20 May, 2025
जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू
हिंगोली (जिमाका), दि. 20 : मे महिन्यात हिंगोली जिल्ह्यात होणाऱ्या विविध सण-उत्सव, स्पर्धा आणि सभा, बैठका, धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी अनिल माचेवाड यांनी दिले आहेत.
दि. 28 मे,2025 रोजी सावरकर जयंती, दि. 29 मे रोजी महाराणा प्रताप जयंती तिथीप्रमाणे तसेच विविध देवी देवतांच्या वार्षिक यात्रा, उत्सव, अखंड हरिनाम सप्ताह, शंकर पटाच्या शर्यती, कब्बडी, कुस्ती, संदल आयोजित करण्यात येतात. तसेच मराठा आरक्षण व इतर आरक्षण संबंधाने घडणाऱ्या राजकीय घडामोडी, नागरिक, विविध संघटना, पक्ष यांच्या मागण्यासंदर्भात मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दि. 14 मे, 2025 रोजी मध्यरात्रीपासून ते दि. 29 मे, 2025 रोजी मध्यरात्रीपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्याजवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तूजवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटकद्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल, अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना जाणून बुजून दुखावतील, या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
******
19 May, 2025
‘‘एल्डर लाईन 14567’’ ज्येष्ठांसाठी मदतीचा आधार
हिंगोली (जिमाका), दि. 19 : सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारच्या सहकार्याने ‘‘एल्डर लाईन 14567’’ ही सेवा देशभरात वयोवृद्धांसाठी सुरू करण्यात आली आहे. जनसेवा फाऊंडेशन, पुणे यांच्यामार्फत ही सेवा महाराष्ट्रात राबवली जाते. मानवसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन जनसेवा फाऊंडेशन गेली 37 वर्षापासून सातत्याने विविध प्रकल्पाद्वारे गरीब, आजारी, वृध्द, अपंग, निराधार, गरीब मुले-मुली आणि महिला यांची सेवा करीत आहेत. जनसेवा फाऊंडेशनला संयुक्त राष्ट्रसंघाचा विशेष दर्जा प्राप्त आहे.
महाराष्ट्रात 14567 राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाईन सेवेची अंमलबजावणी ऑगस्ट 2021 पासून सुरू झाली आहे. या 14567 राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाईनवर आतापर्यंत 4 लाखांहून अधिक कॉल्स आले असून 30 हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष मदत करण्यात आली आहे.
या हेल्पलाईनद्वारे आरोग्य, पोषण, निवारा, आश्रयगृह व वृध्दाश्रम, डे केअर सेंटर याबाबतची माहिती देण्यात येते. तसेच कायदेविषयक, मालमत्ता व कौटुंबिक वादांमध्ये मोफत कायदेशीर सल्ला, पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 बाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. मानसिक आजार व चिंता, ताण, राग इत्यादी व्यवस्थापनाबाबत त्यांना भावनिक आधार दिला जातो. तसेच बेघर व अत्याचारग्रस्त वृध्दांसाठी मदत आणि पुनर्वसन, कुटुंबियांशी संवाद, पुनर्स्थापनेसाठी प्रयत्न, पोलीस प्रशासनाशी समन्वय व समुपदेशन आदी सेवा मोफत पुरविल्या जातात.
"घरात आम्ही दोघं एकटेच, मुलगा परदेशात आहे…", "नातेवाइकांनी आमचं घर बळकावलंय…", "कुटुंबात कुणाशी बोलणंच होत नाही…" अशा असंख्य व्यथा, वेदना, तक्रारी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक "एल्डर लाईन" हेल्पलाइनवर मोकळेपणाने मांडत आहेत.
त्यामुळे एल्डर लाईन 14567 ही केवळ हेल्पलाईन नाही तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासाचा हात, एक सुरक्षित आधार आहे. या माध्यमातून वयोवृध्दांच्या गरजा समजून घेतल्या जातात आणि त्यांना सन्मानाने जगता येईल, यासाठी आवश्यक ती मदत दिली जाते. ज्येष्ठांसाठी ही सेवा अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचावी यासाठी समाजातील प्रत्येकाने जागरुक व्हावे आणि सर्व गरजू वयोवृध्दांनी या एल्डर लाईनचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
***
16 May, 2025
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये
हिंगोली (जिमाका), दि. 16 : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 परीक्षा ऑनलाईन पध्दतीने आयोजित केली आहे. त्याची ऑनलाईन आवेदनपत्र दि. 14 मेपर्यंत सादर करण्याचे कळविले होते. त्याबाबत समाजमाध्यमांवर फिरणारा संदेश वा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा-2025 पुढे ढकलण्याबाबत व इतर अडचणीबाबत युट्यूब चॅनल्स, सोशल मिडिया प्लॅटफॉर्मद्वारे व अन्य माध्यमाद्वारे अनाधिकृत बाबी प्रसिध्द होत आहेत. त्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन परीक्षा परिषदेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे मे व जून, 2025 मध्ये आयोजन करण्यात येत असल्याचे दि. 21 मार्च, 2025 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले होते. त्यानुसार पात्र उमेदवारांनी या परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्व तयार करावी, असे आवाहन करण्यात आले होते. या परीक्षा नियोजित केल्याप्रमाणे घेण्यात येणार आहेत. त्यामुळे परीक्षार्थ्यांनी युट्यूब चॅनल्स, सोशल मिडिया प्लॅटफॉर्मद्वारे दिल्या जाणाऱ्या बातम्या, अफवावर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरील वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे. या व्यतिरिक्त अन्य माध्यमातून प्रसिध्द होणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे विद्यार्थ्यांचे, उमेदवारांचे नुकसान झाल्यास महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे कार्यालय जबाबदार असणार नाही. विद्यार्थ्यांनी, उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार कार्यवाही करावी, असे आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
******
इतर परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांची माहिती भरण्यास 21 मेपर्यंत मुदतवाढ
हिंगोली (जिमाका), दि. 16 : सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येत आहे. या परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र दि. 14 मेपर्यंत सादर करण्याबाबत कळविले होते.
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा-2025 या परीक्षेचे आयोजन दि. 24 मे ते 5 जून, 2025 या कालावधीत प्रस्तावित आहे. बीएड व एमएड, महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेस प्रविष्ठ असणाऱ्या विद्यार्थी, उमेदवारांचा परीक्षा कालावधी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या कालावधीत नियोजित असेल तर अशा विद्यार्थी, उमेदवारांनी आपली माहिती विहित नमुन्यात परीक्षा परिषदेने दिलेल्या https://mscepune.in/DTEDOLA/TAIT2025Info.aspx या लिंकद्वारे दि. 14 मेपर्यंत भरण्याबाबत सूचित केले होते. या लिंकवरील माहिती भरण्याची मुदत वाढवून आता दि. 21 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात आली आहे.
उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास व उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील, असे आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
******
महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 16 : राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मूलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी किंवा तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो.
माहे मे, 2025 च्या महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, (दि. 19 मे) रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे.
समस्याग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. एस-7, हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत. यामध्ये न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले, सेवा, आस्थापनाविषयक बाबी, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
******
जिल्हा हिवताप कार्यालयात राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा
हिंगोली(जिमाका), दि. 16 : जनतेमध्ये डेंग्यू आजाराची जनजागृती निर्माण व्हावी, प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणीसाठी जनतेचा सक्रीय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाद्वारे नागरिकापर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात येतो.
यावर्षी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हिवताप कार्यालयात व जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थेत राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पांडूरंग फोपसे मार्गदर्शन करताना समाजातील नागरिकांचा, लोकप्रतिनिधीचा सहभाग घेऊन डेंग्यू आजाराविषयी जनजागृती करावी तर तालुका आरोग्य अधिकारी अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी यावर्षी असलेले राज्य शासनाचे घोषवाक्य "तपासा, स्वच्छ करा आणि झाकुन ठेवा: डेंग्यूला हरविण्याचे उपाय करा" याविषयी सविस्तर माहिती दिली.
जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव यांनी राष्ट्रीय कीटकजन्य आजारांबाबत मार्गदर्शन करून डेंग्यू या आजाराची लक्षणे, उपचार व घ्यावयाची काळजी आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी सी. जी. रणवीर, सांख्यिकीय अधिकारी अजय कदम, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी मारोतराव पोले, मनिषा वडकुते, एस.एस.खोकले, उमेश डाफने, संजय बोरबळे, आनंद माखणे, मारुती गायकवाड, मल्हारी चोफाडे, योगेश डेंग, प्रदीप आंधळे, सी. टी. गायकवाड, पांडुरंग देवकते, सुधाकर मुटकुळे, हकीम शहा आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सन 2024 मध्ये रक्तजल नमुने 255 घेण्यात आले, त्यापैकी 3 रूग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आले. सन 2024 या वर्षात जिल्ह्यातील 38 गावामध्ये धूर फवारणी करण्यात आली. डेंग्यू या आजाराला आळा घालण्यासाठी जिल्ह्यामध्ये विशेष अबेट राऊंड मोहीम घेण्यात आली. यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर यांच्यामार्फत गृह भेटी देऊन कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करून डास आळी आढळून आलेल्या कंटेनरमध्ये अबेट टाकण्यात आले तर काही कंटेनर रिकामी करण्यात आली. आरोग्य शिक्षण दिले गेले. यामुळे डासांच्या सायकलला आळा बसण्यास मदत झाली आहे. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्यात यावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी केले
डेंग्यू आजाराची लक्षणे :
एकदम जोराचा ताप चढणे, अंग दुखणे, स्नायू दुखणे, डोक्याचा पुढचा भाग जास्त प्रमाणात दुखणे, डोके दुखणे, डोळ्याच्या मागील भागात वेदना होणे, मळमळ होणे व उलट्या होणे, त्वचेवर व्रण येणे.
डेंग्यूचा प्रसार :
डेंग्यूची विषाणू संक्रमित एडीस प्रजातीच्या डासाच्या मातीच्या चाव्याद्वारे लोकांमध्ये पसरतात. जगातील जवळपास निम्मी लोकसंख्या सुमारे चार अब्ज लोक डेंग्यूचा धोका असलेल्या भागात राहतात. धोका असलेल्या भागात डेंग्यू हे आजाराचे प्रमुख कारण आहे. एडीस इजिप्ती संक्रमित मादी चावल्यास डेंग्यू हा आजार होतो.
प्रतिबंधात्मक उपाय योजना :
घर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. घराच्या अवती-भवती अथवा टेरेसवर पडलेल्या रिकाम्या कुंड्या प्लास्टिकच्या वस्तू टायर यासारख्या वस्तूमध्ये पाणी साचून त्यात डासाची उत्पत्ती निर्माण होते. त्यामुळे अशी ठिकाणी नष्ट करावीत. खिडक्यांना जाळा बसवाव्यात. शौचालयाच्या वरच्या पाईपास जाळी बसवावी. अंगभर कपडे वापरावी, झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. आठवड्यातून एक दिवस म्हणून कोरडा दिवस पाळावा. वापरण्यात येणारे संपूर्ण पाण्यासाठी कोरडी करावी, जेणकरून डासांनी घातलेली अंडी नष्ट होतील.
*******
14 May, 2025
जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन
हिंगोली (जिमाका), दि. 14 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
********
कृषि निविष्ठा दुकानांची मे अखेरीपर्यंत तपासणी पूर्ण करा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• खरीप हंगाम पूर्वतयारीचा आढावा बैठक
• रेशीम लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करा
• मुबलक कृषि निविष्ठा उपलब्ध असल्याची खात्री करा
हिंगोली (जिमाका), दि. 14: यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतक-यांना बियाणे व खताची खरेदी करताना कंपन्यामार्फत कृषी केंद्र संचालकांकडून लिंकींग करण्यात येणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच सर्व कृषी निविष्ठा दुकानदारांची मे अखेरपर्यंत तपासणी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आढावा बैठकीत संबंधित अधिका-यांना दिले.
बैठकीला आमदार तानाजी मुटकुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, तालुका कृषी अधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम 2025 ची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्ह्यातील खरीप हंगामातील तयारी, बियाणे व खतांची उपलब्धता, कृषी योजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मातीचा पोत सुधारणे आणि शेतीचे आरोग्य वाढविणे यासाठी मृदा परीक्षणासोबतच टप्प्याटप्प्याने रासायनिक खतांवरील शेतीचे अवलंबित्व कमी करताना सेंद्रीय खतांचा वापर वाढविण्यावर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज येथे जिल्हा यंत्रणा प्रमुखांना दिले.
पीक विमा व अतिवृष्टी अनुदानाच्या प्रलंबित लाभार्थ्यांची ई-केवायसी तात्काळ करुन त्यांना अनुदानाचे वितरण करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या विहिरींना मागेल त्याला सौर पंप योजनेतून तात्काळ वीज जोडणी द्यावी. यासाठी योग्य कंपनीची निवड करावी. गारपिटीमध्ये नुकसान झालेल्या सोलारचे सर्वेक्षण करुन ते तात्काळ दुरुस्त करावेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, एसआरएलएम आदी योजनेच्या प्रलंबित प्रस्तावाची बँकनिहाय माहिती तयार करुन द्यावी व ती प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, अशा सूचना केल्या.
रासायनिक खतांच्या वापरामुळे होणाऱ्या पर्यावरणीय व आरोग्यविषयक दुष्परिणामांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी सेंद्रीय खतांचा अधिकाधिक वापर करावा यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिले. खतांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. या खतांचा वापर वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देताना फळबाग लागवड योजना, हळद लागवड, रेशीम शेती क्षेत्र वाढविण्यासाठी विशेष भर द्यावा. त्यासाठी कृषि विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे. त्यासाठी विविध कार्यशाळा, प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करण्यास त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात तुती लागवडीसही चालना मिळावी, शेतकऱ्यांनी त्यामध्ये रस दाखवावा, यासाठी एक हजार एकरावर रेशीमशेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढविण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले.
या वर्षी जिल्ह्यासाठी 73 हजार 293 क्विंटल सोयाबीन बियाण्याची गरज आहे. रासायनिक खतांचा पुरवठाही पुरेशा प्रमाणात राहणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. जिल्ह्यासाठी कापूस बियाण्यांच्या 1 लाख 52 हजार पाकीटांची आवश्यकता आहे.
बैठकीत हळद प्रशिक्षण व संशोधन केंद्र, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, राष्ट्रीय अन्न व पोषण अभियान, प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजना, वैयक्तिक शेततळे, फळबाग योजना, डिजिटल शेती शाळा, माती परीक्षण, महाडीबीटीवरील अर्जवाढ, हिरवळीच्या खतांचा वापर, पिक स्पर्धा, बायोचार योजना, हुमनी कीड नियंत्रण, बीबीएफ पद्धत, शेतकऱ्यांचे व्हॉट्सअॅप गट तयार करून त्यांच्यामध्ये जनजागृती आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.
यावेळी आमदार तानाजी मुटकुळे यांनी जिल्ह्यात सोयाबीन हे मुख्य पीक आहे. परंतु सोयाबीनला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी मका पिकाकडे वळला पाहिजे. यामुळे जनावरांना वैरण सुध्दा उपलब्ध होते. यासाठी शेतकऱ्यांना मका पिकांकडे वळविण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगून हरभरा पिकाचा पिक विमा मिळण्यासाठी सर्व मंडळे समाविष्ट करुन प्रस्ताव पाठवावा. तसेच शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा बियाणे व खताची लिंकींग होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच राखीव साठाही मागणीनुसार तयार ठेवावा, अशा सूचना केल्या.
यावेळी कृषि विज्ञान केंद्रामार्फत दि. 29 मे ते 12 जून, 2025 या कालावधीत विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये कृषी सुवर्ध समृध्दी रथाद्वारे जिल्ह्यातील 90 गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ राजेश भालेराव यांनी दिली.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी सादरीकरणाद्वारे सविस्तर खरीप हंगामपूर्व आढावा सादर केला. शेवटी उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
******
पावसाळ्यात आपत्तीचा सामना करताना योग्य समन्वय ठेवा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा मान्सूनपूर्व तयारी आढावा
• तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करा
हिंगोली (जिमाका), दि. 14 : आगामी पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा प्रभावी सामना करण्यासाठी प्रशासनातील सर्व विभागांनी योग्य समन्वय ठेवावा,असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. कोणतीही परवानगी न घेता अधिकारी मुख्यालय सोडू नयेत,असेही त्यांनी स्पष्ट केले.
मान्सूनपूर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दूरदृष्यप्रणालीव्दारे संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला. यामध्ये जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी आपले कामकाज सुसूत्रपणे पार पाडावे, मदत व पुनर्वसन कार्य तत्काळ सुरू करावे आणि नागरिकांमध्ये जनजागृती वाढवावी, असे निर्देश देण्यात आले.
या बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.चक्रधर मुंगल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नितीन तडस, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेसिंग चव्हाण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, नगर परिषद व नगर पंचायतीचे मुख्याधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी जलद प्रतिसाद पथक, आपत्कालीन संपर्क यंत्रणा, वैद्यकीय सुविधा, पूरप्रवण क्षेत्रातील उपाययोजना आणि जनजागृती मोहिमांवर भर देण्याचे निर्देश दिले. संभाव्य पूरस्थिती, वीज गळती, आरोग्यविषयक आपत्ती आणि सेवा कार्यक्षमतेबाबतही चर्चा झाली. प्रत्येक विभागाला विशिष्ट जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून तातडीच्या उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले.
जिल्ह्यातील पैनगंगा, पुर्णा, कयाधू आणि इतर नद्यांमुळे काही गावांना पूराचा धोका असल्याने संबंधित यंत्रणांनी दक्ष रहावे. 70 पूरप्रवण गावांमध्ये आवश्यक साहित्याची तपासणी करून ठेवावी. पूर परिस्थितीत पुरात अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी बचाव पथके तयार करुन त्यांना प्रशिक्षण द्यावे. 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवून कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक अद्ययावत करावेत. आरोग्य पथकांची नियुक्ती, प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार, मुबलक औषधे, रक्तसाठा, ब्लिचिंग पावडरची साठवणूक यावर भर द्यावा, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.
शहरातील नाल्यांची स्वच्छता, धोकादायक इमारतींची तपासणी, स्थलांतराची पर्यायी व्यवस्था, सुरक्षित स्थळांची निवड याबाबतही निर्देश देण्यात आले. महावितरण, शिक्षण, पशुसंवर्धन व कृषी विभागांनीही आवश्यक उपाययोजना राबवाव्यात.
पाटबंधारे विभागाने धरणनिहाय समन्वय अधिकारी नेमण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी केल्या. तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी ठेवून पूर्वतयारी पूर्ण करावी. वाहन व्यवस्था सुरळीत ठेवावी. नागरिकांनी दामिनी ॲप डाऊनलोड करून विजेपासून बचाव करावा. नगरपालिका प्रशासनाने नाल्यांची सफाई युद्धपातळीवर करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
******
13 May, 2025
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला जिल्हा आरोग्य विभागाचा आढावा
• प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुविधा, औषधसाठा व लसींच्या पुरवठ्याची घेतली माहिती
हिंगोली, (जिमाका) दि.१३: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा बैठकीत घेतला.
प्रामुख्याने संजीवनी अभियानांतर्गत कर्करोग संशयित महिलांची 30 मे पर्यंत पूर्ण तपासण्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्र व पाच उपकेंद्र एनकॉस NQAS करणे,
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ. दीपक मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन राठोड डॉ. काळे, डॉ. कल्पना सुनतकुरे, डॉ अनुराधा दहिफळे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी व सर्व तालुका आरोग्य अधिकारी या बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुविधा, औषधसाठा, लस पुरवठा आणि विविध उपचार सेवा यांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.
बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच एनएचएमचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गुप्ता यांनी प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक यांची संख्या, त्यांची उपस्थिती आणि उपचार सेवा तपासण्याचे निर्देश दिले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात सुधारणा करण्याचे निर्देश
जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांत अद्ययावत सुविधांचा अभाव आहे. यावर चर्चा करताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले, “ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी 30 प्रसूती झाल्या पाहिजेत अशा सूचना देण्यात आल्या, प्राथमिक आरोग्यंद्राच्या ठिकाणी EDD ट्रेकिंग झाली पाहिजे बोर्ड लावण्यात यावा, खाजगी दवाखान्यात मध्ये आलेल्या गरोदर मातेच्या आरसीएच नंबर शासकीय संस्थेमधून रजिस्ट्रेशन करण्यात यावा, डिलिव्हरीचे रेफरल होता कामा नये रेफरल एडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या, आरसीएस पोर्टल सह सर्व पोर्टल अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या, चाचणी यंत्रणा आणि औषधांचा नियमित साठा असणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले.
औषधसाठा आणि लसींच्या पुरवठ्याचा आढावा
बैठकीत TB क्षय रोग, कुष्ठरोग, एनसीडी, माता बाल संगोपन कार्यक्रम, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम, मलेरिया, डेंग्यू, आणि कुपोषणविरोधी औषधांचा साठा तसेच लसीकरण मोहिमेसाठी आवश्यक लसी – जसे की बीसीजी, पोलिओ, DPT, MR – यांचा पुरवठा नियमित आहे का याची माहिती घेण्यात आली. काही तालुक्यांमध्ये औषधसाठ्याचा तुटवडा असल्याचे निदर्शनास आले असून लवकरात लवकर तेथे पूर्तता करण्याचे आदेश देण्यात आले.
एनएचएमअंतर्गत योजनांची अंमलबजावणी तपासली
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मातृमृत्यू दर, बालमृत्यू दर कमी करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती घेण्यात आली. जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी गर्भवती महिलांसाठी ‘जननी शिशु सुरक्षा योजना’ व ‘महिला आरोग्य शिबिरां’च्या माध्यमातून प्रभावी सेवा देण्याचा आग्रह धरला.
आरोग्य जनजागृतीसाठी सूचना
शहरी व ग्रामीण भागात रोगप्रसार रोखण्यासाठी जनजागृती मोहिमा, पथनाट्य, माहितीपत्रके व आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे, असेही त्यांना सांगितले.
*****
जिल्हा प्रशासन राबविणार '5 स्टार हिंगोलीकर' उपक्रम
हिंगोली (जिमाका), दि. १३ : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासन '5 स्टार हिंगोलीकर' हा उपक्रम संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामधील सर्व नगर परिषद व नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये राबवण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत नगर परिषद, नगर पंचायत यांच्या हद्दीतील सर्व घरे, शासकीय कार्यालये, शैक्षणिक आस्थापना, खाजगी आस्थापना इत्यादी ठिकाणी पाच निकषांच्या आधारे स्टार रेटिंग केले जाणार आहे.
यामध्ये पावसाचे जलपुनर्भरण, घराभोवती किमान पाच झाडे, घरामध्येच कचऱ्याचे विलगीकरण, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील रूफ टॉप सोलर पॅनल, नगर परिषदेमार्फत आकारण्यात येणाऱ्या करांचा विहित वेळेमध्ये भरणा करणे या पाच निकषांच्या आधारे पुढील दोन महिन्यांमध्ये सर्व नगर परिषदा, नगरपंचायतीमार्फत घरांचे सर्वेक्षण करून त्यांना स्टार रेटिंग दिले जाणार आहे. तसेच यापुढे होणाऱ्या नवीन बांधकामांमध्ये पाचही निकषांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात संबंधित नागरिकांना प्रोत्साहित केले जाणार आहे.
वरील संकल्पना राबविण्यासाठी जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी यांना पत्राद्वारे सूचना देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले आहे.
***
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी आज शेवटचा दिवस
• नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना पोहोच पावतीच्या आधारे आवेदनपत्र भरता येणार
हिंगोली (जिमाका), दि. 13 : महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येत आहे. या परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्याचा उद्या, दि. 14 मे, 2025 हा शेवटचा दिवस आहे. तसेच ऑनलाईन आवेदन शुल्क भरण्याची मुदत दि. 14 मे, रोजी 23.59 मि. पर्यंत असणार आहे.
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा-2025 परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याकरिता ज्या विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमीलिअर प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केला आहे, अशा उमेदवारांना पोहोच पावतीच्या आधारे आवेदनपत्र भरण्यास परवानगी देण्यात येत आहे. पोहोच पावतीवरील दिनांक हा आवेदनपत्र भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत म्हणजेच दि. 14 मेपर्यंत असेल तर सदर पोहोच पावती ग्राह्य धरण्यात येईल. याच पोहोच पावतीनुसार मिळालेले हे प्रमाणपत्र, या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या माध्यमातून होणाऱ्या पुढील भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येईल, असे आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
***
राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 13 : राज्यात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय डेंग्यू दिन 16 मे रोजी साजरा केला जातो. यानिमित्त डेंग्यूविषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांना सक्रियपणे सहभागी करून घेण्यात येते. विविध उपक्रमांद्वारे नागरिकांपर्यत माहिती पोहचवणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. डेंग्यू दिवस जिल्हा अंतर्गत सर्वत्र साजरा करण्यात येतो.
सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे जिल्ह्यामध्ये दुष्काळगस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळग्रस्त परिस्थतीमुळे पाण्याचा तुटवडा असल्याने लोकांची पाणी साठवण्याची वृत्ती आढळून येते. त्या अनुषंगाने अशा साठवलेल्या पाण्यात एडीस एजिप्टाय डास अंडी घालून डासोत्पती होते. या डासाची उत्पती कमी करणे, नियंत्रणात ठेवणे यासाठी जनतेस आरोग्य शिक्षण देणे आवश्यक आहे. आजाराचे नियंत्रण करण्यासाठी या मोहिमेमध्ये जनतेचा सहभाग आवश्यक आहे. केंद्र शासनाने डेंग्यू या विषयावर 'इंडिया फाईट्स डेंग्यू' हे मोबाईल व अँड्रॉईड ॲप्लीकेशन तयार केले आहे. प्ले स्टोअरमध्ये जाऊन ते डाऊनलोड करुन घ्यावे. यामध्ये डेंग्यूविषयी सर्व माहिती उपलब्ध आहे.
हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय डेंग्यू दिन यशस्वी होण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक यांचा लोकसहभाग घेऊन गावपातळीवरही राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये पत्रकार परिषद, खाजगी वैद्यकीय व्यवसायिक सभा, जलद ताप रुग्ण सर्वेक्षण, तालुकास्तर सभा, सर्व स्तरावर रॅलीचे आयोजन, ग्रामसभेचे आयोजन, बाजाराच्या ठिकाणी प्रदर्शनाचे आयोजन, हस्त पत्रिका वाटप, आशा बळकटीकरणासाठी कार्यशाळेचे आयोजन, कंटेनर सर्वेक्षण, सर्व स्तरावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन, दिंडीचे आयोजन, डासोत्पती स्थानात गप्पी मासे सोडण्याचा धडक कार्यक्रम, सर्व स्तरावरील फवारणी कार्यक्रमाचे पर्यवेक्षण, एक दिवस कोरडा दिवस पाळणे याविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
डेंग्यू,चिकुनगुनिया बाबतची लक्षणे : एडीस एजिप्टाय डासाच्या संक्रमणात्मक चाव्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर डेग्यूंची लागण होते. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक हा ताप अधिक तीव्र स्वरुपाचा असून त्यामुळे मृत्यू ओढावू शकतो. लहान मुलांमध्ये शक्यतो सौम्य स्वरुपाचा ताप येतो. मोठ्या माणसामध्ये अधिक तीव्रपणे तापासोबत डोके, डोळे दुखणे, अंगदुखी, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो.
उपचार : सर्व शासकीय रुग्णालयात मोफत उपचार होतो.
उपाय योजना : डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार हा एडीस एजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी 8 दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालून अंड्याचे रुपांतर डासात होते. त्यानुषंगाने कोणतेही साठवलेले पाणी 8 दिवसापेक्षा जास्त ठेवू नये, ही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
डासोत्पती नियंत्रणासाठी गप्पी माशांची उपयुक्तता, परिसर स्वच्छता, व्यक्तीगत सुरक्षेअंतर्गत मच्छरदाण्यांचा वापर, डासांच्या चाव्यापासून रक्षणासाठी विविध उपाय करण्यासाठी कोरडा दिवस पाळून किटकजन्य आजार डेंग्यू, चिकुनगुनिया आजारावर नियंत्रण ठेवण्यास जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी केले आहे.
***
11 May, 2025
राष्ट्रीय लोकन्यायालयात 4 कोटी 97 लाखांची 105 प्रकरणे निकाली
• लोकन्यायालयामुळे मिळाला तात्काळ न्याय, पक्षकारास दिला 57 लाखाचा मावेजा
हिंगोली (जिमाका), दि. 11 : येथील तालुका विधी सेवा समिती, सर्वोच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालय व परभणी जिल्हा न्यायालय तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली न्यायालयात दि.10 मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयामध्ये प्रलंबित असलेली 1155 प्रकरणे तसेच विद्युत महावितरण कंपनी व विविध बँका, ग्रामपंचायत व नगरपालिका यांची वाद दाखलपूर्व 4 हजार 659 प्रकरणे तडजोडीसाठी लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबित प्रकरणे 96 व वाद दाखलपूर्व प्रकरणे 9 असे एकूण 105 प्रकरणे निकाली काढण्यात आली. तडजोडी आधारे प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणात तब्बल 4 कोटी 97 लाख 44 हजार 450 रुपयांची प्रकरणे निकाली काढण्यात आली.
या लोकन्यायालयासाठी हिंगोली येथे न्यायिक अधिकारी तसेच विधीज्ञ समाविष्ट असलेले चार पॅनल तयार करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी.एस.अकाली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायाधीश-2 श्रीमती एस.ए.माने-गाडेकर, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी. जी. महाळणकर, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आय. जे. ठाकरे, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती पी. आर. पमनानी यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम केले.
ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी वकील संघाचे सदस्य, सभासद, न्यायालयीन व पोलीस कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
लोकन्यायालयामुळे मिळाला तात्काळ न्याय
पक्षकारास दिला 57 लाखाचा मावेजा
या लोकअदालतीमध्ये पल्लवी निलेश कुकडे (29 वर्षे) हिचे पती निलेश कुकडे हे अपघातामध्ये 3 मे, 2021 रोजी मयत झाल्याने विद्यमान न्यायालय, हिंगोली येथे नुकसान भरपाई मिळण्यासाठी जून, 2021 मध्ये दावा दाखल केला होता.
हे प्रकरण लोकन्यायालयामध्ये ठेवण्यात आले होते. या प्रकरणामध्ये दोन्ही पक्षकारामध्ये तडजोड होऊन अर्जदार मयताची पत्नी पल्लवी निलेश कुकडे (29 वर्षे), मुलगी कु. निधी निलेश कुकडे (5 वर्षे), मयताची आई वनमाला सुधाकर कुकडे यांना तडजोडीअंती 57 लाख रुपये रक्कम ठरविण्यात आली. या प्रकरणामध्ये लोकअदालतीच्या दिवशीच तात्काळ ओरिएंटल इंशुरन्स कंपनीतर्फे पक्षकारांना सदरील रकमेचा आदेश जिल्हा न्यायाधीश-02 एस. एन. माने-गाडकेर यांनी दिला.
पुढील लोकअदालतीमध्ये पक्षकारांनी आपली प्रकरणे ठेवून जलद न्याय मिळवून घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी केले आहे.
******
10 May, 2025
आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावे - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (जिमाका),दि. 10 : आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी पूर्वनियोजन करुन अधिक सतर्क, समन्वय व तत्परतेने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, प्र.पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलाश शेळके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. जी. पोत्रे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर आदींची उपस्थिती होती.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर हल्ले सुरु केले आहेत. या तणावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले, जिल्ह्यात पोलीस विभाग, उपविभागीय अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व महावितरण विभागांनी समन्वयाने मॉकड्रिलची तयारी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिल्या.
तसेच आरोग्य विभागानेही सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी पुरेसा औषधी साठा तयार ठेवावा. तसेच शासकीय रुग्णालयाबरोबरच जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयाची माहिती तयार ठेवावी. पुरेसा रक्त पुरवठा उपलब्ध करुन ठेवावा. तसेच सीपीरची, जनरेटरची व्यवस्था करावी. जिल्हा परिषदेने आपल्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागासह इतर संबंधित विभागांमध्ये समन्वय राखण्याचेही यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले.
प्रत्येक गावात नोडल अधिकारी नेमावेत. त्यांच्यासोबत योग्य समन्वय ठेवावा. सर्व कार्यान्वीन यंत्रणेचे संपर्क क्रमांक अद्यायावत करावेत. आपत्तीजनक परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी शाळा, मंगल कार्यालयाची माहिती तयार ठेवावी. पुरेसा धान्य पुरवठा व इंधन पुरवठा तयार ठेवावा. जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करावी. जिल्ह्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द कराव्यात. जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करावी. चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करावी. नागरिकांना परिस्थितीबाबत अद्ययावत व खरी माहिती पोहोचविण्यासाठी ग्रामस्तरावर नोडल अधिकाऱी नेमून त्यांच्यामार्फत जनजागृती करावी. केंद्र सरकारच्या ‘युनियन वॉर बुक चे सखोल अध्ययन करीत सर्वांना त्याची माहिती द्यावी.
तसेच मान्सूनमध्ये उद्भवणाऱ्या विविध आपत्तींचा आपणांस सामना करावा लागणार आहे. हे लक्षात ठेवूनच सर्व यंत्रणांनी पूर्वनियोजन करावे आणि सतर्क राहावे. यासाठी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करुन त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा. या आराखड्यात जिल्ह्यातील पूरप्रवण गावांचा सर्व नियोजनासह समावेश करावा. पोलीस प्रशासनाने पोलीस स्टेशननिहाय अधिकाऱ्यांचे नाव व भ्रमणध्वनी याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयास विहित नमुन्यात सादर करावी. तसेच तालुकानिहाय तयार करण्यात आलेले शोध व बचाव पथक अद्ययावत करुन नेहमी सतर्क ठेवावे. तसेच पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील पूरप्रवण गावाला भेटी देऊन भविष्यात पूर येणार नाही, यासाठी उपाययोजनांची माहिती घेऊन तशा उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिल्या.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे, सर्व तहसीलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुढे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी या आढावा बैठकीला उपस्थित होते.
******
09 May, 2025
इयत्ता 11 वीची प्रवेश प्रक्रिया यावर्षी केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने होणार
हिंगोली (जिमाका), दि. 09 : मागील काही वर्षापासून राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व अमरावती या महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 11 वीचे प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने चालू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक 25 फेब्रुवारी व दि. 6 मे, 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांतील शहरी व ग्रामीण भागातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 11 वीचे प्रवेश शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने चालू करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार राज्यस्तरावरून ते जिल्हास्तरापर्यंत याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शाळांकडून विहित नमुन्यात माहिती घेण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. त्यासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत पालक, विद्यार्थी व शाळांना माहिती होणे गरजेचे आहे.
उच्च माध्यमिक विद्यालयांनी करावयाची कार्यवाही : केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पध्दतीनुसार सर्वप्रथम सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांना त्यांच्या संस्थेची ऑनलाईन नोंदणी शासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार संकेतस्थळावर करावे लागणार आहे. त्यानंतरच त्यांचे उच्च माध्यमिक विद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. नोंदणी करण्यापूर्वी सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांनी काही अभिलेख्यांची पूर्वतयारी शाळास्तरावर करुन ठेवणे गरजेचे आहे.
यासाठी आपल्या महाविद्यालयात इंटरनेटची सुविधा असणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांना सुलभतेने प्रवेश घेता यावेत तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करण्यासाठी पूर्णवेळ यंत्रणा कार्यान्वित करावी. माहिती पुस्तिका प्रत्येक विद्यार्थ्यांना पाहता येईल यासाठी शाळास्तरावरच नियोजन करावे. यामध्ये माध्यमिक शाळांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. शक्यतोवर माध्यमिक शाळांमधूनच विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश भरण्यासाठी सोय उपलब्ध करुन देण्यात यावी. उच्च माध्यमिक विद्यालयांनी शासन मान्यता आदेश, मान्यता प्राप्त विषयांचे मंडळ मान्यता आदेश, शाखा अतिरिक्त तुकडी आदेश, अल्पसंख्यांक प्रमाणपत्र, बँक डिटेल्स इत्यादी बाबींची पूर्वीच तयारी करुन ठेवावी. शैक्षणिक शुल्काबाबतची आवश्यक कागदपत्रे मान्य असणे आवश्यक आहे. प्राचार्यांनी त्यांच्या कॉलेजची माहिती वेबपोर्टलवर भरताना योग्य ती दक्षता घ्यावी. कोणतीही माहिती अंदाजित अथवा चूकीची भरू नये. यामुळे भविष्यात उदभवणाऱ्या परिणामास संबंधित प्राचार्य, व्यवस्थापन जबाबदार राहील.
यावर्षी इयत्ता 11 वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पध्दतीनेच होणार आहेत. त्यामुळे यावर्षी ऑनलाईन प्रक्रियेशिवाय इतर कोणत्याही मार्गाने दिलेले प्रवेश हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. तसेच ऑफलाईन झालेले प्रवेश हे इयत्ता 12 वी परीक्षेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे शिक्षणाधिकारी (मा.), जिल्हा परिषद, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
******
राष्ट्रीय लोकअदालतीचे आज आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 09 : येथील जिल्हा न्यायालयात व त्या अंतर्गत येणाऱ्या विविध न्यायालयात तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवार, दिनांक 10 मे, 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोकअदालतीमध्ये भूसंपादन व मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, तडजोड युक्त फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, वैवाहिक/ कौटुंबिक वाद प्रकरणे, पराक्रम्य अभिलेख अधिनियमचे कलम 138 खालील प्रकरणे, नगर परिषद, विद्युत महावितरण कंपनी, बँक व पतसंस्थांचे वाद दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. ही सर्व प्रकरणे आपआपसातील तडजोडीद्वारे निकाली काढता यावीत. यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकार मंडळींनी उपस्थित राहून फायदा घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश टी. एस. अकाली, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एस. आर. भुक्तर यांनी केले आहे.
******
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्या - खासदार नागेश पाटील आष्टीकर
• दिशा समितीच्या बैठकीत केंद्र शासनाच्या विविध योजनांचा घेतला आढावा
हिंगोली (जिमाका), दि. 09: केंद्र शासनाच्या निधीतून जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आरोग्य, शैक्षणिक, वीज, पाणीपुरवठा, कृषी विषयक व दळणवळण यासह पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झालेल्या जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) आढावा बैठक खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, समितीचे अशासकीय सदस्य सर्वश्री. संदीप ससे, दयानंद पतंगे, अविनाश मुळे, सुंदरराव पाटील, भास्कर खोडके, सतीश पाचपुते, गोपू पाटील, श्रीमती शशिकला भंवर, शारदा पोपळघट, आश्विनी इंगोले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागामध्ये चांगल्या आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी संबंधित विभागांनी प्रयत्न करावेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षण, मध्यान्ह भोजन उपलब्ध होण्यासाठी वेळोवेळी आढावा घेण्यात यावा, असे खासदार नागेश पाटील आष्टीकर म्हणाले. तसेच जिल्ह्यात केंद्रीय निधीतून सुरु असलेल्या सर्व रस्त्यांची कामे दर्जेदार होतील, याची खबरदारी घ्यावी. सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना द्यावा, सिंचन सुविधांचे बळकटीकरण करावे. माळसेलू व चोंडी रेल्वे स्टेशनची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे त्यांनी सांगितले.
आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध होतील, यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे. तसेच बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. फळबाग लागवड हा शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न देणारा पर्याय आहे. त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात जास्तीत जास्त क्षेत्रावर फळबाग लागवडीसाठी प्रयत्न करावेत. गावोगावी होणाऱ्या शेती शाळांमध्ये याबाबत माहिती देऊन नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व गरीब गरजवंत व सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा. यामध्ये कुठलाही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी. घरकुलाचे काम प्राधान्याने पूर्ण करुन गरजवंताना लाभ मिळवून द्यावा. घरकुलासाठी तलाठ्यामार्फत अर्ज घेऊन लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करुन द्यावी. सर्व निराधार योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यासह विविध योजनांचे लाभ गावात शिबीरे घेऊन लाभार्थ्यांना वेळेत मिळवून द्यावेत. जिल्ह्यात सतत वीज खंडित होणे, वीज जोडणी, ट्रान्सफर, वीज उपकेंद्र निर्मिती ही सर्व कामे वेळेत झाली पाहिजेत. पाणंद रस्त्याच्या कामाच्या तक्रारी आहेत. चालू असलेले व पूर्ण झालेल्या कामाची चौकशी करावी. राष्ट्रीय महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावेत. जलजीवन मिशनचे काम तातडीने पूर्ण करुन जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये पाणी पुरवठा सुरु करावा. सर्व अभियंत्याची बैठक घेऊन प्रत्येक गावात आहे त्या परिस्थितीत पाणी पुरवठा सुरु करण्याबाबत कार्यवाही करावी. ज्या गावात जलजीवन मिशनच्या कामाची तक्रारी आहेत. तसेच पूर्ण झालेल्या गावातील कामाची चौकशी करावी. जल जीवन मिशनच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कार्यवाही करून ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या निधीचा योग्य वापर होण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी नियोजनबद्ध काम करावे, असे त्यांनी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी यंत्रसामुग्रीसाठी लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून द्यावा. तसेच जिल्ह्यात कर्करोगावरील उपचारासाठी आवश्यक सुविधा निर्माण करावी. यासाठी लागणारे मनुष्यबळ व आवश्यक साधनसामुग्रीसाठी प्रस्ताव द्यावा. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
खासदार पाटील यांनी यावेळी प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, पंडीत दीनदयाल उपाध्याय वीज सवलत योजना, राष्ट्रीय कृषि विकास योजना, फळबाग लागवड योजना, कांदा चाळ योजना, मृद व स्वास्थ्य कार्ड योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, ई-नाम योजना, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत मिशन, समग्र शिक्षा अभियान यासह विविध योजनांचा आढावा घेतला.
यावेळी समिती सदस्यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्न व अडचणी मांडल्या. यावर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्न, अडचणी, तक्रारी व कामाचे तातडीने निराकरण करुन तात्काळ मार्गी लावावेत, अशा सूचना सर्व यंत्रणेला दिल्या.
जिल्ह्यातील महिलांचे कर्करोगाची लक्षणे जाणून घेण्यासाठी जिल्ह्यात संजीवनी अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानात संशयित आढळून आले आहेत. यावर त्यांच्यावर पुढील तपासणी व उपचाराची कार्यवाही सुरु आहे. जल जीवन मिशनच्या कामांचा आढावा घेऊन त्यांना कामे लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. जिल्ह्यातील वीज, पाणी, आरोग्य यासह विविध यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले.
प्रारंभी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी सादरीकरणाद्वारे केंद्र शासनाच्या विविध योजनेच्या सद्यस्थितीची माहिती दिली. तसेच त्यांनी शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
******
08 May, 2025
जिल्ह्यात कृषी निविष्ठा विक्रेत्यांची खरीप हंगामपूर्व कार्यशाळा संपन्न
हिंगोली(जिमाका),दि.०८ : खरीप हंगामाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कार्यशाळेत कृषी आयुक्तालयाचे प्रतिनिधी शेषराव डोळे, कृषी विकास अधिकारी अतुल वायसे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक नितीन घुगे, जिल्हा कृषी अधिकारी संग्राम जाधव, तालुका कृषी (सेनगाव) अधिकारी संदीप वळकुंडे, गोविंद काळे (औंढा नागनाथ), शिवसंदीप रणखांब (हिंगोली) यांच्यासह जिल्ह्यातील कृषी अधिकारी, पंचायत समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेषराव डोळे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर कृषी विकास अधिकारी अतुल वायसे यांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर सादरीकरण केले. यामध्ये साथी पोर्टलचा वापर, बीज प्रक्रिया, बियाणे उगवण क्षमता तपासणीचे महत्त्व, कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची आवश्यक काळजी आणि कापूस तसेच इतर पिकांच्या तक्रारींसाठी असलेल्या तक्रार निवारण समितीच्या कार्याची माहिती देण्यात आली.
यावेळी विक्रेते असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आनंद निलावार यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यशाळेत जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी सक्रीय सहभाग घेतला आणि उपयुक्त माहिती जाणून घेतली.
जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या या कार्यशाळेमुळे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला अधिक बळ मिळणार असून, शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा वेळेवर उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
********
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केली मृद व जलसंधारण कामांची पाहणी
हिंगोली (जिमाका), दि. 08 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कळमुनरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे कृषी विभागामार्फत चालू असलेल्या विविध मृद व जलसंधारण कामांची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी कंपोझिट गॅबियन स्ट्रक्चर या कामासंदर्भात काम करणारे कॉन्ट्रॅक्टर व कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामांची गुणवत्ता राखण्याच्या सूचना केल्या. तसेच जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी इसापूर बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते, तहसीलदार जिवककुमार कांबळे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, तालुका कृषी अधिकारी नितीन घुगे, मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहायक उपस्थित होते.
******
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले ॲग्रीस्टॅकबाबत मार्गदर्शन
हिंगोली (जिमाका), दि. 08 : कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येडोबा येथे आयोजित ॲग्रीस्टॅक शिबिराला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी गावातील नागरिकासोबत ग्रामस्तरावरच्या विविध योजनाबद्दल मार्गदर्शन केले व गावकऱ्यांकडून गावामध्ये असलेल्या समस्या जाणून घेतल्या. तसेच संबंधित विभागाला नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी गावात बँक नसल्यामुळे शेतकऱ्यांना सात किलोमीटर लांब बँकेत जावे लागते. यासाठी गावच्या लोकसंख्यानुसार बँक द्यावी, अशी मागणी केली. यावर जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी बँक शाखा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांना दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, तहसीलदार जीवक कांबळे यांच्यासह मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, उपसरपंच, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
जिल्हा वार्षिक योजनेची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (जिमाका), दि. 08 : जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, केशव गड्डापोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सन 2023-24 मधील दायित्वाची कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. दायित्वाची रक्कम खर्च केलेल्या कामाची माहिती सर्व विभागांनी सोमवारपर्यंत सादर करावी. वेळेत काम पूर्ण न करणा-या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे. दायित्वाची रक्कम खर्च न केलेल्या विभाग प्रमुखावर शिस्तभंगाची कार्यवाही करावी. तसेच सन 2025-26 पर्यंत संपणाऱ्या कामाची सद्यस्थितीची माहिती देऊनच निधीची मागणी करावी. जिल्ह्यातील सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी कोल्हापुरी पध्दतीचे बंधारे (केटीवेअर) ची कामे घ्यावीत. पटसंख्या जास्त व मोठे मैदान उपलब्ध असलेल्या जिल्हा परिषद शाळेसाठी क्रीडा साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
तसेच सर्व कार्यालय प्रमुखांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2024-2025 साठी वितरीत केलेल्या निधीतील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करोवत. तसेच केलेल्या कामाचा ताळमेळ तात्काळ पूर्ण करुन उपयोगिता प्रमाणपत्रासह अहवाल सादर करावा. एकमेकांशी समन्वय ठेवून निधी खर्च करण्याबाबत कार्यवाही करावी व त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. तसेच सन 2025-26 या वर्षात जिल्हा विकास आराखड्यावर जिल्हा वार्षिक योजनेचा 25 टक्के निधी खर्च करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार सर्व यंत्रणांनी जिल्हा विकास आराखड्यातील कामाचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीस आरोग्य विभाग, महावितरण विभाग, शालेय शिक्षण विभाग, जलसंधारण, पाणीपुरवठा, कृषी, बांधकाम, पशुसवंर्धन, महिला व बालविकास यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
*****
07 May, 2025
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास 14 मे पर्यंत मुदतवाढ
हिंगोली (जिमाका), दि. 07 : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र व संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) 2025 या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येत आहेत. परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर दिनांक 25 एप्रिल, 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. या परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्याची मुदत दि. 10 मे, 2025 ऐवजी दि. 14 मे, 2025 पर्यंत करण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन आवेदनशुल्क भरण्यासाठी दि. 14 मे, 2025 रोजी 23.59 मि. पर्यंत मुदत राहील.
दि. 2 मे, 2025 च्या शासन शुध्दीपत्रकानुसार शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ठ असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ठ असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र राहतील. मात्र दि. 5 मे, 2025 पूर्वी आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना सुधारित तरतुदीचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी पुन:श्च ऑनलाईन आवेदनपत्र भरावे. पुन:श्च भरलेले ऑनलाईन आवेदनपत्र अंतिम समजून पहिले आवेदनपत्र रद्द करण्यात येईल.
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी-2025 परीक्षा दि. 24 मे ते दि. 5 जून, 2025 या कालावधीमध्ये घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बी.एड व एम.एड, महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेस प्रविष्ठ असणाऱ्या विद्यार्थी, उमेदवारांचा परीक्षा कालावधी दि. 24 मे ते दि. 5 जून, 2025 या कालावधीत नियोजित असलेल्या विद्यार्थी, उमेदवारांनी आपली माहिती विहित नमुन्यात परीक्षा परिषदेने दिलेल्या https://mscepune.in/DTEDOLA/TAIT2025Info.aspx या लिंकद्वारे दि. 14 मे, 2025 पर्यंत सादर करावी. जेणेकरुन शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमता चाचणी परीक्षा-2025 परीक्षेला प्रविष्ठ असलेल्या उमेदवारांचे परीक्षेच्या बॅचेसचे नियोजन करणे सुलभ होईल.
उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील, असे आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
******
06 May, 2025
शून्य मशागत शेती पद्धती जिल्ह्यात राबवावी -- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली(जिमाका), दि. 06 : शेती सजीव करण्यासाठी तिचा कर्ब वाढविणे गरजेचे आहे. यासाठी शून्य मशागत शेती पद्धती अवलंबली पाहिजे. तसेच जिल्ह्यामध्ये किमान दहा हजार शेतकऱ्यांनी ही पद्धती स्वीकारावी यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
उमरा येथील उगम संस्थेमध्ये सगुना रुरल डेव्हलपमेंट नेरळ आणि उगम ग्रामीण विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
शून्य मशागत शेती पद्धतीचे संशोधक चंद्रशेखर भडसावळे यांनी शून्य मशागत शेती पद्धतीची निर्मिती व संकल्पना याविषयी ऑनलाईन शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले, शेतकरी आनंदी झाला पाहिजे, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे परंतु तो समाधानी नाही कारण शेतीमध्ये होणारा खर्च हा मोठ्या प्रमाणात आहे आणि मिळणारे उत्पन्न हे कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागत टाळली तर होणारा खर्च वाचतो. त्याचबरोबर जमिनीतील जिवाणू जिवंत राहतात आणि जिवाणू कर्ब खाऊन जिवंत राहतात. जर कर्ब कमी झाला तर जिवाणूंची संख्या कमी होईल आणि शेतीवर होणारा खर्च वाढवावा लागेल. याला लगाम घालायला शून्य मशागत शेती पद्धती महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
अनिल निवळकर यांनी सगुना शेती पद्धतीमुळे माती वर्षानुसार बदलत जाते. तसेच ती थंड राहते त्याचबरोबर या शेतीमध्ये गांडूळ पाहायला मिळतात. तापमान कमी करण्यासाठी ही शेती पद्धती महत्त्वाची आहे. या पद्धतीमध्ये फक्त तणनाशकाचा वापर केला जातो. मात्र कुठल्याही प्र कारच्या रासायनिक खत किंवा औषधाचा वापर केला जात नाही. तसेच मिश्र पीक पद्धती सुद्धा या पद्धतीने मध्ये घेता येते, असे त्यांनी सांगितले.
सतीश खाडे यांनी मातीचे आरोग्य कसे तपासायचे याविषयी प्रात्यक्षिक करून दाखवले. त्याचबरोबर माती साक्षरता शेतकऱ्यांमध्ये रुजावी अशी अपेक्षा त्यांनी यंत्रणेसमोर मांडली. शेतीमध्ये जेव्हा तणाचे मूळ तसेच ठेवली जातात आणि ती जेव्हा पूर्णपणे वाळून जातात. ती मूळ पाणी जमिनीमध्ये मुरवण्यासाठी मदतीची ठरतात, असे सांगितले. परशुराम अगविले यांनी शून्य मशागत शेतीमध्ये सुरुवातीपासून तर पिकनिघेपर्यंत काय काय पायऱ्या आहेत याची माहिती शेतकऱ्यांना दिली तसेच कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारी पद्धतीही आहे, असेही त्यांनी सांगितले. विठ्ठलराव बदखल यांनी सांगितले की वन्य प्राण्यापासून शेतीचे संरक्षण कशा पद्धतीने केले जाते. तसेच वन्य प्राणी शेतात येत असतील तर वनविभाग कसल्या प्रकारचे मदत करू शकते हे त्यांनी सांगितले तसेच जीवित हानी मनुष्यहानी झाली तर नुकसान भरपाई काय मिळते याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
सहायक विभागीय अधिकारी सचिन माने यांनी शेती नुकसान भरपाईसाठी ऑनलाइन पद्धतीने कसा अर्ज करावा याविषयी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. सदाशिव अडकिने यांनी जैविक बांध याविषयी मार्गदर्शन केले तसेच त्यांनी केलेली करवंदाची बाग व त्याचे फायदे शेतकऱ्यांना सांगितले. रावसाहेब मोरे व विठ्ठलराव वैद्य यांनी जालना व संभाजीनगर येथे केलेल्या शून्य मशागत शेती पद्धतीचा अनुभव शेतकऱ्यांना सांगितला व हा प्रयोग आपल्या भागात यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलताना जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी राजेंद्र कदम यांनी शून्य मशागत शेतीसाठी अधिक शेतकऱ्यांना प्रवृत करण्यात येईल. प्रामुख्याने पोकरा व नैसर्गिक शेती अंतर्गत निवडलेल्या सर्व गावांमध्ये तसेच या कार्यशाळेस उपस्थित असलेल्या सर्व गावात हा कार्यक्रम राबविला जाईल, असे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जयाजी पाईकराव म्हणाले, सगुणा बाग कर्जत येथे भेट देऊन तेथील माती आणि शेतीची पाहणी केली आणि ती पद्धती यशस्वी होऊ शकते. तसेच आपल्या परिसरात तसेच मॉडेल उभे राहू शकते म्हणून या कार्यशाळेचे नियोजन केले असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास कांबळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिशांत पाईकराव, सुशांत पाईकराव, सिद्धार्थ निनुले, रामराव खंदारे, ओमकार भालेराव व बुद्धभूषण पातोडे, भीमराव पाईकराव यांनी प्रयत्न केले.
*******
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प व महाबीज यांच्यामध्ये सामंजस्य करार
हिंगोली (जिमाका), दि. 06 : सन 2025 पासून नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा-2 अंतर्गत राज्यातील 21 जिल्ह्यांमधील 6 हजार 959 गावांमध्ये विविध कृषि विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत, टप्पा-१ प्रमाणेच या टप्प्यातही हवामानानुकूल पीक वाणांचे बीजोत्पादन, जमिनीच्या सुपीकतेसाठी उपाययोजना, फळबाग व बांबू लागवड, तसेच जिवाणू खतांची निर्मिती यासारख्या घटकांचा समावेश असणार आहे. यामुळे बीजोत्पादन क्षेत्राचा विकास होण्यास, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास व जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होण्यास निश्चित मदत होणार आहे.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंह आणि महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी टप्पा-२ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत सविस्तर चर्चा झाली.
या सामंजस्य करारामुळे 21 जिल्ह्यांतील महाबीज बीजोत्पादक शेतकऱ्यांना स्रोत बियाणे किंमत आणि बीज प्रमाणीकरण नोंदणी शुल्क परताव्याच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य मिळणार आहे. तसेच महाबीजमार्फत उत्पादित गुणवत्तापूर्ण जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा आणि जैविक खतांचा संघ महाजैविक या उत्पादनांचा शेतकरी बंधू व भगिनींना 100 टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात येणार आहे.
प्रकल्पातील समाविष्ट जिल्ह्यांमध्ये गळीतधान्ये व पौष्टिक तृणधान्ये लागवडीसाठी शेतकऱ्यांना मिनीकीट्स उपलब्ध करून दिले जातील. तसेच जैविक बुरशीनाशक व खते तयार करण्यासाठी प्रविण प्रशिक्षक (Master Trainers) यांना महाबीजमार्फत विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तालुका बीज गुणन केंद्रांवर (TSF) बीजोत्पादन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी स्रोत बियाणे दर व बीज प्रमाणीकरण शुल्क परतावा दिला जाईल. प्रकल्प गावांमध्ये चारा पिकांचे बियाणे तयार करण्यासाठी बीजोत्पादनास प्रोत्साहन दिले जाईल.
या उपक्रमाच्या अनुषंगाने श्री. परिमल सिंह यांनी अकोला येथील महाबीजच्या बीज परीक्षण प्रयोगशाळा, बीज प्रक्रिया केंद्र आणि मुख्यालयास भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली, या प्रसंगी पोकराचे मृदाविज्ञान विशेषज्ञ विजय कोळेकर व महाबीजचे सर्व विभागप्रमुखही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समाप्तीप्रसंगी योगेश कुंभेजकर यांनी परिमल सिंह यांचे मनःपूर्वक आभार मानले.
******
परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास 20 मेपर्यंत मुदतवाढ
हिंगोली (जिमाका), दि. 06 : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीकरिता विद्यार्थ्यांकडून जाहिरातीद्वारे अर्ज स्वीकरण्याची अंतिम दि. 30 एप्रिल, 2025 अशी होती. परंतु यासाठी आता अर्ज स्वीकारण्यास दि. 20 मे, 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवर भेट द्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
******
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 06 : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र व संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) 2025 या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येत आहेत. परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर दिनांक 25 एप्रिल, 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
शिक्षक निवडीकरीता आवश्यक किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीकरीता पात्र राहतील. त्याचप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ठ असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ठ असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र राहतील. परंतु शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीत त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाणार नाहीत व पर्यायाने त्यांचा निकाल राखून ठेवण्यात येईल, अशा उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य आहे. या मुदतीत असे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर न केल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे त्याचा शिक्षक पदभरतीसाठीचा दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही. विहित मुदतीत गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेले गुण व या गुणांनुसार त्याचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/ या लिंकवर भरावेत, असे आवाहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
******
05 May, 2025
डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा – प्रभू गौर गोपाल दास
टेक वारी २०२५: धावपळीच्या जीवनात तणावमुक्त जीवनशैली आत्मसात करा
मुंबई, दि. ०५ : धकाधकीच्या आणि डिजिटल युगात माणसं जरी एकमेकांच्या संपर्कात असली, तरी मनाने दूर जात असल्याचे चित्र समाजात दिसून येत आहे. मोबाईल, सोशल मीडियाच्या सततच्या वापरामुळे प्रत्यक्ष संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा आहे. धावपळीच्या जीवनात संघर्षांवर यशस्वीरित्या मात करण्यासाठी तणावमुक्त जीवनशैली आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रेरणादायी वक्ते व लेखक प्रभू गौर गोपाल दास यांनी व्यक्त केले. टेक-वारी कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्रालयात ‘प्रभावी व तणावमुक्त जीवन’ या विषयावर प्रभू गौर गोपाल दास बोलत होते.
टेक्नोसॅव्ही व्हा
सध्या जग वेगाने डिजिटल दिशेने वाटचाल करत आहे. स्मार्टफोन, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड संगणक, आणि इंटरनेट यांसारखी तंत्रज्ञान आपला रोजचा भाग बनत आहेत. अशा काळात ‘टेक्नोसॅव्ही’ होण ही केवळ गरज नसून ती एक अनिवार्यता बनली आहे. विविध ऑनलाईन कोर्सेस, मोबाइल अॅप्स आणि ई-लर्निंग प्लॅटफॉर्म्समुळे तंत्रज्ञान शिकण आता पूर्वीपेक्षा अधिक सोप झाले आहे, असेही प्रभू गौर गोपाल दास यांनी सांगितले.
शिकण थांबवू नका – आयुष्यभर विद्यार्थी राहा
प्रभू गौर गोपाल दास म्हणाले, शिकण ही एक प्रक्रिया आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुरू असते. वय कितीही असो, नवीन कौशल्य शिकणे, भाषा आत्मसात करणे किंवा एखादा छंद जोपासणे यामुळे मेंदू अधिक कार्यक्षम राहतो. वृद्धापकाळातही अल्झायमर आणि डिमेन्शियासारखे आजार टाळण्यासाठी मेंदूला वर्कआउट देणे गरजेचे आहे. डिजिटल युगात विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सद्वारे हे अधिक सुलभ झाले आहे.
मानसिक आरोग्य सांभाळा
दररोज थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवा. ध्यान, वाचन, मनमोकळ्या गप्पा किंवा छंद जोपासा. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यांचा दिनक्रम ठेवा. या गोष्टींचा अवलंब केल्यास तणाव आणि मानसिक विकारांवर मात केली जाऊ शकते.
संस्कृती विसरू नका
संस्कृती आणि मूल्य ही आपल्या जीवनात महत्त्वाची आहेत. तंत्रज्ञानाच्या विकासात आपण पुढे जात असताना, आपल्या परंपरा, नीतिमूल्य विसरता कामा नये. स्मार्ट, डिजिटल व भविष्यकाळासाठी सज्ज होण महत्त्वाच असलं तरी आपले संस्कार आणि मूल्य यांचा विसर पडू देऊ नका, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मनात सतत रेंगाळणारे विचार जर व्यक्त झाले नाही तर ते मानसिक आजारांना आमंत्रण देऊ शकतात. यासाठी एक सोपा उपाय म्हणजे मनातील त्रासदायक विचार एखाद्या व्यक्तीसमोर मोकळेपणाने व्यक्त करणे किंवा ते लिहून मोकळ होणे. ही पद्धत मनावरचा भार हलका करते आणि मन:स्वास्थ्य टिकवते. आनंदी आणि समाधानी जीवनासाठी इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःशीच तुलना करा. सतत आपल्याकडे काय नाही याचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा, आपल्याकडे काय आहे याची जाणीव ठेवल्यास आयुष्य अधिक समृद्ध होते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मंत्रालयाच्या या मंदिरात तंत्रज्ञान हे दैवत असून डिजिटल टेक्नॉलॉजी ही अभंगासमान आहे, आधुनिक काळात तंत्रज्ञान आणि डिजिटल कौशल्य ही यशस्वी भविष्यासाठी आवश्यक ठरली आहेत. त्यामुळे आपण त्याचा स्वीकार भक्तिभावाने करावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.
०००
शैलजा पाटील/विसंअ/
वेव्हज् २०२५ – प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात महाराष्ट्र सरकारने केले ८००० कोटी रुपयांचे सामंजस्य करार
जागतिक माध्यम संवादात सदस्य देशांनी स्वीकारला वेव्हज् जाहीरनामा
क्रिएट इन इंडिया चॅलेंज भारतात सृजनशील अर्थव्यवस्थेला चालना देणार
वेव्हज्मध्ये प्रकाशित झालेल्या ज्ञान अहवालांनी वर्तवले सृजनशील अर्थव्यवस्थेमध्ये भारताच्या गरुडझेपेचे भाकित
मुंबई, दि. ०५ : वेव्हज् अर्थात जागतिक दृक-श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद या अतिशय प्रतिष्ठेच्या, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील पहिल्या वहिल्या महोत्सवाचा मुंबईत सोहळ्याला वेगळ्या उंचीवर नेत उत्साहात समारोप झाला. या शिखर परिषदेला प्रदर्शक, उद्योग धुरीण, स्टार्टअप्स, धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि सामान्य जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध कलाकार आणि प्रभावशाली आशय निर्माते असोत, तंत्रज्ञान नवोन्मेषक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील अग्रणी अशा सर्वच क्षेत्रातील व्यक्तींच्या सहभागामुळे ही परिषद म्हणजे माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेसाठी संगमाचे केंद्र ठरली. प्रदर्शने, पॅनेल चर्चा आणि बीटूबी सहकार्याच्या उत्साही मिलाफासह, या कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आणि भारताची माध्यम आणि मनोरंजनाची उदयोन्मुख जागतिक महासत्ता म्हणून असलेले स्थान अधिक भक्कम झाले.
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटनाने विविध तारेतारका आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्यात सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि कथाकथनाच्या या महोत्सवाचा गुरुवारी प्रारंभ झाला. वेव्हज् हे केवळ एक संक्षिप्त नाव नाही तर संस्कृती, सृजनशीलता आणि सार्वत्रिक नातेसंबंधाची ही एक लाट आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी या कार्यक्रमात केले. भारत चित्रपट निर्मिती, डिजिटल आशय, गेमिंग, फॅशन, संगीत आणि लाईव्ह कॉन्सर्टसाठी जागतिक केंद्र म्हणून उदयाला येत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी जगातील सर्जकांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि त्यांच्या कथा सांगण्याचे, गुंतवणूकदारांना केवळ प्लॅटफॉर्ममध्येच नव्हे, तर लोकांमध्ये गुंतवणूक करण्याचे आणि भारतीय तरुणांना त्यांच्या एक अब्ज न सांगितलेल्या कथा जगाला सांगण्याचे आवाहन केले. वेव्हज म्हणजे भारताच्या केशरी अर्थव्यवस्थेची पहाट असल्याचे जाहीर करत त्यांनी युवा वर्गाला या सृजनशील लाटेवर स्वार होण्याचे आणि भारताला जागतिक सर्जनशील निर्मिती केंद्र बनवण्याचे आवाहन केले.
उच्च-परिणाम साधणारी ज्ञान सत्रे
पंतप्रधानांचा दृष्टिकोन साकार करण्याच्या उद्देश पुढे नेत, चार दिवसांत वेव्हज 2025 ने विचार, कौशल्य आणि महत्त्वपूर्ण अभिप्राय यांच्या उच्चस्तरीय देवाणघेवाणीसाठी एक व्यासपीठ म्हणून काम केले. वेव्हज 2025 चा विचारविनिमय मागोवा संवाद आणि सहकार्यासाठी एक महत्त्वाचा मंच म्हणून काम करत होता, ज्यामुळे जगभरातील विचारवंत, उद्योगधुरीन, धोरणकर्ते आणि व्यावसायिक एकत्र आले. पूर्ण सत्रे, विभागीय चर्चासत्रे आणि महत्वपूर्ण शिक्षणसत्रांच्या काळजीपूर्वक तयार केलेल्या मालिकेद्वारे, शिखर परिषदेने माध्यमे आणि मनोरंजन उद्योगाचे भविष्य घडवणाऱ्या नवीनतम नवकल्पना आणि उदयोन्मुख धोरणांचा शोध घेतला. या सत्रांनी विशेषज्ञता क्षेत्रात वैचारिक देवाणघेवाण करण्यास सक्षम केले.
वेव्हज्ची प्रारंभिक आवृत्ती उच्च-परिणाम साधणारी ज्ञानवर्धक सत्रे आणि प्रसारण तसेच माहिती आणि मनोरंजन, एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्र, डिजिटल मीडिया आणि चित्रपट यासारख्या विषयांच्या विस्तृत व्याप्तीचा समावेश असलेल्या चर्चासत्रांच्या माध्यमातून स्मरणात राहील. तीन मुख्य सभागृहांमध्ये (प्रत्येक सभागृहात एक हजारहून अधिक सहभागी सामावले जातील) तसेच 75 ते 150 पर्यंत क्षमता असलेल्या पाच अतिरिक्त सभागृहांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 140 हून अधिक सत्रांसह, शिखर परिषदेत उपस्थिती मोठ्या संख्येने राहिली – अनेक सत्रांमध्ये पूर्ण उपस्थिती नोंदवली गेली.
पूर्ण सत्रांमध्ये मुकेश अंबानी, टेड सॅरंडोस, किरण मजुमदार-शॉ, नील मोहन, शंतनू नारायण, मार्क रीड, ॲडम मोसेरी आणि नीता अंबानी यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींची 50 हून अधिक प्रमुख भाषणे होती. विकसित होत असलेल्या मनोरंजन उद्योग, जाहिरातीचे विशाल क्षेत्र आणि डिजिटल परिवर्तनाबाबत त्यांनी महत्वपूर्ण अभिप्राय मांडत यथार्थ चित्र सादर केले. चिरंजीवी, मोहनलाल, हेमा मालिनी, अक्षय कुमार, नागार्जुन, शाहरुख खान, दीपिका पदुकोण, अल्लू अर्जुन आणि शेखर कपूर यांसारख्या चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी, ज्यांपैकी बहुतांश जण वेव्हज सल्लागार मंडळाचे सदस्य होते, आभासी निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात सिनेमा आणि कंटेंट निर्मितीच्या भविष्यावर विचारपूरक चर्चा केली.
वेव्हज् 2025 मधील 40 महत्वाची शिक्षण सत्रे व्यावहारिक शिक्षण आणि सर्जनशील अन्वेषण देण्यासाठी विशेषत्वाने निर्मित केली होती. आमिर खानचे द आर्ट ऑफ ॲक्टिंग, फरहान अख्तरचे क्राफ्ट ऑफ डायरेक्शन आणि मायकेल लेहमनचे इनसाइट्स इन फिल्ममेकिंग यासारख्या सत्रांद्वारे सहभागींना उद्योग तंत्रांचा थेट अनुभव घेता आला. ॲमेझॉन प्राईमद्वारे पंचायत बनवणे, ए आर लेन्स डिझाइन करणे, ए आय अवतार तयार करणे आणि उत्पादकक्षम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने गेम विकसित करणे यासारख्या पडद्यामागील अदाकारी पेश करण्यात आली. या सत्रांमध्ये व्यावसायिक आणि इच्छुक निर्मात्यांना वेगाने विकसित होत असलेल्या सर्जनशील अर्थव्यवस्थेत आघाडीवर राहण्यासाठी कृतीशील ज्ञान आणि साधनसामग्रीविषयी माहिती प्रदान करण्यात आली.
वेव्हज्मध्ये 55 विभागीय चर्चासत्रे देखील होती ज्यांनी प्रसारण, डिजिटल मीडिया, ओटीटी, ए आय, संगीत, बातम्या, लाइव्ह कार्यक्रम, ॲनिमेशन, गेमिंग, आभासी निर्मिती, चित्रकथा आणि चित्रपट निर्मिती यासारख्या विशेष संकल्पनेवर सखोल चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान केले. या परस्परसंवादी सत्रांमध्ये मेटा, गुगल, ॲमेझॉन, एक्स, स्नॅप, स्पॉटीफाय, डी एन ई जी, नेटफ्लिक्सआणि एन व्ही आय डी ए आय यासारख्या आघाडीच्या कंपन्यांमधील वरिष्ठ व्यावसायिकांसह फिक्की, सी आय आय आणि आय एम आय सारख्या उद्योग संस्थांचे प्रतिनिधी एकत्र आले. क्षेत्र-विशिष्ट महत्वपूर्ण अभिप्राय आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केलेल्या या चर्चेत गंभीर आव्हानांबाबत उपाय शोधण्यात आले आणि वाढ आणि नवोन्मेषासाठी नवीन दिशानिर्देश देण्यात आले.
वेव्हज् बाजारने व्यवसाय करारांमधून 1328 कोटी रुपये कमावले; महाराष्ट्र शासनाने ‘माध्यम आणि मनोरंजन’ क्षेत्रात 8000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले वेव्हजच्या छत्राखाली 1 ते 3 मे दरम्यान आयोजित वेव्हज बाजारचा आरंभीचा हंगाम जबरदस्त यशस्वी झाला कारण त्याने सर्जनशील उद्योगांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सहकार्यासाठी एक प्रमुख मंच म्हणून स्वतःची ओळख प्रस्थापित केली आहे. या बाजारपेठेत चित्रपट, संगीत, रेडिओ, व्हीएफएक्स आणि अॅनिमेशन क्षेत्रात 1328 कोटी रुपयांचे व्यवसाय करार तसेच व्यवहार नोंदवले गेले. एकूण अंदाजित उत्पन्नापैकी 971 कोटी रुपये हे केवळ आंतर व्यावसायिक बैठकांमधून प्राप्त झाले आहेत. खरेदीदार-विक्रेता बाजार हे या बझारचे एक प्रमुख आकर्षण होते, ज्यामध्ये 3,000 हून अधिक बीटूबी बैठका झाल्या. आंतरराष्ट्रीय सहकार्याअंतर्गत एक मोठी कामगिरी म्हणून, न्यूझीलंडमधील फिल्म इंडिया स्क्रीन कलेक्टिव्ह आणि स्क्रीन कॅंटरबरी एनझेड यांनी न्यूझीलंडमध्ये पहिला भारतीय चित्रपट महोत्सव सुरू करण्यासाठी एक सहयोगी प्रस्ताव जाहीर केला. ओन्ली मच लाउडरचे सीईओ तुषार कुमार आणि रशियन फर्म गॅझप्रॉम मीडियाचे सीईओ अलेक्झांडर झारोव्ह यांनी रशिया आणि भारतात परस्पर-सांस्कृतिक महोत्सवात सहकार्य करण्यासाठी आणि कॉमेडी आणि संगीत विषयक कार्यक्रमांची सह-निर्मिती करण्यासाठी सामंजस्य करारावर लवकरच चर्चा करण्याची घोषणा केली. प्राइम व्हिडिओ आणि सीजे ईएनएम बहुवार्षिक सहयोगाची घोषणा ही बझार चे आणखी एक आकर्षण होते कारण जागतिक स्तरावर प्रीमियम कोरियन आशय वितरित करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीचे अनावरण करण्यात आले. इतर टप्पे म्हणजे ‘देवी चौधराणी’ चित्रपटाची घोषणा, जो भारताचा पहिला अधिकृत इंडो-यूके सह-निर्मिती असलेला चित्रपट ठरला. आणि ‘व्हायलेटेड’ चित्रपट जो यूके आणि जेव्हीडी फिल्म्सच्या फ्यूजन फ्लिक्सची सह-निर्मिती असेल.
महाराष्ट्र शासनाने वेव्हज्मध्ये 8,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करून शिखर परिषदेत व्यावसायिक मूल्य वाढवले आहे. यॉर्क विद्यापीठ आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठासोबत प्रत्येकी 1,500 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले, तर राज्याच्या उद्योग विभागाने प्राइम फोकस आणि गोदरेजसोबत अनुक्रमे 3,000 कोटी रुपयांचे आणि 2,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले.
जागतिक माध्यम संवाद 2025 मध्ये सदस्य राष्ट्रांनी ‘वेव्हज जाहीरनामा‘ स्वीकारला
मुंबईतील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेदरम्यान (वेव्हज 2025) आयोजित करण्यात आलेला जागतिक माध्यम संवाद 2025 हा एक ऐतिहासिक कार्यक्रम होता ज्यामध्ये 77 राष्ट्रांचा सहभाग होता, जो जागतिक माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारताची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करतो. वेव्हज 2025 मधील जागतिक माध्यम संवादाने सांस्कृतिक संवेदनशीलतेचा आदर राखत आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून सर्जनशीलतेला चालना देण्याच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकला. सदस्य राष्ट्रांनी एकत्रितपणे ‘वेव्हज घोषणापत्र’ स्वीकारले, त्यामध्ये डिजिटल अंतर कमी करण्याची तातडी आणि जागतिक शांतता व सौहार्दाला प्रोत्साहन देण्यासाठी माध्यमांचा वापर यावर भर देण्यात आला. चर्चेमध्ये विविध संस्कृतींना एकत्र आणण्यात चित्रपटांचे महत्त्वपूर्ण योगदान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वाढणाऱ्या सर्जक अर्थव्यवस्थेत वैयक्तिक कथांचे महत्त्व अधोरेखित झाले.
केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी तंत्रज्ञान आणि परंपरेच्या समन्वयावर जोर देत, कौशल्य विकास आणि नवोन्मेषाद्वारे तरुणांना सक्षम करण्याची गरज मांडली. माहिती आणि प्रसारण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आशय-सामग्री निर्मितीवर असलेल्या तंत्रज्ञानाच्या परिवर्तनात्मक प्रभावावर प्रकाश टाकला आणि स्थानिक आशय-सामग्री, सह-निर्मिती करार आणि संयुक्त निधी उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. भारताच्या “क्रिएट इन इंडिया” स्पर्धेतून 700 हून अधिक जागतिक सर्जकांना यशस्वीपणे निवडण्यात आले, आणि पुढील आवृत्तीत ही स्पर्धा 25 जागतिक भाषांमध्ये विस्तारित करण्याची योजना जाहीर करण्यात आली. या परिषदेने माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भविष्यातील जागतिक सहकार्यासाठी मजबूत पायाभरणी केली, तसेच त्यामध्ये सर्जनशील उत्कृष्टता आणि नैतिक सामग्री निर्मितीवर भर देण्यात आला.
वेव्हज: माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील आकांक्षी स्टार्ट-अप्ससाठी एक प्रवेगक
वेव्हज् स्टार्ट-अप प्रवेगकांनी 45 प्रमुख एंजेल गुंतवणूकदारांपैकी लुमिकाई, जिओ, कॅबिल, वॉर्मअप व्हेंचर्स सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांना त्यांच्या अद्वितीय कल्पना थेट मांडण्यासाठी 30 माध्यम आणि मनोरंजन स्टार्ट-अप्सची निवड केली. 1000 हून अधिक नोंदणींसह, या उपक्रमामुळे सध्या सुरू असलेल्या 50 कोटी रुपयांच्या गुंतवणूक अपेक्षित आहेत. याशिवाय, 100 हून अधिक स्टार्ट-अप्सनी समर्पित स्टार्ट-अप पॅव्हेलियनमध्ये संभाव्य गुंतवणूकदारांना त्यांच्या संकल्पना आणि उत्पादने प्रदर्शित केली. वेव्हज एक उपक्रम म्हणून माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारे एंजल गुंतवणूकदार नेटवर्क तयार करून स्टार्ट-अप्सना भरभराटीसाठी आणि वाढीसाठी एक स्पष्ट गुंतवणूक परिसंस्था तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवते. टियर 1 आणि टियर 2 मधील स्टार्ट-अप्स वेव्हज मध्ये चमकले आणि त्यांच्या संस्थापकांनी केंद्रस्थानी स्थान मिळवले. अशा निर्मात्यांना अधिक चांगल्या प्रकारे सुविधा देण्यासाठी वेव्हज् इनक्यूबेटरचे नेटवर्क स्थापित करेल ज्यामध्ये समर्पित मार्गदर्शक आणि बीज भांडवल गुंतवणूकीसाठी गुंतवणूकदार असतील. वेव्हएक्स (WAVEX) अनोखे आहे कारण ते अशा कल्पनांना सुविधा देते ज्यांचे अद्याप मूर्त उत्पादन नाही, परंतु त्यांच्याकडे ठोस क्षमता आहे.
वेव्हज् 2025 मध्ये प्रकाशित प्रमुख ज्ञान अहवाल
माहिती आणि प्रसारण तसेच संसदीय कार्य राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी मुंबईतील वेव्हज परिषद 2025 मध्ये पाच महत्त्वपूर्ण अहवालांचे अनावरण केले. हे अहवाल भारताच्या समृद्ध माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेचे सर्वसमावेशक विहंगावलोकन करतात, त्यात आशय सामग्री निर्मिती, धोरणात्मक चौकट आणि थेट कार्यक्रम यांसारख्या प्रमुख पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
माध्यम आणि मनोरंजनावरील सांख्यिकीय पुस्तिका 2024 – 25:
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तयार केलेली ही सांख्यिकीय पुस्तिका भारताच्या माध्यम परिदृश्यातील वाढीचे कल, प्रसारण, डिजिटल माध्यम, चित्रपट प्रमाणन आणि सार्वजनिक माध्यम सेवांबाबत महत्त्वपूर्ण डेटा-आधारित अंतर्दृष्टी प्रदान करते. भविष्यातील धोरणनिर्मिती आणि उद्योग धोरणांसाठी अनुभवजन्य पुराव्यांवर आधारित आवश्यक माहिती उपलब्ध करून देते.
‘फ्रॉम कंटेंट टू कॉमर्स’ – बीसीजी
बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुपचा हा अहवाल भारताच्या सर्जक अर्थव्यवस्थेच्या विलक्षण वाढीवर प्रकाश टाकतो, त्यात 20 ते 25 लाख सक्रिय डिजिटल सर्जकांचा सहभाग आहे. या सर्जकांचा वार्षिक 350 अब्ज डॉलरहून अधिक खर्चावर प्रभाव पडतो, आणि 2030 पर्यंत हा आकडा 1 ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज आहे. हा अहवाल सर्जकांसोबत लघुकालीन व्यवहारांऐवजी दीर्घकालीन, प्रामाणिक भागीदारी निर्माण करण्यावर जोर देतो.
‘अ स्टुडिओ कॉल्ड इंडिया’ – अर्न्स्ट अँड यंग (Ernst & Young)
अर्न्स्ट अँड यंगचा हा अहवाल भारताला त्याच्या भाषिक विविधता, समृद्ध संस्कृती आणि तंत्रज्ञान कौशल्याच्या जोरावर जागतिक सामग्री केंद्र म्हणून चित्रित करतो. यामध्ये अॅनिमेशन आणि व्हीएफएक्स सेवांमध्ये भारताला 40 – 60 टक्के खर्चाचा फायदा आणि भारतीय ओटीटी सामग्रीसाठी वाढती आंतरराष्ट्रीय मागणी यावर प्रकाश टाकण्यात आला आहे, ज्यामुळे भारताची जागतिक सांस्कृतिक राजकीय भूमिका बळकट होत आहे.
कायदे आणि थेट कार्यक्रम क्षेत्रातील घडामोडी:
‘खैतान अँड कंपनी’च्या नव्या कायदेशीर मार्गदर्शक पुस्तिकेत इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आणि त्यासंदर्भातील नियमावली यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश असून, मिडिया क्षेत्रातील व्यावसायिकांना भारतातील नियामक चौकटीतून वाट काढण्यासाठी मदत मिळणार आहे. याशिवाय, भारतातील थेट कार्यक्रम क्षेत्रावर प्रकाशित करण्यात आलेल्या श्वेतपत्रिकेनुसार सध्या या क्षेत्राची 15 टक्के दराने वाढ होत असून, त्या पार्श्वभूमीवर, या वाढत्या उद्योगासाठी आधुनिक पायाभूत सुविधा आणि परवाना प्रक्रियेतील सुलभता अत्यावश्यक आहे असेही या श्वेतपत्रिकेत अधोरेखित करण्यात आले आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी: राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) – मुंबईत स्थापन होणारे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी क्षमता बांधणीत एक मैलाचा दगड ठरणार आहे. केवळ एव्हीजीसी-एक्सआर (AVGC-XR) क्षेत्राला समर्पित असणाऱ्या या संस्थेची औपचारिक स्थापना वेव्हज 2025 च्या तिसऱ्या दिवशी करण्यात आली. प्रसार माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीला जागतिक दर्जाच्या संस्थेच्या रुपात स्थापित करण्यासाठी वेव्हजने उद्योग संघटनांसोबत धोरणात्मक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी देखील केली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या धोरणात्मक सहयोगाला औपचारिकरित्या हिरवा झेंडा दाखवला. वैष्णव यांनी प्रसार माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात जागतिक स्तरावर आघाडीचे स्थान मिळवण्याच्या भारताच्या क्षमतेवर भर दिला. ज्याप्रमाणे आयआयटी आणि आयआयएम या संस्था तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन शिक्षणात आदर्श बनल्या आहेत त्याप्रमाणेच आयआयसीटी आपल्या क्षेत्रातील एक प्रमुख संस्था बनण्याच्या मार्गावर आहे असे वैष्णव यांनी सांगितले. दीर्घकालीन सहकार्यासाठी हात पुढे करणाऱ्या काही कंपन्यांमध्ये जिओस्टार, अॅडोब, गुगल आणि यूट्यूब, मेटा, वॅकॉम, मायक्रोसॉफ्ट आणि एनव्हीआयडीआयए यांचा समावेश आहे.
क्रिएट इन इंडिया चॅलेंज आणि क्रिएटोस्फीअर: सर्जनशील प्रतिभेचा जागतिक उत्सव
वेव्हज् 2025 चे एक प्रमुख आकर्षण म्हणजे क्रिएट इन इंडिया चॅलेंज (सीआयसी) पर्व 1 चा भव्य समारोप होता. या स्पर्धेत 60 हून अधिक देशांमधून सुमारे एक लाख जणांनी नोंदणी केली होती. वेव्हज अंतर्गत एक प्रमुख उपक्रम म्हणून सुरू करण्यात आलेल्या क्रिएट इन इंडिया चॅलेंजने (सीआयसी) ॲनिमेशन, एक्सआर, गेमिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, चित्रपट निर्मिती, डिजिटल संगीत आणि इतर क्षेत्रातील निर्मात्यांना वयोगट, भौगोलिक आणि विषयांच्या सीमा ओलांडून एकत्र आणले होते. या उपक्रमाने यात सहभागी झालेल्या प्रत्येक क्रिएटरला स्टार बनवले आहे.
32 कल्पक आणि भविष्यवेधी आव्हानांमधून 750 हून अधिक स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले होते. या स्पर्धेत 1100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सहभागींचा समावेश होता. या प्रतिभावान व्यक्तींनी वेव्हज्मधील समर्पित नवोन्मेषी विभाग असलेल्या क्रिएटोस्फीअरमध्ये आपले सृजन सादर केले. या व्यासपीठावर त्यांनी आपले प्रकल्प सादर केले तसेच संभाव्य सहयोगासाठी उद्योगातील धुरीणांशी ते संपर्क करू शकले.
क्रिएट इन इंडिया चॅलेंज केवळ एक स्पर्धा न राहता, विविधता, युवा ऊर्जा तसेच परंपरा आणि तंत्रज्ञानात रुजलेली कथाकथन साजरे करणारी एक चळवळ बनली आहे. 12 ते 66 वर्षे वयोगटातील अंतिम स्पर्धक तसेच सर्व भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकांच्या जोरदार सहभाग असलेल्या या उपक्रमात समावेशकता आणि आकांक्षा प्रतीत झाली होती. होती. क्रिएटोस्फीअर हे तळागाळातील नवोन्मेष, ड्रोन स्टोरीटेलिंग आणि भविष्यासाठी सज्ज आशय यासारख्या संकल्पनांसाठी जगासमोर येण्याची एक संधी देखील होती. क्रिएटोस्फीअर हे व्यासपीठ उद्याच्या सर्जनशील भारताची झलक दाखवणारे होते. “प्रवास आता सुरू झाला आहे,” हे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सीआयसीच्या पुरस्कार सोहळ्यात उच्चारलेले शब्द सार्थ आहेत आणि क्षितीजावरील भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्थेसारख्या उपक्रमांनी या गतीला अधिकच बळ मिळत आहे.
8 वे राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी संमेलन आणि राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी पुरस्कार
वेव्हज्चा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या आठव्या राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी संमेलनात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी देशभरातील 12 उत्कृष्ट सामुदायिक नभोवाणी केंद्रांना ‘राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी पुरस्कार’ देऊन गौरवले. डॉ. मुरुगन यांनी विजेत्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, हे राष्ट्रीय संमेलन भारतातील सामुदायिक माध्यमाच्या क्षेत्राला नवप्रवर्तन, समावेश आणि प्रभावाच्या माध्यमातून अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात विचारमंथन आणि सहकार्याची संधी निर्माण व्हावी या उद्देशाने देशभरातील 400 पेक्षा अधिक सामुदायिक नभोवाणी (सीआर) केंद्रांचे प्रतिनिधी एकाच मंचावर आले होते. सध्या देशात एकूण 531 सामुदायिक नभोवाणी केंद्र कार्यरत आहेत.
भारत मंडप– ‘कला ते कोड’ प्रवास
वेव्हज् 2025 मध्ये भारताची कथाकथन परंपरा ‘कला ते कोड’ या संकल्पनेतून उलगडणाऱ्या ‘भारत मंडप’ या अनुभवात्मक विभागाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मंडपामध्ये भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील तोंडी आणि दृश्य परंपरांपासून ते आधुनिक डिजिटल नवप्रवर्तनापर्यंतच्या उत्क्रांतीचे दर्शन घडवले गेले.
‘भारत मंडप’ने आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा आणि नव्या तंत्रज्ञान लाटेचा समतोल साधत भारताचा आत्मा उलगडला. वेव्हज 2025 च्या उद्घाटनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंडपाला भेट दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव तसेच अनेक मान्यवरांनीही भेट देऊन या मंडपाच्या सादरीकरणाचे कौतुक केले. मंडपामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली आणि लोक भारताच्या सांस्कृतिक खजिन्यांच्या शोधामुळे आश्चर्यचकित झाले.
भारताच्या सर्जनशील प्रवासाचा गौरव करणारे हा मंडप केवळ एक प्रदर्शन नव्हते, तर भारताला एका सर्जक राष्ट्राच्या रूपात मांडणारे प्रभावी माध्यम होते. या मंडपाने भारताची सांस्कृतिक खोली, कलात्मक उत्कर्ष आणि जागतिक कथाकथनात उद्योन्मुख नेतृत्व दाखवून दिले.
वेव्हज्चा समारोप – सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प
वेव्हज् 2025 ने सर्जनशीलता, व्यापार आणि सहयोग यांना एकत्र आणणारे जागतिक व्यासपीठ म्हणून एक उच्च दर्जा प्रस्थापित केला. दूरदृष्टीपूर्ण धोरणात्मक घोषणा, आंतरराष्ट्रीय करार, मजबूत व्यावसायिक व्यवहार आणि नवोपक्रम गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर वेव्हजने भारताच्या जागतिक सर्जनशील नेतृत्वाची भूमिका अधोरेखित केली. 77 देशांनी वेव्हज जाहीरनाम्याला पाठिंबा दिला. वेव्हज बाजार आणि वेव्हेक्स अॅक्सलरेटरचे यश यामुळे स्पष्ट झाले की, भारत नावीन्य, समावेश आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी यांच्या आधारावर भविष्य घडवत आहे. या ऐतिहासिक पहिल्या आवृत्तीच्या समारोपानंतर, वेव्हजने केवळ भारताची सर्जनशील क्षमता जगासमोर मांडली नाही, तर एक जागतिक चळवळ सुरू केली आहे — जी जगभरातील सर्जकांच्या आवाजाला प्रेरणा, गुंतवणूक आणि संधी देत राहील.
०००
सागरकुमार कांबळे/ससं/
TAGS
04 May, 2025
राज्य शासन आणि ग्लोबल मीडिया क्षेत्रातील भागीदारांमध्ये व्हेवज संमेलनाच्या माध्यमातून नवे पर्व
*नेटफ्लिक्स, मोशन पिक्चर आणि युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपच्या प्रमुखांबरोबर मुख्यमंत्र्यांची चर्चा*
मुंबई, दि. ४ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नेटफ्लिक्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे इंडिया व साउथ एशियाचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी देवराज सान्याल आणि मोशन पिक्चर असोसिएशनचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ल्स रिवकिन या दिग्गजांची भेट घेऊन माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील कौशल्य विकासासंदर्भात तसेच चर्चा केली.
राज्य शासन आणि आंतरराष्ट्रीय माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील प्रमुख संस्थांमध्ये झालेल्या भेटीमध्ये राज्याच्या सांस्कृतिक वारशाचा जागतिक स्तरावर प्रसार आणि कौशल्य विकासासाठी नवे मार्ग खुले होण्यासंदर्भात चर्चा झाली.
*आगामी पाच वर्षात मनोरंजन क्षेत्रात भारताला संधी - नेटफ्लिक्सचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सारंडोस*
नेटफ्लिक्सचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सारंडोस यांनी यावेळी भारताला आगामी पाच वर्षांत मनोरंजन क्षेत्रात मोठी संधी असून भारत एक महत्त्वाचा बाजार होणार असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रातील मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात कौशल्य विकासासाठी नेटफ्लिक्स आणि राज्य शासन यांच्यातील संभाव्य सहकार्याची चर्चाही यावेळी झाली. ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्ध कथा जगभर पोहचवण्यासाठी एकत्र काम करण्याच्या संधी विषयी यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि श्री. सारंडोस यांनी चर्चा केली. श्री सारंडोस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे कौतुक करत व्हेवज (WAVES) शिखर संमेलन आयोजित केल्याबद्दल केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले.
*व्हेवज संमेलन मनोरंजन उद्योगासाठी महत्त्वाचे - देवराज सान्याल*
दरम्यान, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे इंडिया व साउथ एशियाचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. देवराज सान्याल, अभिनेता-दिग्दर्शक व एक्सेल एंटरटेनमेंट चे संस्थापक फरहान अख्तर व सहसंस्थापक आणि निर्माते रितेश सिधवानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. व्हेवज (WAVES) संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करून
समाधान व्यक्त केले. तसेच हे संमेलन मनोरंजन उद्योगासाठी महत्त्वाचे ठरल्याचे यावेळी सांगितले.
*राज्यात जागतिक दर्जाचा स्टुडिओ उभारण्यासंदर्भात मोशन पिक्चर बरोबर चर्चा*
जागतिक पातळीवरील चित्रपट, टेलिव्हिजन आणि स्ट्रिमिंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मोशन पिक्चर असोसिएशनचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ल्स रिवकिन यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
श्री. रिवकिन यांनी 1913 मध्ये प्रदर्शीत झालेल्या
पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट 'राजा हरिशचंद्र' ची आठवण काढत भारताच्या समृद्ध चित्रपट परंपरेचा गौरव केला.
महाराष्ट्रमध्ये जागतिक दर्जाचे स्टुडिओ उभारण्यासाठी
सहकार्याबद्दल उभय मान्यवरांमध्ये चर्चा झाली. तसेच
निर्मात्यांसाठी प्रोत्साहन योजना व बौद्धिक संपदा हक्कांचे संरक्षण यावर लक्ष केंद्रित करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
वेव्हज (WAVES) संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला जागतिक मीडिया नकाशावर अधिक ठळकपणे अधोरेखित करण्यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी घेतलेल्या भेटीने महत्वाचे पाऊल पडले आहे.
0000
उद्योगांनी क्लाऊड सर्विसच्या माध्यमातून व्यवसाय जागतिक स्तरावर न्यावा – ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे व्यवसाय विकास प्रमुख मनोज पद्मनाभन यांचे आवाहन
‘स्टार्टअप्सच्या व्यवसाय वाढीसाठी क्लाऊड टेक्नॉलॉजीची मदत’ चर्चासत्र
मुंबई, दि. ४ : नवीन ‘स्टार्टअप्स’च्या व्यावसायिक यशासाठी त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य मिळण्यासंदर्भात ‘क्लाऊड सर्विस’ प्रणाली लाभदायक ठरू शकते. त्यामुळे नवीन उद्योगांनी क्लाऊड सर्विसच्या माध्यमातून आपला व्यवसाय-उद्योग कमी कालावधीत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘लोकल टू ग्लोबल’पर्यंत न्यावा, असे आवाहन ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे व्यवसाय विकास प्रमुख (माध्यम आणि करमणूक) मनोज पद्मनाभन यांनी केले.
‘स्टार्टअप्सच्या व्यवसाय वाढीसाठी क्लाऊड टेक्नॉलॉजीची मदत’ यासंदर्भात ‘वेव्हज २०२५’ या जागतिक परिषदेत ‘वेव्हजएक्स’ चर्चासत्र झाले. यावेळी ॲमेझॉन वेब सर्विसेसचे उद्योग विषयतज्ज्ञ महेश्वरन जी. यांनीही मार्गदर्शन केले.
आजच्या युगात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी उद्योगांना अनेक संधी आहेत. आपला कंटेंट चांगला असेल तर उद्योगांनी वेगवेगळ्या क्लाऊड सर्विसेसच्या सहाय्याने आपल्या क्षेत्राचा विस्तार करावा. त्यासाठी बाजारात ‘क्लाऊड सर्विसेस’च्या विविध प्रणाली उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून उद्योगांनी आपला कंटेंट आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवावा, असा सल्ला श्री. पद्मनाभन यांनी दिला.
श्री. महेश्वरन यांनी क्लाऊड सर्विसेसमध्ये असणाऱ्या प्रत्येक टप्प्याची माहिती दिली. त्यात सॉफ्टवेअर व अप्लायन्सेस, लिंक, मीडिया कनेक्ट, मीडया लाईव्ह, मीडिया कन्वर्ट, मीडिया पॅकेज, मीडिया टेलर, व्हिडिओ सर्विस, डेडलाईन थिंकबॉक्स, डेडलाईन क्लाऊड, ॲमेझॉन क्लाऊड फ्रंट, अमेझॉन एफएसएक्स, डीसीव्ही यांचा समावेश आहे. या टप्प्यांच्या माध्यमातून कंपनी ते ग्राहक अशी साखळी निर्माण करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
स्टार्टअपच्या प्रगतीसाठी इकोसिस्टीम तयार होत आहे. नवीन उद्योगांचा खर्च कमी करणे, त्यांना डेटा ॲनालिसिस उपलब्ध करून देणे, त्यांच्या कंटेंटचे मूल्यवर्धन करणे यासारख्या सुविधा उपलब्ध होत असून याचाही वापर नवीन स्टार्टअप यांनी करणे गरजेचे आहे, असे श्री. महेश्वरन यांनी सांगितले.
——- ०००——
संतोष तोडकर/विसंअ/
डिजिटल माध्यमातील प्रचार प्रसिद्धी मोहिमेसाठी अचूक डेटा आवश्यक – एम. ए. पार्थसारथी
‘डाटा ड्राइवेन इनसाईट अँड मेजरमेंट इन ॲडव्हर्टायझिंग’ परिसंवाद
मुंबई, दि. ४ : डिजिटल माध्यमातून प्रचार प्रसिद्धीसाठी योग्य डेटा (माहिती) असणे आवश्यक असून जाहिरात प्रकियेत डेटा केंद्रबिंदू आहे. कोणत्याही प्रसिद्धी मोहिमेसाठी अचूक डेटा असणे महत्त्वाचे आहे. अचूक डेटा मिळविण्यासाठी शोध घेणे, योग्य नियोजन, योजना आणि मूल्यमापन आवश्यक आहे, असे ग्रुप एम साऊथ एशियाचे मुख्य धोरण अधिकारी एम. ए. पार्थसारथी यांनी सांगितले.
जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘डाटा ड्राइवेन इनसाईट अँड मेजरमेंट इन ऍडव्हर्टायझिंग’ या विषयावर श्री. पार्थसारथी बोलत होते.
श्री. पार्थसारथी म्हणाले, सामजिक संशोधनातून माहिती संग्रहित करताना नमुना निवड पद्धती, जनगणना, सर्वेक्षण, संभाव्यतेवर आधारित, निश्चित माहिती, निवडक ग्राहकांवर आधारित माहिती घेणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे विविध डिजिटल माध्यमातून योग्य घटकांपर्यंत पोहोचणे सहज सोपे होते.
डेटाचा उपयोग आज केवळ माहिती मिळवण्यासाठी नाही, तर संपूर्ण जाहिरात प्रक्रियेचा शोध, नियोजन, अंमलबजावणी, आणि मोजमाप या सर्व टप्प्यांमध्ये केला जातो. सध्या शासकीय, खासगी क्षेत्रात जाहिरातीचे महत्व वाढले आहे. वयोगट, लिंग, आवडीनिवडी, ऑनलाइन वर्तन यावर आधारित जाहिरातीसाठी माहिती गोळा करणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहकासाठी डेटा गोळा करताना त्यांची स्पष्ट संमती आणि खात्री अत्यंत आवश्यक आहे, असेही श्री. पार्थसारथी यांनी सांगितले.
अचूक माहिती संकलित करणे गरजेचे
ग्राहक स्वतःहून वेगवेगळ्या ब्रँडला डेटा देतो. पण त्यांची संमती आवश्यक आहे. यात खरेदीची योजना, वैयक्तिक माहिती, आवडीनिवडी आणि संवादाचे माध्यम निवडण्यासारख्या बाबींचा समावेश होतो. ग्राहकांच्या थेट संवादातून माहिती संकलित केली जाते, दुसऱ्या कंपनीकडून डेटा विकत घेतला जातो. याची अचूक माहिती संकलित केली जाते.
०००
गजानन पाटील/ससं/
Subscribe to:
Posts (Atom)