07 December, 2024

प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षणानंतर उद्योग सुरु करावेत– जिल्हाधिकारी अभिनव गोयल

हिंगोली(जिमाका), दि. 6 : प्रशासन आपल्या पाठीशी असून प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण घेऊन आपले उद्योग सुरु करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उमरा (ता. कळमनुरी) येथील उगम ग्रामीण विकास संस्था येथे एकात्मिक आदिवासी विकास विभाग, उगम ग्रामीण विकास संस्था, देसाई फाउंडेशन ट्रस्ट आणि अझीम प्रेमजी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल आणि पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, एकात्मिक आदिवासी विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी उमाकांत कोटूरवार, नाबार्डचे अविनाश लहाने, तहसीलदार जिवक कांबळे, उप विभागीय कृषि अधिकारी प्रदीप कच्छवे, तालुका कृषि अधिकारी एम. व्ही. कुंभार, देसाई फाउंडेशन ट्रस्टचे प्रतिक पारेख, पुणे येथील द्युवन रे फाउंडेशनचे श्रुती डिंबळे, नेहा सिन्हा, उगमच्या सुशिला पाईकराव, रेखाताई साठे तसेच जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार 'उगम'चे संस्थापक अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी मानले. या कार्यक्रमात कृषी पूरक उद्योजकता प्रशिक्षण, फुले-शाहू-आंबेडकर अभ्यासिका, हिरोज फॉर ह्युमॅनिटी प्रकल्प, जल सुरक्षा कार्यक्रम आणि कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला. कौशल्य विकास प्रशिक्षणामध्ये शिवणकाम, ब्युटी पार्लर, आणि मूलभूत संगणक प्रशिक्षणाचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी, विद्यार्थी, आणि महिलांना विविध रोजगार आणि शैक्षणिक संधी उपलब्ध होणार असून, ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गुणरत्न पतंगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत पाईकराव, सुशांत पाईकराव, शितल कांबळे, दिशांत पाईकराव, राम खंदारे, क्रांती पाईकराव, भीमराव पाईकराव, सिद्धार्थ निनुले, बालाजी मोरे, संघदीप हरणे, विश्वास रावते, सुमेध हरणे, आकाश पतंगे, गंगाधर ठोंबरे, दत्ता भोयर, श्रीकांत भोयर व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. *******

No comments: