10 December, 2024

‘महाज्योती’च्या संशोधकाने सोयाबीनवरील रोगावर शोधला उपाय डॉ. गोविंदा सांबळे यांचे तांबेरा रोगावर उपयुक्त संशोधन

• सोयाबीन उत्पादकतेत वाढ • शेतकऱ्यांना मिळणार दिलासा हिंगोली (जिमाका), दि. 10 : राज्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची खरीप हंगामात लागवड केली जाते. सोयाबीनला खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखले जाते. सोयाबीन उत्पादक शेतकरी या अल्पावधीत काढणीला येणाऱ्या पिकाची लागवड करून चांगले उत्पन्न प्राप्त करत असतात. अशातच हवामान बदल व पावसाची अनियमितता यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. अशातच तांबेरा रोगाने मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची सोयाबीन पिके वाचविण्यासाठी होत असलेल्या धडपडीला लक्षात घेऊन महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (‘महाज्योती’) चे संशोधक डॉ. गोविंदा राजेंद्र साबळे यांनी प्रतिबंधात्मक उपाय शोधून काढण्यासाठी प्रयत्न केला आहे. डॉ. गोविंदा साबळे यांनी तांबेरा रोगावरही उपयुक्त संशोधन केले आहे. तसेच सूर्यप्रकाश अवधी कमी-अधिक (फोटोपिरिओडीझम) असला तरी उत्पादनात परिणाम होणार नाही. याशिवाय उत्पादकतेत वाढ होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. ‘महाज्योती’मार्फत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्यात येत आहे. अहिल्यानगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे प्राध्यापक डॉ. व्ही. पी. चिमोटे यांच्या मार्गदर्शनात डॉ. गोविंदा साबळे यांनी आपला प्रबंध ५ वर्षात यशस्वीरित्या पूर्ण केला. पुण्यातील हवेली तालुका चिखली येथे राहणारे डॉ. गोविंदा साबळे यांच्या पीएचडीचा विषय ‘जेनेटिक अँनालिसिस ऑफ फोटोपेरिओड इंसेन्सिटिविटि, लांग जुवेनाइल एंड रस्ट रेजिस्टेंस ट्रेट इन सोयाबीन’ असा होता. महाराष्ट्रातील प्रमुख पिकामधील एक पिक म्हणजे सोयाबीन आहे. सोयाबीन हे एक सूर्यप्रकाशाभोवती संवेदनशीलता दाखवणारे पिक आहे. गेल्या काही वर्षापासून वातावरणातील बदलामुळे मान्सूनच्या आगमनाची वेळ सातत्याने बदलत आहे. अशातच सोयाबीन पेरणी उशिरा झाल्यास त्याच्या उत्पन्नात घट होते. उत्पन्न घटण्याचे कारण हे प्रामुख्याने त्याला लागणाऱ्या सूर्य प्रकाशाच्या अवधीवर अवलंबून आहे. विशिष्ट अवधीप्रमाणे पिकाला सूर्यप्रकाश न मिळाल्यास (11.8 तासांपेक्षा कमी ) पिकाच्या फुलोरा अवस्थेवर आणि परिपक्वतेवर परिणाम होऊन त्याची उत्पादन क्षमता घटते. त्यामुळे त्यांनी या संशोधनामध्ये अशा काही जनुकांचा (QTL) शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही जनुके पिकांच्या फुलोरा येण्यास कारणीभूत ठरतात. ही जनुके (E1, E2, E3, E4, E6) आपणास प्रामुख्याने EC 3909977 व AGS 25 या प्रजातीमध्ये आढळतात. या प्रजातींचे आपल्या भागात येणाऱ्या सोयाबीन पिकात (KDS-753 व JS-2098) संक्रमण करून जनुक हस्तांतर करता येते. तसेच जनुक हस्तांतर केल्यामुळे त्याची फुलोरा येण्याची क्षमता व उत्पन्न हे सूर्य प्रकाशाच्या अवधीवर अवलंबून राहणार नाही. यासाठी डॉ. गोविंदा साबळे यांनी दोन विभिन्न प्रजातीचे संक्रमण केले (JS-2098 x EC 390977 व KDS 753 x AGS 25). त्यापासून भेटणारे बिज पुढील 3 हंगाम क्षेत्रीय चाचणीकरिता पेरणी केल्यानंतर जनुकांचे लॅबमध्ये विश्लेषण केले. संक्रमणानंतर मिळालेले बीज डॉ. गोविंदा साबळे यांनी विद्यापिठातील संशोधन केंद्राला सादर केले आहे व पुढील चाचणी कृषी संशोधन केंद्र, कसबे दिग्रस येथे सुरु आहे. पाच वर्षे चालले संशोधन महाराष्ट्रातील सोयाबीन पिकावरील तांबेरा रोगावर डॉ. गोविंदा साबळे यांनी दुसरे संशोधन केले आहे. राहुरी कृषि विद्यापिठाने रोगप्रतिकारक जाती (KDS-753 व KDS-726) निर्माण केल्या आहेत. परंतु कालांतराने या जातींची रोग प्रतिकारक क्षमता कमी झाली आणि उत्पन्न घटण्यास सुरुवात झाली. तर त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी डॉ. गोविंदा साबळे कर्नाटकातील धारवाड येथून EC-242104 या जातीचे बियाणे आणले. त्यासाठी डॉ. गोविंदा साबळे यांना ‘महाज्योती’ने अर्थसहाय्य केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला. या जातीचे संक्रमण आपल्या भागातील प्रामुख्याने येणाऱ्या KDS-753 या जातीसोबत केले व त्यापासून भेटणाऱ्या बियांची चाचणी ही कृषी संशोधन केंद्र, कसबे दिग्रज येथे केली. या चाचणीमध्ये येणाऱ्या बीज उत्पादनाची तांबेरा रोग प्रतिकारकक्षमता वाढल्याचे निदर्शनास आले. डॉ. गोविंदा साबळे यांना संशोधनात जवळपास ५ वर्षाचा अवधी लागला. या काळात ‘महाज्योती’ने 2021 पासून त्यांना अर्थसहाय्य केले. त्यामुळे डॉ. गोविंदा साबळे यांचे संशोधन पूर्ण झाले. वरील केलेल्या संशोधनामधून आगामी काळात नक्कीच नव्या सोयाबीन पिकांचे वाण मिळतील. तसेच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. डॉ. गोविंदा साबळे यांना ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले यांच्या सहकार्यासह वडील राजेंद्र साबळे आणि आई संगिता यांचे आभार मानले आहे. तसेच भविष्यात देखील ‘महाज्योती’ संस्थेकडून मिळणाऱ्या फेलोशिपचा संशोधकांना फायदा होणार, असा विश्वास डॉ. गोविंदा साबळे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा : राजेश खवले ‘महाज्योती’मार्फत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य करीत आहे. त्यामुळेच आज महाज्योतीच्या मिळालेल्या अर्थसहाय्यामुळे विविध क्षेत्रात महाज्योतीचे विद्यार्थी यशस्वी संशोधन करीत आहेत. अशातच आज कृषी विज्ञानावर डॉ. गोविंद साबळे यांनी सोयाबीन पिकांवर केलेले यशस्वी संशोधन हे कृषि क्षेत्राला प्रगती पथावर नक्की नेणार. डॉ. गोविंदा सांबळे यांचे तांबेरा रोगावर उपयुक्त संशोधनातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार तसेच पिकांची नासाडी होणार नाही. याशिवाय सूर्यप्रकाश अवधी कमी-अधिक असला तरी सोयाबीन पिक आणि उत्पादनात परिणाम होणार नाही, असे अनोखे संशोधन डॉ. साबळे यांनी केले असून अभिमानास्पद आहे. त्यांनी महाज्योतीसह देशाचा नावलौकिक करण्याचे काम केले आहे. महाज्योतीकडून मिळणाऱ्या विद्यावेतनातून राज्यातील हजारो विद्यार्थी हे प्रगती पथावर गेले आहे. महाज्योतीने आता ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) मध्ये 37 हजार रुपये व सीनियर रिसर्च फ़ेलोशिप (एसआरएफ) करिता 42 हजार रुपये प्रतिमाह दराने अधिछात्रवृत्तीची रक्कम तसेच घरभाडे भत्ता 30 टक्के, 20 टक्के व 10 टक्के या सुधारित दराने देण्यात येत आहे. पीएचडी संशोधकांची भरीव कामगिरी ही देशाला प्रगतीपथावर नेणार, असे महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले म्हणाले. ******

No comments: