18 December, 2024
अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन
• कार्यशाळेत दिली स्टँड अप योजनेची माहिती
• महाज्योती संस्थेमार्फत लाभार्थ्यांना टॅबचे वाटप
हिंगोली (जिमाका), दि. 18 : येथील सामाजिक न्याय भवनामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने मार्जिनमनी-स्टँडअप इंडिया योजनेअतंर्गत अनुसूचित जातीच्या नवउद्योजकांसाठी मेळावा, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कार्यशाळा तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या संस्थेमार्फत जेईई, नीट, एमएचटी-सीईटी प्रशिक्षण घेणाऱ्या विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना टॅब वाटप कार्यक्रमाचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरकारी अभियोक्ता संतोष कुटे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपप्रबंधक अजय गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक मदन पवार, बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोवंदे, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक समितीचे अशासकीय सदस्य जयाजी पाईकराव, भास्कर वाठोरे, संजय काळे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची जाणीव जागृती होण्यासाठी व जातीय सलोखा वृद्धिंगत होण्यासाठी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोवंदे यांनी बार्टी या संस्थेमार्फत अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची जनजागृती करण्यासाठी एक दिवसाची कार्यशाळा घेण्यात आली आहे. समाजाची मानसिकता बदलण्यासाठी या कायद्यांतर्गत असलेली सुरक्षा व मिळणारे लाभ याबाबत जाणीव जागृती होणे आवश्यक असल्याचे सांगितले. जिल्हा सरकारी अभियोक्ता संतोष कुटे यांनी अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा हा त्या समाजातील नागरिकांच्या कल्याणासाठी आहे. त्यामुळे नागरिकांनी हा कायदा समजून घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक मदन पवार यांनी घडलेल्या उदाहरणासह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची माहिती दिली.
अशासकीय सदस्य जयाजी पाईकराव यांनी अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा उपयोग करुन पीडित कुटुंबाचे पुनर्वसन झाले पाहिजे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यांना शासनाकडून मिळणारे आर्थिक लाभ, घरकुल यासारखे लाभ मिळवून देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची गरज असल्याचे सांगितले.
स्टेट बँक इंडिया बँकेचे उपप्रबंधक अजय गायकवाड यांनी स्टँडअप योजनेतून कोणकोणते उद्योग उभारता येतात. त्यासाठी लागणारे कर्ज घेण्यासाठी कोठे अर्ज करावे, लागणारी कागदपत्रे याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले. तर सूत्रसंचालन बार्टीचे समतादूत सुरेश पठाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी 300 ते 350 नवउद्योजकांना मार्गदर्शन व 60 लाभार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment