28 October, 2025
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी डिबीटीव्दारे 181 कोटी 50 लाख रुपये निधी वितरित करण्यास मान्यता
• थेट खात्यावर 151 कोटी 78 लाख 82 हजार रुपयाचे अनुदान डीबीटीद्वारे जमा
• ई-केवायसी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी व ई-केवायसी करुन अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्याचे काम वेगाने सुरु करण्यात आले असून आतापर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी डिबीटीव्दारे 181 कोटी 50 लाख 7 हजार 791 रुपये निधी वितरित करण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती संगणकीय प्रणालीवर भरुन मान्यता देण्यात आली आहे. तर 1 लाख 97 हजार 98 शेतकऱ्यांच्या खात्यावर 151 कोटी 78 लाख 82 हजार 617 रुपये मदतीचे अनुदान डीबीटीद्वारे जमा करण्यात आली आहे. ई-केवायसी अभावी प्रलंबित शेतकरी लाभार्थ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी व ई-केवायसी करुन अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
जिल्ह्यात जून ते ऑगस्ट, 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शासनाने हिंगोली जिल्ह्यासाठी 231 कोटी 27 लाख 92 हजार 335 रुपयांची मदत मंजूर केली आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट निधी वितरीत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित तहसीलदारांनी 2 लाख 37 हजार 873 शेतकऱ्यांना 181 कोटी 50 लाख 7 हजार 791 रुपयांच्या निधी वितरित करण्यासाठीची माहिती संगणक प्रणालीवर भरुन डीबीटीद्वारे निधी वितरीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 1 लाख 97 हजार 98 शेतकऱ्यांच्या खात्यावर 151 कोटी 78 लाख 82 हजार 617 रुपयाची मदत डीबीटीद्वारे वितरीत करण्यात आली आहे. ई-केवायसी प्रलंबित असलेल्या 49 हजार 855 शेतकऱ्यांना 35 कोटी 27 लाख 8 हजार 615 रुपयाची मदत ई-केवायसी व ॲग्रीस्टॅक नोंदणी केल्यानंतर लगेच वितरीत करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील 34 हजार 462 शेतकऱ्यांना 28 कोटी 7 लाख 77 हजार 549, वसमत तालुक्यातील 48 हजार 260 शेतकऱ्यांना 31 कोटी 03 लाख 6 हजार 9 रुपये, हिंगोली तालुक्यातील 34 हजार 959 शेतकऱ्यांना 27 कोटी 63 लाख 3 हजार 973 रुपये, कळमनुरी तालुक्यातील 38 हजार 67 शेतकऱ्यांना 33 कोटी 10 लाख 38 हजार 558 आणि सेनगाव तालुक्यातील 41 हजार 350 शेतकऱ्यांना 31 कोटी 94 लाख 56 हजार 527 रुपयाची मदत त्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्रलंबित राहिलेले 35 कोटी 27 लाख 8 हजार 615 रुपयाचे अनुदान जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे.
राज्य शासनाने शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी केली आहे. त्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा होत आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणी नसणाऱ्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागत आहे. त्यामुळे सर्व संबंधित शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करुन घेऊन अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
**
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment