08 December, 2025
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजदिन निधी संकलनाला प्रारंभ, माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध-- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (जिमाका), दि. 08 : देशात शांतता व अखंडता टिकवून ठेवण्याचे काम सीमेवरील सैनिकांनी स्वत:च्या शौर्याने, धैर्याने कमीत कमी साधनसामग्रीद्वारे चांगल्या प्रकारे करत आहेत. आपल्या कुटुंबियांची पर्वा न करता अविरतपणे सेवा करत आहेत. त्यांच्या बलिदानामुळेच आपण सुरक्षित आहोत, असे सांगून माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी सांगितले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलन प्रारंभाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, सहायक जिल्हाधिकारी योगेश मीना, निवासी उपजिल्हाधिकारी तथा सैनिक कल्याण अधिकारी अभिमन्यू बोधवड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता पुढे म्हणाले, सर्व सैनिकांविषयी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यावर्षी 31 लक्ष रुपये ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट होते. 41 लक्ष रुपये ध्वजदिन निधी संकलन करुन ध्वजदिन निधी संकलनामध्ये 133 टक्के उद्दिष्ट पूर्ण करुन जिल्ह्याचा नावलौकिक केला आहे. त्यामुळे सर्वांचे अभिनंदन केले. तसेच पुढील वर्षीही राज्यात सर्वाधिक ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करु, असे सांगून जिल्ह्यातील सैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी, तक्रारी, गाऱ्हाणी, वेतन व इतर सोयीसुविधांच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी लवकरच बैठक घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी आपल्या देशाचे सैनिक आपल्या प्राणाची बाजी लावून दुर्धर परिस्थतीत देशाचे रक्षण करतात. त्या सैनिकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रम घेण्यात येतो. निधी संकलनाचे उदि्दष्टापेक्षा जास्त निधी संकलन केल्यामुळे सर्व यंत्रणेचे अभिनंदन केले. तसेच माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिबिरे घेऊन प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा सैनिक कल्याण अधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी संरक्षण दलाचे जवान व अधिकारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अहोरात्र देशाच्या सीमांचे रक्षण करतात. त्यामुळेच आपण सुखी जीवन जगत असतो, या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या निधीतून माजी सैनिक, शहीद जवान अधिकारी यांचे कुटुंबियासाठी विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्यात येते. हिंगोली जिल्ह्याने यावर्षी 133 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहेत. त्यामुळे सर्व यंत्रणेचे अभिनंदन केले. त्यामुळे पुढील वर्षाचे उद्दिष्ट कालावधीची वाट न पाहता वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले व देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकाप्रती दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच यावेळी मातोश्री गंगादेवी देवडा निवासी अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या चमूने स्वागत गीत व देशभक्तीपर गीत सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. यावेळी ध्वजदिन निधी संकलनाचे उत्कृष्ट कार्य केलेल्या कार्यालय प्रमुखांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. शहीद सैनिक गणपत भिकाजी रणवीर यांच्या मातेचा साडीचोळी देवून सत्कार केला. तसेच पतीच्या वाढदिवसानिमित्त एक महिन्याचे निवृत्तीवेतन ध्वजदिन निधीसाठी दिल्यामुळे सरस्वती बैरागी यांचा, माजी सैनिक चंपतराव कदम यांचा सपत्नीक तर माजी सैनिक मारोतराव टाक व सय्यद मीर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशोर इंगोले यांनी केले. तर आभार प्रदर्शन तुकाराम मुकाडे यांनी केले.
या कार्यक्रमास वीर माता-पिता, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी उपस्थित होते.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment