11 July, 2025
अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिक स्पर्धा
हिंगोली दि. 11(जिमाका) : राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिक स्पर्धा खरीप हंगाम 2025 साठी आयोजित करण्यात आल्या आहेत. खरीप हंगाम सन 2025 पिकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना केले आहे.
राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
*पिक स्पर्धेतील पिके*
खरीप पिकात ज्वारी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन या सहा पिकांचा समावेश आहे.
*पात्रता निकष*
स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व जमीन तो स्वतः कसत असणे आवशक्य आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
*कागदपत्रे*
विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन. 7/12, 8-अ उतारा. जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास). पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा. बँक खाते चेक, पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत.
*अर्ज करण्याची मुदत*
खरीप हंगामामध्ये पिकस्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख पुढील प्रमाणे राहील. मूग, उडीद पिकासाठी 31 जुलै 2025. ज्वारी, मका, तूर, सोयाबीन पिकासाठी 30 ऑगस्ट 2025 राहील. अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात यावी.
*स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क*
पिकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम ३०० रुपये राहील व आदिवासी गटासाठी रक्कम १५० रुपये राहील. सहभागी शेतकऱ्यांनी प्रवेश शुल्क स्वतः 0401 पिक संवर्धन 104 शेती क्षेत्रापासून प्राप्त जमा रक्कमा पीक स्पर्धा योजनेखालील जमा रक्कम शासकीय कोषागारात विहीत मुदतीत जमा करावी.
*बक्षिसाचे स्वरूप*
पहिले, दुसरे, तिसरे यानुसार तालुका पातळीवर 5 हजार, 3 हजार, 2 हजार त्याप्रमाणे जिल्हा पातळीवर 10 हजार, 7 हजार, 5 हजार तर राज्य पातळीवर 50 हजार, 40 हजार, 30 हजार रुपये बक्षिस सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस स्वरुपात दिले जाईल.
या योजनेबाबत अधिक माहितीसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागाचे www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा सबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन कृषि कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
00000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment