळी, आजेगाव, जयपूर येथील रजाकार केंद्रावर हल्ले केले होते. तसेच जिंतूर तालुक्यातील बामणी येथील ठाण्यावरील हल्यात 4 मे, 1948 रोजी विनायकराव चारठाणकर आदीं सैनिकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता.

हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या सशस्त्र लढ्यात वसमत तालुक्यातील आजेगाव अग्रेसर होते. स्वातंत्र्य चळवळीचे वापटी हे ज्वलंत केंद्र होते. या गावात दहशत बसवण्यासाठी निजाम सरकारने या गावी पोलीस चौकी स्थापन केली होती. पोलीस चौकीचे सशस्त्र लष्कराचा फार मोठा अडथळा होऊ लागला म्हणून या पोलीस चौकीवर हल्ला करुन ती उद्ध्वस्त करण्याची योजना तयार करण्यात आली. 16 जानेवारी, 1948 च्या रात्री धानोरा कॅम्प प्रमुख बापूराव आपटेकर यांच्या नेतृत्वाखाली बहिर्जी शिंदे, नागोबा दारिवार, नागोबा आलसटवार, नारायणराव मास्तर यांनी वापटीचे 15 ते 20 सैनिकांनी पोलीस चौकीवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर निझाम सरकारला पोलिसांची  चौकी तेथून हलवावी लागली होती.

30 जून 1948 च्या रात्री गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली धानोरा कॅम्पच्या 30 ते 40 सैनिकांनी शिरड शहापूरच्या पोलीस स्टेशनवर आणि फौजदारावर हल्ला केला. यापूर्वी कुरुंदा पोलीस स्टेशन व तेथील फौजदारावर हल्ला करण्याचे ठरले होते. ऐनवेळी माळ या गावाच्या काही लोकांनी सैनिकांना साथ देण्यास नकार दिल्याने सैनिकानी शिरड शहापूरकडे आपला मोर्चा वळवला. सैनिकांनी रात्री पोलीस स्टेशनवर  हल्ला केला. यात 3  पोलीस ठार झाले व इतर पोलीस तेथून पळ काढण्यात यशस्वी झाले होते. या हल्ल्यामुळे निझामी पोलिसात चांगलीच दहशत स्वातंत्र्य सैनिकांची पसरवली होती.

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्याच्या शेजारी शेंबाळपिंपरी ता. पुसद जि. यवतमाळ येथे 10 नोव्हेंबर 1947 रोजी शेंबाळपिंपरी कॅम्पची स्थापना करण्यात आली होती. हैदराबाद स्टेट काँग्रेसचे कळमनुरी तालुकाप्रमुख व संघटक दिपाजी पाटील यांची शेंबाळपिंपरी कॅम्पच्या प्रमुख पदी नेमणूक केली होती. याबरोबरच उपप्रमुख म्हणून पुरभाजी पाटील यांची पण नेमणूक करण्यात आली होती . या कॅम्पमधील सैनिकांना गनिमी पद्धतीने हल्ले करणे, रायफल व स्वयंचलित शस्त्रे चालविणे, शस्त्रे तयार करणे व त्यांचा वापर करणे, जिलेटीन  लावणे, त्याचा वापर करणे इत्यादीचे  विशेष प्रशिक्षण देण्याचेकाम या कॅम्प मध्ये करण्यात येत होते. गुप्त कारवाईमध्ये कसा भाग घ्यावा याचेही प्रशिक्षण या कॅम्पमधील सैनिकांना दिले जात होते. यामध्ये अण्णासाहेब टाकळगव्हाणकर, नारायणरावजी, खंडेराव सूर्यवंशी, गोविंदराव चन्नेवार यांनी विशेष प्रशिक्षण नागपूर येथून घेतले होते. विशेष प्रशिक्षण घेतलेल्या सैनिकांना कळमनुरी तालुक्यातील करोडगिरी नाके व रझाकार केंद्र यांच्यावर हल्ले करुन ती उद्ध्वस्त करण्यासाठी नियुक्त केले जात होते. शेंबाळपिंपरी कॅम्पच्या सैनिकांनी रझाकार केंद्र पोलीसांवर हल्ले करुन मोठ्या प्रमाणात यश संपादन केले होते.

कळमनुरी तालुक्यातील पैनगंगा नदीच्या काठावर गाडीबोरी येथे करोडगिरी नाका होता. गाडीबोरी येथील पोलीस चौकी मजबूत होती. या नाक्याचा प्रमुख अत्यंत जाचक होता. त्याने परिसरातील जनतेवर अन्याय-अत्याचार चालविले होते. त्यावेळी शेंबाळपिंपरी कॅम्पच्या सैनिकांनी  या नाक्यावर हल्ला करुन तेथील निझामी नाका प्रमुखास धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. करोडगिरी नाक्यावरील हल्ल्याचे नेतृत्व करण्यासाठी विठ्ठलराव नाईक चिंचोलीकर या तरुण तडफदार सैनिकांची नेमणूक करण्यात आली होती. रामवाणी यांच्या टेहळणी पथकातील गुप्तहेरांनी नाक्याची इत्यंभूत माहिती मिळवली होती. विठ्ठलराव नाईक हे कामाठ्याच्या वेशात वेषांतर करुन कामाठ्याच्या वेषांत नाक्यावर गेले. नाकेदार व त्यांचे साथीदार वेसावध असतांना अकस्मात करोडगिरी नाक्यावर हल्ला केला. सैनिकांनी नाक्याला वेढा दिला, नाका पूर्णपणे जाळून टाकण्यात आला, या हल्ल्यात नाकेदार व त्याचे साथीदार मारले गेले. यामुळे निजामी पोलिसांनी दिपाजी पाटील, विठ्ठलराव नाईक यांच्यावर खुनाचा आरोप ठेऊन त्यांच्या नावाचे अटक वारंट काढले होते. परंतू निजाम पोलिसांना त्यांना पकडणे शक्य झाले नाही.

शेंबाळपिंपरी कॅम्पपासून 3 ते 4 मैल अंतरावर गोळमांजरी गाव आहे. शेंबाळपिंपरी कॅम्प दिपाजी पाटील, नागोराव धांडेकर, रावसाहेब वडगावकर, मारोतराव नाईक यांच्या नावाने निजामी पोलिसांचे वारन्ट काढले होते. दिपाजी पाटील व रावसाहेब वडगावकर यांना तर जिवंत पकडण्यासाठी 10 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. हे बक्षीस मिळविण्यासाठी रजाकारांनी एक गुप्त डाव रचला होता. यातील एका रजाकार वेषांतर करुन गोळमांजरी येथे आला होता. रजाकारांनी येथील स्त्रियांवर अत्याचार केला आहे, ही बातमी दिपाजी पाटील यांना कळताच त्यांच्या नेतृत्वातील स्वातंत्र्य सैनिक पैनगंगेच्या तीरावर गेले. दिपाजी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी नदीकाठच्या भागाची पाहणी केली असता, त्यांना नदीकाठावर दबा धरुन बसलेला रजाकार दिसला. त्यांनी वेशांतर करुन आलेल्या रजाकरांना बेदम मारहाण करुन त्यांचे  खरे रुप लोकांसमोर उघड केले. पैनगंगा नदी पलीकडच्या दरडी आड लपलेल्या इतर रजाकरांच्या हे लक्षात येऊ लागले होते. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्य सैनिक त्यांच्याकडे येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी गोळीबार केला. यामध्ये दिपाजी पाटील थोडक्यात बचावले, दोन्ही बाजूने गोळीबार सुरु झाला. यामध्ये 3 रजाकार ठार झाले आणि कित्येक जण जखमी झाले होते.

            निजाम सरकारच्या पोलिसांनी मिलिटरी सैनिकाच्या व रजाकारांच्या मदतीने 26 एप्रिल, 1948 रोजी गांजापूर या गावावर हल्ला करण्यात आला होता. ही बातमी शेंबाळपिंपरी येथील कॅम्पच्या गस्ती पथकाला कळताच पथकातील  सैनिक जनतेच्या मदतीला गेले. यावेळी कॅम्प सैनिकांनी आणि शेतकऱ्यांनी पोलीस व रजाकरांना घेरण्याचा निर्णय घेतला. त्यात रझाकारांनी प्रतिकार केला, या हल्ल्यात निजामाचा 1 सैनिक ठार झाला तर 5 जण जखमी झाले होते.

हिंगोली जिल्ह्यातील जयपूर हे रझाकारांचे बलाढ्य केंद्र होते. या ठिकाणी एक कोडगिरी नाका व पोलीस चौकी होती. विनायकराव चारठाणकर यांच्या नेतृत्वाखाली लोणी, ब्याड, धानोरा व शेंबाळपिंपरी येथील कॅम्पच्या सैनिकांनी संयुक्तपणे 29 ऑगस्ट, 1948 रोजी जबरदस्त हल्ला केला. या हल्यात जयपूर रजाकार केंद्र पोलीस चौकी, कोडगिरी नाका उद्ध्वस्त करुन 18 रझाकार  ठार केले होते. या मोहिमेत वसंतराव चौधरी, ध. रा. मेंढेकर. नंदराव कौसडीकर, दीपाजी पाटील, कुंडलिक, मनोहर कुलकर्णी, पंडितराव देशपांडे, राजेश्वर वांगीकर, गंगाधर जोशी, रावसाहेब वालूरकर, रामराव काणेकर आदींनी भाग घेतला होता .

            प्रसिध्द ज्योतिर्लिंगाचे पवित्र स्थान असलेल्या औंढा नागनाथ येथे 12 मार्च, 1948 रोजी महाशिवरात्र उत्सवप्रसंगी रात्री रथ प्रदक्षिणेचा सोहळा सुरु होता. सोहळ्यात सुमारे 50 हजार भाविक सहभागी होते. पोलीस व रजाकार बंदोबस्ताच्या निमित्ताने हजर होते. भक्तीरसात भाविक बुडाले असतानाच रझाकारांनी रथाच्या पुढे बाम्व टाकला. त्यात रामचंद्र शंकरराव पाठकचा देह छिन्नविछिन्न झाला. शेकडो जखमी झाले. यावेळी काळोखाचा फायदा घेऊन रझाकारांनी लुटालूट व अत्याचार केले. या घटनेत रामचंद्र पाठक,  रंगनाथ रघुनाथराव सूरवाडकर व गणपतराव एकनाथराव ऋषी हे हुतात्मे झाले.

            भारताचे स्वातंत्र्य जसजसे दृष्टिपथात येऊ लागले तसतशी निजामाची सार्वभौमत्वाची महत्वाकांक्षा वाढू लागली. 15 ऑगस्ट, 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण निजाम भारतात विलीन झाला नाही. म्हणून हैद्राबाद मुक्तीलढ्याची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढू लागली. रझाकारांचे जूलमी अत्याचार चालूच होते. अशात 29 ऑगस्ट, 1948 रोजी हैद्राबादमध्ये भरचौकात ‘इमरोज’ या दैनिकाचा देशभक्त तरुण संपादक शेएब-उल्ला-खान याचा हातपाय तोडून रझाकारांनी कासीम रझवीच्या इशाऱ्यावर निर्घृण खून केली. निजाम बघ्याचीच भूमिका घेत होता. कासीम रझवी हा लाल किल्ल्यावर आसफिया ध्वज फडकावण्याच्या वल्गना करीत होता. या आणीबाणी सदृश्य परिस्थितीची दखल घेऊन सरदार वल्लभभाई पटेल यांना पोलीस ॲक्शनचा आदेश द्यावा लागला. याला ‘ऑपरेशन पोलो’ हे नाव देण्यात आले होते. 13 सप्टेंबर, 1948 रोजी त्याची सुरुवात झाली. 17 सप्टेंबर, 1948 रोजी त्याची समाप्ती झाली. निजामाला शरणागती पत्कारावी लागली. आणि हैदराबाद संस्थान मराठवाड्यासह स्वतंत्र भारतात विलीन झाले.

 

                                                                                    संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

****

No comments: