30 September, 2025

‘पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा’ — दानशूर नागरिकांनी मदत करावी - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली, दि. ३० (जिमाका) : राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक व जीवनावश्यक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी समाजातील सर्व दानशूर व्यक्ती, संस्था व नागरिकांना ‘पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा’ या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचविण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. आर्थिक मदत तसेच औषधे, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य इत्यादी स्वरुपातील मदत स्वीकारली जाणार आहे. जीवनोपयोगी वस्तू व अन्य साहित्य स्वरुपात मदत देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आपल्या जिल्ह्यातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 💰 आर्थिक मदतीसाठी बँक खात्याची माहिती पुढीलप्रमाणे : Account Name: Chief Minister's Relief Fund Account Number: 10972433751, IFSC Code: SBIN0000300 तसेच अधिक माहितीसाठी नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 9321103103 वर संपर्क साधावा. समाजातील सर्व घटकांनी एकजुटीने पुढे येऊन पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गुप्ता यांनी केले आहे. ******

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

*टंचाईच्या सर्व सवलती मिळणार, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य *आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको; बँकाना निर्देश मुंबई, दि. ३० : राज्य शासन पूरग्रस्ताच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. या भागातील शेतकरी, आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई प्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावी, असे निर्देशही बँकांना दिल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शेतकरी सध्या अडचणीत आहे. हे लक्षात घेऊन बँकांना वसुली थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पूरग्रस्त कुटुंबांना गहू-तांदूळ, डाळी व आवश्यक वस्तूंचे कीट वितरित करण्यात येत आहे. विहीर खचणे, शेतजमीन खरडून जाणे, अशा केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊन, झालेल्या नुकसानीवरही राज्य सरकार स्वतंत्र मदत करणार आहे. नुकसानीचे पंचनामे दोन-तीन दिवसांत पूर्ण होऊन पुढील आठवड्यात केंद्राला प्रस्ताव पाठवला जाणार आहे. मात्र, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने स्वतःच्या निधीतून मदत सुरू केली असून नंतर केंद्राकडून ती रक्कम ‘रिइम्बर्समेंट’च्या स्वरूपात मिळेल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली तरी आपत्ती व्यवस्थापन नियमावलीत ( मॅन्युअल) अशी व्याख्येचा समावेश नाही. असे असले तरी टंचाई निवारण काळातील निकषांप्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले. ******

कळमनुरी तहसीलमध्ये जनता दरबार • जनता दरबारामध्ये 687 प्रकरणे निकाली

हिंगोली (जिमाका), दि. 30 : छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस दिनांक 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनांक 02 ऑक्टोबरदरम्यान सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. या सेवा पंधरवाडा अंतर्गत टप्पा एक मध्ये पाणंद रस्ते विषयक मोहिम, टप्पा दोनमध्ये सर्वांसाठी घरे या उपक्रमासाठी पूरक उपक्रम आणि टप्पा 3 अंतर्गत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली नाविण्यपूर्व उपक्रमांतर्गत दि. 29 सप्टेंबर, 2025 रोजी कळमनुरी येथील तहसील कार्यालयामध्ये खासदार नागेश पाटील आष्टीकर, कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस दि. 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर, 2025 या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. या जनता दरबारामध्ये तालुक्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद, बालविकास प्रकल्प कार्यालयातील अशा विविध कार्यालयामार्फत देण्यात येणारे प्रमाणपत्रे, दाखले, कार्यारंभ आदेश, कीट, तडजोडीची प्रकरणे व अर्धन्यायिक, संविधानिक प्रकरणे निकाली असे एकूण 687 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये बँक तडजोड प्रकरणे 10, अर्धन्यायिक प्रकरणे 38, संजय गांधी निराधार योजनेचे 30, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे 40, वय व अधिवास, मिळकत प्रमाणपत्र, अल्पभूधारक, जात प्रमाणपत्र, स्थानिक वास्तव्य दाखला, शेतकरी दाखल्याची 224, रोहयो तुती लागवड व कोष निर्मिती प्रशासकीय मान्यतेची 10, नवीन शिधा पत्रिका 45, मग्रारोहयो वैयक्तीक लाभाचे कार्यारंभ आदेश 30, प्रधानमंत्री आवास योजना शहरी बांधकाम परवानगी आदेश 05, बेबी केअर कीट 07 आणि ऐनवेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांकडे तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने मांडलेल्या विविध 248 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. यावेळी कळमनुरीचे तहसीलदार जीवककुमार कांबळे यांच्यासह तालुक्यातील सर्व कार्यालयाचे विभाग प्रमुख , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. *****

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा

• राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन कार्यक्रम अंतर्गत निर्धारित निर्देशांकाची पूर्तता करावी हिंगोली (जिमाका), दि.30 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.चक्रधर मुंगल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नामदेव पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.सतीश रुणवाल, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, सहाय्यक संचालक (कुष्ठ रोग) डॉ. राहुल गीते, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पांडुरंग फोपसे, डॉ. सुनील देशमुख, डॉ.एन. आर. पवार, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गजानन चव्हाण, डॉ. गणेश जोगदंड, डॉ. संदीप काळे, डॉ. डी. व्ही. सावंत, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रशांत पुठावार, डॉ.निशांत थोरात यांची उपस्थिती होती. या बैठकीत प्रामुख्याने एनकॉस संस्थेचा स्वतंत्र आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन कार्यक्रम अंतर्गत निर्धारित केलेल्या निर्देशांकाची पूर्तता करावी. स्क्रीनींगचे प्रमाण वाढवावे. असांसर्गिक आजार कार्यक्रम अंतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेहा, कॅन्सर या आजाराचा सविस्तर आढावा घेऊन पोर्टलवर अपडेट करावा. या कामी कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधितावर कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच पूरग्रस्त गावामध्ये जलजन्य आजार व कीटकजन्य आजाराची साथ पसरू नये यासाठी दैनंदिन सर्वेक्षण करून वेळीच खबरदारी घ्यावी. पाणी नमुने, ब्लिचिंग पावडर नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात यावे, तापीचे रुग्ण वाढणार नाही याची काळजी घ्यावी, डेंग्यू, मलेरिया, अतिसार या सारख्या साथीचे आजार पसरू नये याची खबरदारी घ्यावी, अशा सक्त सूचना देण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी प्रसूतीचे प्रमाण वाढले पाहिजे, असांसर्गिक आजार कार्यक्रम, आरसीएच पोर्टलसह सर्व पोर्टल अपडेट करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिल्या. जिल्हा एड्स व नियंत्रण कक्षाचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची त्रैमासिक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हा एड्स व नियंत्रण कक्षाचा आढावा घेतला. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाने एचआयव्ही/एड्स आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून कौतुकास्पद कामगिरी केली असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डी. एस. चौधरी यांनी एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्ती व देहविक्रय करणाऱ्या महिलांना इतर सामाजिक लाभाच्या बाल संगोपन, संजय गांधी निराधार योजना, राशन कार्ड, बस पास, घरकुल योजना, मतदान कार्ड, इत्यादी योजनांचा लाभ देण्यात येत असून इतर नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याची माहिती दिली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नामदेव पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलाश शेळके, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पांडुरंग फोपसे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.देवेंद्र जायभाये, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ राहुल गीते, आरसीएच अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश कोठूळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, विहानच्या श्रीमती अलका रणवीर, सेतूचे इरफान कुरेशी यांच्यासह डापकूचे संजय पवार, श्रीमती टिना कुंदनाणी, आशिष पाटील आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ******

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतली राजकीय पक्ष प्रमुखांची बैठक, पदवीधर मतदारसंघासाठी मतदार याद्यांमध्ये नाव नोंदविण्याचे आवाहन

हिंगोली(जिमाका), दि.30: 1 नोव्हेंबर, 2025 या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये नाव असलेल्या पदवीधरांना पुन्हा नव्याने नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नव्याने मतदार नोंदणी करावी, यादृष्टीने राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. जिल्हाधिकारी यांच्या कक्षात पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी तसेच जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे प्रमुख, प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री.गुप्ता म्हणाले, पदवीधर नाव नोंदणीसाठी नमुना क्रमांक-18 भरुन देणे आवश्यक आहे. नमुना-18 सोबत पदवी प्रमाणपत्र अथवा गुणपत्रक सादर करणे आवश्यक आहे. तसेच अर्ज सादर करताना पदनिर्देशित अधिकाऱ्यास मूळ प्रमाणपत्र, गुणपत्रिका तपासणीसाठी दाखविणे आवश्यक आहे किंवा प्रमाणपत्र, गुणपत्रिकेची स्वसाक्षांकित किंवा सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेली प्रत सादर करणे आवश्यक आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या यादीतील विद्यापीठांतून 01 नोव्हेंबर, 2025 पूर्वी किमान 3 वर्षापूर्वी पदवीधर झालेला किंवा पदवीची समकक्ष पात्रता धारण करणारा पदवीधर पात्र राहील. अर्ज मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे प्रत्यक्षपणे किंवा टपालाने सादर करता येईल. एक गठ्ठा पद्धतीने सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. कुटुंबातील एका सदस्यास कुटुंबातील इतर सदस्याचा अर्ज सादर करता येईल. 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 36 मतदान केंद्र असून त्यावेळी 16 हजार 764 एवढे मतदार होते. मतदार नोंदणीसाठी विभागीय आयुक्त हे मतदार नोंदणी अधिकारी असणार आहेत. तर जिल्हाधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी असणार आहेत. कोणत्याही राजकीय पक्षामार्फत, पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी, नागरिक कल्याण संघटना आदींकडून एक गठ्ठा पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. कोणीही पात्र मतदार मतदार नोंदणी पासून वंचित राहणार नाही यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असेही ते म्हणाले. 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक मंगळवार दि. 30 सप्टेंबर 2025, वर्तमानपत्रातील जाहीर सूचना प्रथम पुनर्प्रसिद्धी बुधवार दि. 15 ऑक्टोबर, द्वितीय पुनर्प्रसिद्धी शनिवार दि. 25 ऑक्टोबर, नमुना क्रमांक 18 किंवा 19 द्वारे दावे स्वीकारण्याचा अंतिम दिनांक गुरुवार दि. 6 नोव्हेंबर, हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई गुरुवार, दि. 20 नोव्हेंबर, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी मंगळवार दि. 25 नोव्हेंबर, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी दि. 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक, पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे गुरुवार दि. 25 डिसेंबर व मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी मंगळवार दि. 30 डिसेंबर 2025 रोजी करण्यात येणार आहे. ******

29 September, 2025

ग्राम बाल संरक्षण समितीचे दोन दिवशीय प्रशिक्षण संपन्न

हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाची सेनगाव येथे ग्राम बाल संरक्षण समितीचे दोन दिवसीय प्रशिक्षण जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या प्रशिक्षणात सेनगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक मस्के आणि सेनगाव येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी विवेक वाकडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रशिक्षणाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संतोष दरपलवार यांनी केले. पोलिस निरीक्षक दीपक मस्के यांनी बालकांच्या संरक्षणासंदर्भात ग्राम बाल संरक्षण समितीमधील सदस्य, अंगणवाडी सेविका, शाळेचे मुख्याधापक, ग्रामसेवक, शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष, पोलीस पाटील यांना उद्देशून बोलताना जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी काळजीपूर्वक काम करणे गरजेचे आहे व यासाठी पोलीस विभागामार्फत शाळांमध्ये जाऊन विविध कायद्याची जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत असल्याची माहिती दिली. एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी विवेक वाकडे यांनी ग्राम बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावात बालकांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्यांचे कशाप्रकारे निरसण करण्यात यावे याबाबत मार्गदर्शन केले व सर्व अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींच्या बैठका घेऊन बालविवाह या प्रथेला आळा घालण्यासंदर्भात सूचना दिल्या. दोन दिवसीय प्रशिक्षणात विविध विषयांवर संबंधित तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे आणि सामाजिक कार्यकर्ता रेश्मा पठाण यांनी ग्राम बाल संरक्षण समितीचे कार्य व जबाबदाऱ्या, बाल संरक्षण यंत्रणा विषयी माहिती दिली. समुपदेशक सचिन पठाडे यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 यातील महत्त्वाच्या तरतुदी व अंमलबजावणी, बाल हक्क सुरक्षा अभियान मूलभूत हक्क व सामुदायिक जनजागृतीविषयी माहिती दिली. बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीब खान पठाण यांनी दत्तक विधान कायदेशीर प्रक्रिया व पात्रता याविषयी तर कायदा तथा परीविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 कायदेशीर बाबी व प्रतिबंध उपाय याविषयी माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे आणि लेखापाल शितल भंडारे यांनी महिला व बाल विकास विभागाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना, प्रतिपालकत्व योजना, अनाथ प्रमाणपत्र, बालगृह, निरीक्षण ग्रह आणि बालन्याय मंडळ व बाल कल्याण समिती यांच्या कार्यप्रणालीविषयी माहिती दिली, चाईल्ड हेल्पलाइनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे आणि समुपदेशक अंकुर पाटोडे यांनी चाईल्ड हेल्पलाइन 1098 याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कायदा तथा परीविक्षा अधिकारी ॲड.अनुराधा पंडित आणि लेखापाल शितल भंडारे यांनी केले. बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या प्रशिक्षणात तालुका संरक्षण अधिकारी नितीश मकासरे, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील क्षेत्रबाह्य कार्यकर्ता अनिरुद्ध घनसावंत, चाईल्ड हेल्प लाईन 1098 चे केस वर्कर राजरत्न पाईकराव, सुरज इंगळे यांनी परिश्रम घेतले. हे प्रशिक्षण जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. संतोष दरपलवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाले. *****

औंढा नागनाथच्या लोकसंचलित साधन केंद्राची 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

हिंगोली (जिमाका), दि. 29 : महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय हिंगोली अंतर्गत औंढा नागनाथ लोकसंचलित साधन केंद्राची 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 26 सप्टेंबर, 2025 रोजी औंढा नागनाथ येथील मारोती मंदिर सभागृहात उत्साहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी रेणुका ढगे या होत्या. तर उदघाटक म्हणून एचडीएफसीचे बँक व्यवस्थापक नागेश सरोदे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंझाडे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून एसबीआय आरसेटीच्या प्रशिक्षिका संगीता मुळे, जिल्हा प्रकल्प सल्लागार गजानन खिरोडकर, माविमचे लेखाधिकारी मुकुंद जहागीरदार, कन्सलटंट गजानन इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी आपल्या मार्गदर्शनात महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत विविध उपप्रकल्पाची माहिती देऊन जास्तीत जास्त कुटुंबांना प्रकल्पात सामावून घेऊन सर्व बचत गटातील महिलांचे उपजिविकेचे प्रश्न सोडवावे, असे आवाहन केले. तसेच जास्तीत जास्त निधी औंढा नागनाथ तालुक्यासाठी खेचून आणून महिलांचा सर्वांगीण विकास करण्याचा मानस असून सर्व बचत गटांनी पुढाकार घेऊन स्वतःचे व्यवसाय आणि उत्पादित मालाला लेबलिंग आणि पॅकेजिंग करून मालाला बाजारपेठ मिळवून देण्याचे काम माविमने हाती घेतल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात व्यवस्थापक विलास पंडित यांनी मागील वर्षाच्या आर्थिक व भौतिक प्रगतीचा अहवाल सादर केला. त्याचबरोबर चालू वर्षातील क्रेडीट प्लान, बिजनेस प्लान मंजुरीबाबत ठराव पारित केला. तसेच मागील वर्षाचे इतिवृत्त सभेपुढे वाचून कायम केले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागतानंतर संस्थेच्या अध्यक्षा रेणुकाताई ढगे यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते 13 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वार्षिक अहवाल पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. वार्षिक सर्वसाधारण सभेचे विषय संस्थेचे सचिव सुनिता नांगरे यांनी केले. यावर्षी सर्वसाधारण सभेत मान्यवरांच्या हस्ते मागील वर्षी जास्त कर्ज मिळालेल्या गटांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर तालुक्यातील उत्कृष्ट गट, व्यवसाय करणारे गट, व्यवसाय करणाऱ्या महिला, उत्कृष्ट ग्रामसंस्था, उत्कृष्ट सहयोगिनी, उत्कृष्ट सीआरपीचा मान्यवरांच्या हस्ते शाल, ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक सुनील चव्हाण यांनी केले.तसेच अध्यक्षीय समारोप सौ. रेणुका ढगे यांनी केले. तर आभार उपजीविका सल्लागार समाधान पाईकराव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीता चौरे, रेखा मुळे, अनिता गुंगे, मीरा तायडे, अनिता वायकोस, वंदना धवसे, सुनिता पुंडगे, पूजा कुरील, ललिता नरवाडे, वंदना धाबे, नसरीन शेख, शीतल मेश्राम यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व कार्यक्षेत्रातील एकूण 1 हजार 146 महिला सभासदांची उपस्थिती होती. ******

युध्दात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना सलाम करण्यासाठी शौर्य दिनाचे आयोजन - निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड

हिंगोली (जिमाका), दि. 29 : कारगील युध्दात भारतीय सैन्य दलाने आपले शौर्य दाखवून दिले आहे. आपल्या देशासाठी अनेक जवान शहीद झाले आहेत. या युध्दात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना सलाम करुन श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी शौर्य दिन साजरा करण्यात येत आहे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी आज केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्ह्यातील माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा आणि माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सय्यद मीर, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक कॅप्टन तुकाराम मुकाडे, संघपाल खराटे, कडूजी टापरे, बाबूराव जांबूतकर, पंडितराव हाके व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. भारतीय सैन्य दलाने दि. 29 सप्टेंबर, 2016 रोजी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जीकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्याचा खात्मा केला होता. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व माजी सैनिकांचा, माजी सैनिकांच्या विधवा यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी दि. 29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन साजरा करण्यात येतो. कार्यक्रमांच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन वीर जवान व भारतमातेच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी वीर माता, वीर पिता, माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. स्थानिक परिस्थितीनुसार आणि आदेशाचे पालन करुन अत्यंत साधेपणाने कार्यक्रम साजरा करण्यात आला. ******

जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक माहिती अधिकार दिवस साजरा

हिंगोली (जिमाका), दि. 29 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज जागतिक माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, सचिन जोशी, सी. आर. गोळेगावकर, संतोष बोथीकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच प्रशासकीय इमारतीतील विविध विभागाचे जन माहिती अधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आम्रपाली चोरमारे यांनी माहिती अधिकाराने पारदर्शकतेचे नवे पर्व सुरु केले आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीतून पारदर्शकता व उत्तरदायित्व तसेच खुल्या शासन व्यवस्थेसाठीची बांधिलकी व्यक्त करण्यासाठी 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जात असल्याचे सांगून माहिती अधिकार कायद्याची थोडक्यात माहिती सांगितली . *****

28 September, 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीचा घेतला आढावा

• तातडीच्या मदतकार्यांना गती देण्याचे निर्देश हिंगोली, दि. २८ (जिमाका) : हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे व पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून हिंगोली जिल्ह्यातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत जिल्ह्यातील नुकसान, मदतकार्यांची स्थिती, निधी वितरणाची प्रगती यासह उपाययोजनांबाबत सूचना केल्या. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास २३ मंडळांमध्ये पिकांचे, घरांचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे १० गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटला होता, मात्र आता पाणी हळूहळू ओसरत असून प्रशासनाकडून दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात येणार आहेत. संपर्क पुनर्स्थापनासाठी संबंधित यंत्रणांनी तात्काळ कामे हाती घेण्याचे निर्देश यावेळी दिले. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत पोहोचविण्याचे निर्देश दिले. यासाठी २३१.२७ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी वितरित करण्यात आला असून, या निधीचे वाटप पारदर्शक व त्वरीत होण्यासाठी संबंधित विभागांनी पूर्ण समन्वय ठेवावा, अशी सूचना त्यांनी केली. तसेच, कोणत्याही लाभार्थ्याला मदत मिळण्यात विलंब होऊ नये यासाठी विशेष पथके तयार करून गतीने कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले. अतिवृष्टीदरम्यान जिल्ह्यात १३ नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात आली आहे. याशिवाय, जनावरे गमावलेल्या शेतकऱ्यांपैकी काहींना मदत वाटप करण्यात आली असून, उर्वरित लाभार्थ्यांना मदत वितरणाचे काम वेगाने सुरू आहे. शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची पंचनामे करून मदत तातडीने वितरित करण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपत्तीग्रस्त भागातील नागरिकांचे पुनर्वसन, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी पुरवठा, अन्नधान्य वितरण यांसारख्या मूलभूत सेवांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश देत त्यांनी पाणीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने वैद्यकीय पथके तैनात करण्याचेही आदेश दिले. लोकहिताच्या दृष्टीने कोणतीही तडजोड न करता तातडीची मदत कार्यक्षमतेने व पारदर्शकतेने राबवावी. हिंगोली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतकार्यांना अधिक गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. *******

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 56 मिमी पाऊस

• जिल्ह्यातील 11 मंडळात अतिवृष्टी हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 55.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, वसमत तालुक्यात सर्वात जास्त 89.2 मि.मी. पाऊस झाला आहे. तर सेनगाव तालुक्यात सर्वात कमी 30 मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 30.1(989.7), कळमनुरी 82.8 (1244.4), वसमत 89.2 (1293.7), औंढा नागनाथ 38.5 (1191.2) आणि सेनगाव तालुक्यात 30 (896.3) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2025 ते 28 सप्टेंबर, 2025 पर्यंत सरासरी 1118.9 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 142.5 अशी आहे. कळमनुरी तालुक्यातील पाच व वसमत तालुक्यातील सहा अशा एकूण 11 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी व वाकोडी प्रत्येकी 70.3 मिमी, आखाडा बाळापूर व वारंगा मंडळात प्रत्येकी 103.3 मिमी, डोंगरकडा मंडळात 108.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. वसमत तालुक्यातील वसमत व हयातनगर मंडळात 128.8, आंबा 96.5, गिरगाव 65.3, टेंभुर्णी 76.8 व कुरुंदा मंडळात 88.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ******

27 September, 2025

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 66 मिमी पाऊस • जिल्ह्यातील 19 मंडळात अतिवृष्टी

हिंगोली (जिमाका), दि. 27 : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 66.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, वसमत तालुक्यात सर्वात जास्त 99.1 मि.मी. पाऊस झाला आहे. तर सेनगाव तालुक्यात सर्वात कमी 26.5 मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 66.3 (958.9), कळमनुरी 64.7 (1161.5), वसमत 99.1 (1203.9), औंढा नागनाथ 70.5 (1152.7) आणि सेनगाव तालुक्यात 26.5 (866.1) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2025 ते 27 सप्टेंबर, 2025 पर्यंत सरासरी 1062.8 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 136.3 अशी आहे. हिंगोली तालुक्यातील पाच, कळमनुरी तालुक्यातील तीन, वसमत तालुक्यातील सात व औंढा नागनाथ तालुक्यातील चार अशा एकूण 19 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यातील हिंगोली, सिरसम, बासंबा व माळहिवरा मंडळात प्रत्येकी 80 मिमी तर दिग्रस मंडळात 71.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी 103.8, वाकोडी 107 व डोंगरकडा मंडळात 70 मिमी पावसाची नोंद झाली आहे. वसमत तालुक्यातील वसमत व हयातनगर मंडळात 128.8, आंबा 112.3, गिरगाव 67.5, हट्टा 73, टेंभुर्णी 78.3 व कुरुंदा मंडळात 104.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा मंडळात 77.8, येहळेगाव 71.3, साळणा 66.3 व जवळा बाजार मंडळात 66.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ******

जिल्ह्यातील शाळांना आज सुटी जाहीर

हिंगोली, दि.२७ (जिमाका): हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट तर हिंगोली व इतर ४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आल्यामुळे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी जिल्ह्यातील शाळांना सुटी घोषित केली आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या निर्देशानुसार ही सुटी घोषित करण्यात येत असून, तसे आदेश त्यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक यांना दिले आहेत. हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आज शनिवार (दि.२७) रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. तसेच सदरील संदेश हा जिल्ह्यातील सर्व व्हॉट्स अँप ग्रूपवर तत्काळ पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबतचे पत्र पुन्हा देण्यात येईल, असेही त्यांनी या संदेशात म्हटले आहे. ******

26 September, 2025

दाटेगाव येथील गोबरधन प्रकल्पाचे शेखर रौंदळ यांच्या हस्ते उद्घाटन

हिंगोली (जिमाका), दि. 26 : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत स्वच्छता ही सेवा 2025 पंधरवाडा दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छोत्सव या थीम खाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आज हिंगोली तालुक्यातील दाटेगाव ग्रामपंचायत येथे गोबरधन प्रकल्पाचे राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदळ यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी, गटविकास अधिकारी विष्णू भोजे, माहिती शिक्षण व संवाद तज्ञ आशिष थोरात, विस्तार अधिकारी, सरपंच, ग्राम विकास अधिकारी, जिल्हा कक्ष तज्ञ राजेंद्र सरकटे, श्यामसुंदर मस्के, विष्णू मेहत्रे, प्रशांत कांबळे, रघुनाथ कोरडे, राधेश्याम गंगासागर, नंदकिशोर आठवले व शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी ताई, ग्रामपंचायत सदस्य, गावातील बचत गटातील महिला व ग्रामस्थ युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. याप्रसंगी दाटेगाव ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात आलेल्या सांडपाणी व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन, घंटागाडी शाळेतील स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, मंदिराची ठिकाणे, सार्वजनिक शौचालय व वैयक्तिक स्वच्छता, लोक सहभागातील कामे, स्मशानभूमीतील गार्डन याबाबत पाहणी करण्यात आली. तसेच एक झाड आईच्या नावाने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गावातील नागरिक, बचत गटातील महिला, युवक मंडळ, भजनी मंडळ, शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. ***

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत विशेष मोहीम

• सेवा पंधरवाड्यात विविध उपक्रमांद्वारे शेतरस्ते, शिव पाणंद रस्त्याची प्रकरणे निकाली हिंगोली, दि. 26 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानात जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उप अधीक्षक भूमी अभिलेख यांना शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने हिंगोली जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 539 ग्रामसभा घेऊन तसेच विविध समाज माध्यमाद्वारे या अभियानाची जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हास्तरावरुन बैठका घेऊन सेवा पंधरवाड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. तालुकास्तरावर क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी साधारणत: 15 प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले आहेत. आतापर्यंत जिल्हास्तरावर सेवा पंधरवाडा प्रारंभाच्या दिवशी मेळावे, शिबीर घेण्यात आहेत. तसेच तालुकास्तरावर गावामध्ये मेळावे, शिबीरे, शिवार फेरी तसेच जिल्ह्यातील सर्व विभागांनी त्या-त्या विभागाच्या योजना अभियान कालावधीत राबवून ते यशस्वी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पाणंद रस्ते मोहिमेत आतापर्यंत जिल्ह्याचा सांकेतांक देवून तालुकास्तरावरुन तालुक्यांना सांकेतांक दिला आहे. तसेच तालुक्यातील गावांना यशस्वी सांकेतिक नंबर देण्यात आला. तालुकास्तरावर गावांचे गाव नकाशावर रस्त्याचे वर्गीकरण करण्याबाबतची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावरुन सुरु आहे. सर्व रस्त्याच्या याद्या तयार करुन ग्रामसभेच्या ठरावात अंतिम मान्यता देणे, गाव नकाशावर नसलेले व अतिक्रमित रस्ते तहसिलदारांनी पाहणी करुन नोटीस देण्यात आली आहे व रस्ता अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात नाविण्यपूर्ण उपक्रमामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रलंबित महसूली प्रकरणे तसेच जनतेने दिलेल्या तक्रारी, अर्जानुसार जनता दरबार आयोजित करुन निराकरण करण्यात येत आहेत. तसेच प्रकरणे निकाली काढण्यात येत आहेत. तसेच तालुक्यातील सर्व गायरान जमिनीची केएमएल फाईल बनविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियान कालावधीमध्ये पहिल्या टप्प्यात शेतरस्ते व पाणंद रस्त्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घरे या उपक्रमांतर्गत घरे बांधण्यासाठी निर्बाधरित्या वाटपास उपलब्ध असलेली शासकीय जमीन कब्जेहक्काने प्रदान करणे, अतिक्रमण नियमाकुल करण्याबाबतचे प्रस्ताव मागविण्यात येऊन त्यावर तातडीने निर्णय घेणे तसेच तिसऱ्या टप्प्यात नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यातील प्रलंबित महसुली प्रकरणे, जनतेने दिलेल्या तक्रारी, अर्जानुसार जनता दरबार आयोजित करुन निवारण व निकाली काढण्यात येत आहेत. तसेच तालुक्यातील सर्व गायरान जमिनीची केएमएल फाईल बनविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत निस्तार पत्रक, वाजिब उल अर्जामध्ये हिंगोली तालुक्यातील 12 व सेनगाव तालुक्यातील 9 अशा एकूण 21 पाणंद रस्त्याच्या नोंदी घेण्यात आल्या. जिल्ह्यात हिंगोली तालुका 05, सेनगाव 5, कळमनुरी 9, वसमत 3 आणि औंढा नागनाथ तालुक्यातील 1 अशा 23 रस्ता अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात हिंगोली 11, सेनगाव 8, कळमनुरी 4, वसमत 4 आणि औंढा नागनाथ 4 अशी एकूण 31 शेतरस्त्याची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. जिल्ह्यात हिंगोली 296, सेनगाव 212, कळमनुरी 132, वसमत 306 आणि औंढा नागनाथ 156 असे एकूण 1102 शिवपाणंद रस्त्याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच शेतीवर जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करुन घेण्यासाठी हिंगोली 4, सेनगाव 2, कळमनुरी 5, वसमत 3, औंढा नागनाथ 2 अशा एकूण 16 जणांचे संमतीपत्र प्राप्त करुन घेण्यात आले आहेत. तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील 3 शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन करण्यात आले आहे. तसेच दि. 29 ऑगस्ट, 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार हिंगोली 03, सेनगाव 02, कळमनुरी 02, वसमत 02 आणि औंढा नागनाथ तालुक्यातील 02 अशा एकूण 11 रस्त्याची नोंद घेण्यात आली आहे, दि. 29 ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार वसमत तालुक्यातील 8 गावांची निवड करण्यात येवून त्या गावातील रस्त्यांचे सीमांकन करुन देण्याबाबत उप अधीक्षक भूमी अभिलेख यांना कळविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. *****

वसमत तहसीलमध्ये जनता दरबार

• प्राप्त अर्जावर संबंधित विभागांना तात्काळ कार्यवाही करण्याचे दिले निर्देश हिंगोली (जिमाका), दि. 26 : छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस दिनांक 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनांक 02 ऑक्टोबरदरम्यान सेवा पंधरवाडा अंतर्गत वसमत येथील तहसील कार्यालयामध्ये आमदार राजूभैया नवघरे व उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले. या जनता दरबारात सर्व प्राप्त अर्जावर नागरिकांचे म्हणणे ऐकूण घेण्यात आले. तसेच सर्व संबंधित विभागांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या जनता दरबार कार्यक्रमामध्ये नवीन लोकांना महसूल विभाग वसमत अंतर्गत ई रेशनकार्ड 06, मराठा कुणबी जातीचे दाखले 08, उत्पन्न प्रमाणपत्र, वय व अधिवास, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रत्येकी 5, आयुष्यमान भारत कार्ड, एमआरईजीएस वर्क ऑर्डर, 155 चे आदेश, जिवंत सातबारा आणि आदिवासी खातेदारांना वर्ग(2) सातबाराचे रूपांतर करून वर्ग (1) व तसेच मौजे म्हातारगाव, ता.वसमत येथे झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे ओढ्यास पूर येऊन केशव तुकाराम जाधव हे मयत झालेले आहेत. त्यांच्या वारस पत्नी श्रीमती कांताबाई केशव जाधव यांना आज 4 लाख रुपये जमा होण्याबाबतची सर्व प्रक्रिया बाबतची कागदपत्रे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी, औंढा नागनाथचे तहसीलदार हरीश गाडे, नायब तहसीलदार डी. जाधव, डॉ.विनोद डोणगावकर, गटविकास अधिकारी तोटावाड, मुख्याधिकारी आशुतोष चिंचोलकर, तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे तसेच सर्व विभागाचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते. या जनता दरबार कार्यक्रमास तालुक्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. ******

जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी नव उद्योजकांनी पुढे यावे -- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगवाढीसाठी नव उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत केले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कक्षात आज उद्योग विभागाच्या अडी-अडचणी एकाच छताखाली सोडविण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी उद्योजक, व्यापारी संघटना यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. एमआयडीसीच्या बाजूला असलेल्या नाल्यातून पावसाचे पाणी येत आहे. त्या नाल्याचे रुंदीकरण करुन पावसाचे पाणी रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच उद्योगाविषयी उद्योजकांच्या तक्रारी एक खिडकीद्वारे सोडविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक तथा नोडल अधिकारी यांच्याकडे आपले निवेदन सादर करावे, अशा सूचनाही दिल्या. या बैठकीस उद्योजक नितीन राठोर, प्रविण हेडा यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते. नगर पालिका क्षेत्रातील विविध विकास कामाचा जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा जिल्ह्यातील सर्व नगर पालिका, नगर पंचायतीतील दलितवस्ती सुधार योजना, नगरोत्थान योजना, घरावर सोलार पॅनल बसविणे, प्रत्येक घरात 5 वृक्षाची लागवड करणे, शहराचा पाणीपुरवठा, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजनेतील बांधकामाची परवानगी सर्वांना एकदाच देऊन बांधकाम परवानगीचे प्रकरणे आठवडाभरात निकाली काढावेत, असे सांगून प्रधानमंत्री आवास योजनेत मंजूर निवास, पूर्ण झालेली कामे, प्रगतीपथावरील कामे याच्या सद्यस्थितीचा तसेच शहरातील स्वच्छतेचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी आढावा घेऊन सूचना केल्या. सर्व नगर पालिकांना देण्यात आलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे. काम न करणाऱ्या नगर पालिकेवर कार्यवाही करावी, अशा सूचनाही श्री. गुप्ता यांनी यावेळी दिल्या. या बैठकीस नगरपालिका प्रशासनाचे प्रदीप जगताप, सर्व नगर पालिका, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झालेले सोलार पंपाची दसऱ्यापूर्वी दुरुस्ती करावी-जिल्हाधिकारी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झालेल्या सोलार पंपाचा आढावा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज घेतला. या नैसर्गिक आपत्तीमुळे नादुरुस्त झालेले सोलार पंप, पॅनल व इतर अनुषंगीक दुरुस्ती सोलार पंप पुरवठादारांनी दसऱ्यापूर्वी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आयोजित बैठकीत दिल्या. या बैठकीस महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेश चव्हाण, महाऊर्जाचे जिल्हा व्यवस्थापक प्रशांत गायकवाड यांच्यासह पुरवठादाराचे प्रतिनिधी उपस्थित होते. *****

25 September, 2025

अण्णासाहेब पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन

हिंगोली (जिमाका), दि. 25 : येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या कार्यालयात कै. अण्णासाहेब पाटील यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक बालाजी शिंदे यांनी उपस्थित लाभार्थ्यांना महामंडळाच्या योजनेची व त्यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. यावेळी महामंडळाचे लाभार्थी राम जाधव, पांडूरंग जगताप व अन्य लाभार्थी उपस्थित होते. *****

मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळण्यासाठी 'बाजार' संकल्पना राबवणार - शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

हिंगोली (जिमाका), दि. 25 : जिल्ह्यातील आदर्श शाळेमध्ये मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळण्यासाठी दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी बाजार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून ही बाजाराची संकल्पना संपूर्ण राज्यात राबवणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी आज शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. त्यावेळी बोलत होते. यावेळी आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, संदीप सोनटक्के, डायटचे प्राचार्य भानुदास पुटवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील शिक्षकांच्या अडचणी प्राधान्याने सोडवून त्या तात्काळ मार्गी लावाव्यात. सर्व भाषेच्या शाळेत मराठी भाषा शिकविणे बंधनकारक आहे. तसेच राष्ट्रगीत, राज्यगीत अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. याची जबाबदारी सर्वांची असून संबंधित अधिकाऱ्यांनी पडताळणी करावी. राज्यातील सर्व शाळांनी शाळा प्रवेशाचा उपक्रम उत्कृष्टपणे राबवला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत गोरगरिबांची मुले शिकत आहेत. त्यामुळे त्यांना शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात. यासाठी शासन सकारात्मक आहे. पुणे येथे झालेल्या दोन दिवशीय कार्यशाळेत मांडलेल्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. शासन शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी झुकते माप देत आहे. जिल्हा प्रशासनानेही जिल्हा वार्षिक व इतर निधीतून शाळेत शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, क्रीडांगण, रंगरंगोटी, वाचनालय, सुरक्षा भिंत यासह विविध भौतिक सुविधा उपलब्ध करुन जिल्ह्यात आदर्श शाळा निर्माण कराव्यात. सर्वांना सोबत घेऊन व लोकसहभाग घेऊन शाळेचा विकास करावा. तसेच माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य घ्यावे. यासाठी प्रत्येक दिवाळीत स्नेहसंमेलन आयोजित करुन त्यामध्ये गावातील नागरिक, पालक व माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करावे, अशा सूचना शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी दिल्या. जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देण्यासाठी निपुण महाराष्ट्र व राष्ट्रीय शिक्षण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी. येथील विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी त्यांना व्यावसायिक शिक्षण देण्याची गरज आहे. हिंगोली येथे मुलांना शेतीची माहिती होण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर सहली न्याव्यात. तसेच बँक, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद येथील कामकाजाची माहिती देण्यासाठी एक दिवसाची सहल नेण्याचा उपक्रम राबवावा. कल्पक शिक्षकांची बँक तयार करावी. येत्या काळात समितीच्या अध्यक्षासोबत बोलणार आहे. त्यासाठी शालेय समित्या गठीत कराव्यात आणि त्याचा विदा उपलब्ध करुन द्यावा. शाळेतील मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देण्यासाठी महिलांची टीम तयार करण्यात येणार आहे. पुढील वर्षापासून गुणवत्ता सुधारण्यासाठी चौथी आणि सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियानांतर्गत उत्तम दर्जाचे अन्न द्यावे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. त्यामुळे शिक्षकांनी या मुलांना प्रोत्साहन देत गांभीर्यपूर्वक योगदान द्यावेत. गावात प्रतिकूल परिस्थितीत विपरीत घटना झाल्यास त्या कुटुंबियाच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घ्यावी. तसेच येत्या 26 जानेवारीला देशभक्तीपर गीतांचा व कवायतीचा कार्यक्रम घ्यावा. याची तयारी आतापासूनच करावी, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिल्या. यावेळी हिंगोली तालुक्यातील इडोळी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील उपक्रमाची माहिती राजेश्वर पवार यांनी, मार्लापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमाची माहिती अरुण बैस यांनी तर गणेशवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती कुलदीप मास्ट या शिक्षकांनी दिली. या तीनही शाळेतील राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी कौतुक करुन त्यांचा सन्मान केला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यात 10 आदर्श शाळा निर्माण करण्यात येणार असून त्यासाठी वास्तू विशारदाकडून कामाचे डिझाईन तयार करुन त्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात निपुण 2.0 अंतर्गत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी वर्षातून चार शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहेत. तसेच 30 तासात मुलांना इंग्रजी शिकण्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचा वेळोवेळी आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. या बैठकीस सर्व गट शिक्षणाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते. *****

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे - शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

हिंगोली, दि.25 (जिमाका): हिंगोली जिल्ह्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. या परिस्थितीत शासन आपल्यासोबत असून आपणास मदत मिळवून देण्यासाठी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे आश्वासन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज आढावा बैठकीत दिले. येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा आढावा घेतला. त्यावेळी बोलत होते. यावेळी आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले, राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मागच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चा करुन सर्व मंत्र्यांना राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात भेटी देऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने आज हिंगोली जिल्ह्यातील कन्हेरगाव नाका, आंबाळा, माळहिवरा, भिरडा, डोंगरगाव पूल येथे भेट देऊन पाहणी केली आहे. यावर्षी राज्यावर मोठे नैसर्गिक संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यात ऑगस्टपर्यंत बाधित झालेल्या 3 लाख 8 हजार पात्र शेतकरी बांधवांचे 2 लाख 71 हजार 586 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यासाठी 231 कोटी रुपयांची मदत मंजूर झाली आहे. येत्या आठवडाभरात संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच चालू महिन्यात झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून त्याची मदत मिळविण्याची कार्यवाही प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. तसेच अतिवृष्टीमध्ये 13 लोक मयत झाले आहे. त्यांच्या वारसांना नियमानुसार सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच 237 पशुचीही तात्काळ मदत देण्यासाठी 2 कोटी 73 लक्ष रुपयांचा निधी लागणार आहे. आतापर्यंत 120 पशुपालकांना 35 लाख 88 हजाराचा निधी वितरीत करण्यात आला आहे. उर्वरित निधी लवकरच उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच वाहून गेलेल्या व शोध न लागलेल्या जनावरांचीही भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. नदीनाल्यांना पूर आल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत, सोलर पंप, रस्ते, विद्युत खांब, घरांचे नुकसान झाले आहे, याचेही पंचनामे करुन मदत देण्याची कार्यवाही करण्यात येईल. संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी, लोकप्रतिनिधींच्या भावना शासनापर्यंत पोहोचून आपणास मदत मिळवून देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. तसेच त्यांनी शिक्षण विभागाच्या सर्व शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांनी एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. *****

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केली अतिवृष्टीग्रस्त शेतीची पाहणी

* एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही- शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे * बांधावर जावून जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी साधला संवाद हिंगोली, दि.25 (जिमाका): जिल्ह्यात सतत पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे व आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी येथील शेतक-यांना आज दिला. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी आज जिल्ह्यातील हिंगोली आणि कळमनुरी तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जावून प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, जीवककुमार कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या पाहणी दौऱ्यात शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पाहणी दौऱ्यात शिक्षण मंत्री भुसे यांनी हिंगोली तालुक्यातील कन्हेरगाव नाका, आंबाळा, माळहिवरा, भिरडा, कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल या गावांना भेट दिली. तसेच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. शेतकऱ्यांनी शिक्षण मंत्री श्री. भुसे यांच्यासमोर सोयाबीन, कापूस, तूर आदी हानी झालेली पिके दाखवत वास्तव चित्र मांडले. शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी या वेळी प्रशासनाला राहिलेल्या क्षेत्राचे तातडीने पंचनामे पूर्ण करून शासनाला तातडीने अहवाल पाठविण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा देण्यासाठी शासनाच्या विविध मदत योजनांतर्गत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. "शेतकरी अडचणीत असताना शासन त्यांच्या पाठीमागे खंबीर पणे उभे आहे. त्यामुळे मदतीपासून कुणालाही वंचित ठेवले जाणार नाही," असेही त्यांनी सांगितले. *****

24 September, 2025

सांगलीचे तिरंगा गणेशोत्सव मंडळ राज्यात पहिले महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा निकाल जाहीर

• कळमनुरीच्या श्री ओमसाई गणेश मंडळाला मिळाला जिल्हास्तरावरील प्रथम पुरस्कार हिंगोली (जिमाका), दि. 24 : महागणेशोत्सवः महाराष्ट्राचा राज्य उत्सव अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या, 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025' चा निकाल जाहीर झाला असून सांगलीच्या विटा तालुक्यातील तिरंगा गणेशोत्सव मंडळाने राज्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. लातूरचे वसुंधरा वृक्षारोपी गणेशोत्सव राज्यात दुसरे व सुवर्णयोग तरुण मंडळ अ.नगर यांनी राज्यात तृतीय क्रमांक मिळविला. यासोबतच जिल्हास्तरीय प्रथम द्वितीय व तृत्तीय विजेत्यांची घोषणा करण्यात आली असून तालुकास्तरापर्यंत विस्तारित केलेल्या या स्पर्धेअंतर्गत विजेत्या झालेल्या तालुकास्तरीय मंडळांची घोषणा शासनाद्वारे करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील श्री ओमसाई गणेश मंडळाने प्रथम, आजेगाव येथील पर्यावरण पुरक गणेश मंडळाने द्वितीय तर हिंगोलीच्या राजा गणेश मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार, दि. 25 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला असून या समारंभात सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या शुभहस्ते विजेत्या मंडळांचा पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. सर्व विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी अभिनंदन केले आहे. *****

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

• जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी मागणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करा-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हिंगोली (जिमाका), दि. 24 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव आयपासवर अपलोड करुन तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, प्रदीप नळगीरकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी सुनिल बारसे यांच्यासह सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत विविध विकास योजनांचे निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करावेत. जिल्ह्यात आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच संगणक प्रयोगशाळा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. यासाठी अतिरिक्त लागणारा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले. यावेळी महावितरण, पोलीस, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग, मत्स्यव्यवसाय, कृषि विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, महिला व बालविकास विभाग, वन विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास, पाटबंधारे, शिक्षण, परिवहन विभाग यासह विविध विभागांच्या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत प्रशासनाच्या विविध विभागांना त्यांच्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. तसेच जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजनाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्हा विकास आराखड्यासाठी केंद्र व राज्यस्तरावरुन प्राप्त निधीची माहिती द्यावी जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त होणारा 25 टक्के निधी जिल्हा विकास आराखड्यातील कामावर खर्च करण्याच्या सूचना आहेत. त्याअनुषंगाने केंद्र व राज्यस्तरावरुन तसेच इतर माध्यमातून सर्व संबंधित विभागाना प्राप्त होणाऱ्या निधीचे लेखा शिर्ष व लेखा शिर्षाचे नाव यासह सन 2024-25 मध्ये प्राप्त निधीची माहिती 1 ऑक्टोबर पर्यंत उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिले. *******

औंढा नागनाथ तहसीलमध्ये जनता दरबार

• प्राप्त अर्जावर संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे दिले निर्देश हिंगोली (जिमाका), दि. 24 : छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवस (दि.17) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (दि.2)दरम्यान सेवा पंधरवाडा राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आज औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयात आमदार संतोष बांगर, उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले. यामध्ये महसूल विभागाची 16, पंचायत समितीची 04, औंढा ना. नगरपंचायतीची 03, राज्य परिवहन महामंडळाचे 02, भूमी अभिलेख, महिला व बालविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ व मंदिर प्रशासनाचे प्रत्येकी एक असे एकूण विविध विभागाचे 30 अर्ज प्राप्त झाले होते. सर्व प्राप्त अर्जावर सर्व नागरिकांचे म्हणणे ऐकण्यात आले. तसेच सर्व संबंधित विभागांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. यावेळी तालुक्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. या जनता दरबारामध्ये नवीन लोकांना ई-रेशनकार्ड, मराठा कुणबी जातीचे दाखले, आयुष्यमान भारत कार्ड, एमआरईजीएस वर्क ऑर्डर, 155चे आदेश, जिवंत सातबारा इत्यादीचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार हरीश गाडे, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, गटविकास अधिकारी गोपाळ कल्हारे, पोलीस निरीक्षक गणेश राहीरे, मुख्याधिकारी महादेव घुगसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. कलटेवाड, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक एस. के. इंगोले, तालुका कृषी अधिकारी एस. एस. संगेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गजानन चव्हाण, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी संगीता इंगळे, गटशिक्षणाधिकारी रवि कवडे, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. बी. टाक, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी बुचाले, महावितरणचे उपअभियंता रणवीर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता राजूसाहेब नरवाडे, आगार प्रमुख बांगर आदी उपस्थित होते. *****

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत विशेष मोहीम • सेवा पंधरवाड्यात विविध उपक्रमांचे आयोजन

हिंगोली, दि. 24 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानात जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उप अधीक्षक भूमी अभिलेख यांना शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने हिंगोली जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 280 ग्रामसभा घेण्यात आलेल्या आहेत. जिल्हास्तरावरुन आतापर्यंत दोन बैठका घेऊन सेवा पंधरवाड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. तालुकास्तरावर क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी साधारणत: 15 प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले आहेत. आतापर्यंत जिल्हास्तरावर सेवा पंधरवाडा प्रारंभाच्या दिवशी मेळावे, शिबीर घेण्यात आहेत. तसेच तालुकास्तरावर 5 तालुक्यातील 72 गावामध्ये मेळावे, शिबीरे घेण्यात आली आहेत. तसेच 691 गावांमध्ये शिवार फेरी झालेली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व विभागांनी त्या-त्या विभागाच्या योजना अभियान कालावधीत राबवून ते यशस्वी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पाणंद रस्ते मोहिमेत आतापर्यंत जिल्ह्याचा सांकेतांक देवून तालुकास्तरावरुन तालुक्यांना सांकेतांक दिला आहे. तसेच तालुक्यातील गावांना यशस्वी सांकेतिक नंबर देण्यात आला. तालुकास्तरावर गावांचे गाव नकाशावर रस्त्याचे वर्गीकरण करण्याबाबतची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावरुन सुरु आहे. सर्व रस्त्याच्या याद्या तयार करुन ग्रामसभेच्या ठरावात अंतिम मान्यता देणे, गाव नकाशावर नसलेले व अतिक्रमित रस्ते तहसिलदारांनी पाहणी करुन नोटीस देण्यात आली आहे व रस्ता अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात नाविण्यपूर्ण उपक्रमामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रलंबित महसूली प्रकरणे तसेच जनतेने दिलेल्या तक्रारी, अर्जानुसार जनता दरबार आयोजित करुन निराकरण करण्यात येणार आहेत. तसेच प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. तसेच तालुक्यातील सर्व गायरान जमिनीची केएमएल फाईल बनविण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियान कालावधीमध्ये पहिल्या टप्प्यात शेतरस्ते व पाणंद रस्त्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घरे या उपक्रमांतर्गत घरे बांधण्यासाठी निर्बाधरित्या वाटपास उपलब्ध असलेली शासकीय जमीन कब्जेहक्काने प्रदान करणे, अतिक्रमण नियमाकुल करण्याबाबतचे प्रस्ताव मागविण्यात येऊन त्यावर तातडीने निर्णय घेणे तसेच तिसऱ्या टप्प्यात नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यातील प्रलंबित महसुली प्रकरणे, जनतेने दिलेल्या तक्रारी, अर्जानुसार जनता दरबार आयोजित करुन निवारण व निकाली काढण्यात येणार आहेत. तसेच तालुक्यातील सर्व गायरान जमिनीची केएमएल फाईल बनविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत निस्तार पत्रक, वाजिब उल अर्जामध्ये हिंगोली तालुक्यातील 12 व सेनगाव तालुक्यातील 9 अशा एकूण 21 पाणंद रस्त्याच्या नोंदी घेण्यात आल्या. जिल्ह्यात हिंगोली तालुका 05, सेनगाव 5, कळमनुरी 9, वसमत 3 आणि सेनगाव तालुक्यातील 1 अशा 23 रस्ता अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात हिंगोली 11, सेनगाव 8, कळमनुरी 4, वसमत 4 आणि औंढा नागनाथ 4 अशी एकूण 31 शेतरस्त्याची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. जिल्ह्यात हिंगोली 296, सेनगाव 212, कळमनुरी 132, वसमत 306 आणि औंढा नागनाथ 156 असे एकूण 1102 शिवपाणंद रस्त्याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच शेतीवर जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करुन घेण्यासाठी हिंगोली 4, सेनगाव 2, कळमनुरी 5, वसमत 3, औंढा नागनाथ 2 अशा एकूण 16 जणांचे संमतीपत्र प्राप्त करुन घेण्यात आले आहेत. तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील 3 शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. **

शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे करणार हिंगोली जिल्हा अतिवृष्टी भागाचा दौरा

हिंगोली, दि. 24 (जिमाका) : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे हे उद्या दि. 25 सप्टेंबर, 2025 रोजी हिंगोली जिल्हा अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, (दि. 25) रोजी सकाळी 7 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाने वाशिम मार्गाने हिंगोलीकडे प्रयाण करणार आहेत. सकाळी 9.45 वाजता हिंगोली जिल्ह्यात आगमन आणि अतिवृष्टी भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. दुपारी 2 वाजता हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टी आढावा बैठकीस उपस्थित राहतील. त्यानंतर सोईनुसार हिंगोली येथून मालेगावकडे ते प्रयाण करतील. **

हिंगोली जिल्हा माहिती कार्यालय आता व्हॉट्सअँप चॅनेलवर

हिंगोली, दि. २४ (जिमाका) : जिल्ह्यातील विविध शासकीय योजना, उपक्रम, कार्यक्रम, ताज्या घडामोडी तसेच महत्त्वाच्या सूचना नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी हिंगोली जिल्हा माहिती कार्यालयाने अधिकृत व्हॉट्सअँप चॅनेल सुरू केले आहे. या चॅनेलद्वारे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या, शासन निर्णय, जनजागृतीविषयक उपक्रम, कृषी, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रातील माहिती सोप्या आणि जलद पद्धतीने नागरिकांना मिळणार आहे. जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आलेल्या QR कोड स्कॅन करून किंवा थेट व्हॉट्स अँपवरील ‘हिंगोली वार्ता’ या चॅनेलला नागरिक फॉलो करू शकतात. शासनाच्या योजना व सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या चॅनेलशी जोडून शासन व जिल्हा प्रशासनाशी संपर्क ठेवावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे. *****

23 September, 2025

राजधानी दिल्लीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता स्कॉच अवॉर्डने सन्मानित

* संजीवनी अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्याला देशात प्रथम क्रमांकाचा स्कॉच अवॉर्ड हिंगोली, दि. 23 (जिमाका) : हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पना व प्रेरणेने तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या ‘संजीवनी अभियाना'ला देशपातळीवर प्रथम क्रमांकाचा स्कॉच अवॉर्ड मिळाला आहे. या यशस्वी अभियानासाठी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांना 20 सप्टेंबर 2025 रोजी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषद आरोग्य विभाग व सामान्य रुग्णालय हिंगोली यांच्या माध्यमातून या अभियानांतर्गत महिलांमध्ये गर्भाशयमुख व स्तन कर्करोग तसेच पुरुष व महिलांमध्ये मुखकर्करोगाची तपासणी करण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय महिला दिन, दि. 8 मार्च 2025 रोजी आमदार तानाजी मुटकुळे व मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या हस्ते करण्यात आले होते. ग्रामीण व शहरी भागात आशा स्वयंसेविकांमार्फत 30 वर्षांवरील पुरुष व महिलांचे सर्वेक्षण करून संशयित रुग्णांची यादी तयार करण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी व तज्ञांच्या साहाय्याने तपासणी करून ‘लवकर निदान-लवकर उपचार’ ही संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात आली. या अभियानाचे संपूर्ण सादरीकरण जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी राष्ट्रीय स्तरावर केले होते. देशभरातून निवड झालेल्या अभियानांमध्ये हिंगोली जिल्ह्याच्या ‘संजीवनी अभियाना'ला प्रथम क्रमांक मिळून हिंगोलीने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. *****

सेवा पंधरवाड्यानिमित्त तहसील कार्यालयात जनता दरबार संपन्न

हिंगोली, दि. 23 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवाड्याच्या अनुषंगाने तहसील कार्यालय, हिंगोली येथे दि. 22 व 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जनता दरबार (लोक अदालत) आयोजित करण्यात आला. या जनता दरबारास आमदार तान्हाजी मुटकुळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, गट विकास अधिकारी विष्णू भोजे, नायब तहसीलदार तसेच महसूल सहाय्यक उपस्थित होते. यावेळी लाभ व सेवांचे वितरण आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. विविध विभागांतील एकूण प्रकरणांपैकी मोठ्या प्रमाणावर तातडीने निकाल लावण्यात आला. रस्ताविषयक 15 प्रकरणांपैकी 4 निकाली काढण्यात आली. कुळ कायद्यांतर्गत व म.ज.म.अ. कलम-155 मध्ये 11 प्रकरणांपैकी 7 निकाली काढण्यात आली. संजय गांधी योजना व इंगोयो – 13 पैकी 9 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. तसेच मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू पावलेल्यांचे वारस सावित्रीबाई विलास वामन, रा. माळसेलू यांना 10 लाख रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला. याशिवाय घरकुल मंजूर झालेल्या 300 लाभार्थ्यांना प्रत्येकी पहिल्या हप्त्याचे 15 हजार रुपये या प्रमाणे एकूण 45 लाख रुपये थेट संबंधितांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. ******

कळमनुरी येथील मागासवर्गीय वसतीगृहातील प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

हिंगोली (जिमाका), दि. 23 : सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी शहरात मागासवर्गीय मुलीचे शासकीय वस्तीगृह व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलाचे शासकीय वस्तीगृह अशी दोन वस्तीगृह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हिंगोली यांच्या नियंत्रणाखाली सुरू आहेत. शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षात ऑनलाईन पद्धतीने प्रवेशासाठी अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे. यासाठी अर्ज भरण्यासाठी 30 सप्टेंबर 2025 पर्यत मुदत वाढ देण्यात आली आहे. यासाठी कळमनुरी शहरातील मागासवर्गीय मुलीचे शासकीय वस्तीगृहात 100 विद्यार्थी प्रवेश क्षमता असून यामध्ये जुने प्रवेशित विद्यार्थी 92 आहेत. तर यावर्षी 8 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वस्तीगृहात 100 विद्यार्थी प्रवेश क्षमता असून यामध्ये जुने प्रवेशित विद्यार्थी 72 आहेत. तर यावर्षी 28 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या दोन्ही वस्तीगृहातील रिक्त असलेल्या 36 जागा सन-2025-26 मध्ये भरावयाच्या आहेत. वरील प्रमाणे रिक्त जागेसाठी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर मागासवर्गीय मुला-मुलींनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची प्रत आवश्यक कागदपत्रासह मागासवर्गीय मुलीचे शासकीय वस्तीगृह इंदिरानगर कळमनुरी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलाचे शासकीय वस्तीगृह मार्केट कमिटीच्या मागे कळमनुरी येथे जमा करण्यात यावे, असे आवाहन संबंधित वस्तीगृहाचे गृहपाल यांनी केले आहे. *****

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा

हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती, दिव्यांग व्यक्ती सल्लागार समिती, अपंग पुनर्वसन केंद्राची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गिता गुठ्ठे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे, महिला व बालविकास अधिकारी एस.आर. दरपलवार, पोलीस विभागाचे अधिकारी यांच्यासह सर्व बैठकीचे समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी जिल्हा दक्षता व समितीच्या बैठकीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अत्याचार पीडितांना अर्थसहाय्य देण्यासाठी प्राप्त प्रस्तावावर चर्चा करुन पात्र प्रकरणाला मंजुरी देण्यात आली. तसेच दोषारोपाची प्रलंबित प्रकरणे पोलीस विभागानी तातडीने निकाली काढावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या. तसेच सर्व शासकीय कार्यालयात व सार्वजनिक ठिकाणी सुगम्य करण्यासाठी दिव्यांगासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देणे, त्यांना विविध योजनेचा लाभ मिळवून देणे, शाळेतील विद्यार्थ्यांची नियमित तपासणी करुन दिव्यांग विद्यार्थी शोधणे व त्यांना योग्य उपचार उपलब्ध करुन देणे,आयुष्यमान भारत अंतर्गत दिव्यांगाना लाभ, युडीआयडी कार्ड देणे यासाठी सर्व संबंधित विभागानी नियोजन तयार करावे. अपंग पुनर्वसन केंद्राच्या लिफ्टच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्रादारावर कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या. यावेळी दिव्यांगाचे पालकत्व देण्याच्या प्रस्तावाला तसेच जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रासाठी थेरपीस्ट नेमण्यासाठी व त्याच्या अनुदानासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याबाबत बैठकीत मान्यता देण्यात आली. *****

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 15 मिमी पाऊस

• कुरुंदा व जवळा बाजार मंडळात अतिवृष्टी हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 15.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, औंढा नागनाथ तालुक्यात सर्वात जास्त 32.2 मि.मी. पाऊस झाला आहे. तर हिंगोली व सेनगाव तालुक्यात सर्वात कमी प्रत्येकी 2 मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 2.0 (888.3), कळमनुरी 12.5 (1087.8), वसमत 31.9 (1058), औंढा नागनाथ 32.2 (1071.3) आणि सेनगाव तालुक्यात 2.0 (830.1) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2025 ते 23 सप्टेंबर, 2025 पर्यंत सरासरी 980.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 129.1 अशी आहे. वसमत तालुक्यातील कुरुंदा व औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा या दोन मंडळात अतिवृष्टी झाली आहे. कुरुंदा मंडळात 65.3 मिमी तर जवळा बाजार मंडळात 66.3 मिमी प्रमाणे पावसाची नोंद झाली आहे. **

22 September, 2025

औंढा येथे बुधवारी जनता दरबाराचे आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. 22 : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत दि. 17 सप्टेंबर, 2025 ते दि. 2 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. त्यानुषंगाने जनतेचे शासकीय प्रश्न सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत बुधवार, दि. 24 सप्टेंबर , 2025 रोजी सकाळी 9 वाजता तहसील कार्यालय, औंढा नागनाथ येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबारामध्ये तालुक्यातील सर्व विभाग, शासकीय निमशासकीय कार्यालयातील कार्यालय प्रमुख यांना जनतेच्या विविध प्रकारचे तक्रारी अर्ज, नागरिकांच्या मागण्या निवेदने, अर्ज इत्यादींचा सतेच तालुकास्तरावरील प्रलंबित महसूलविषयक बाबी, संवैधानिक प्रकरणे, उपविभागीय अधिकारी वसमत कार्यालयातील अपील प्रकरणे इत्यादींचा निपटारा करण्यात येणार आहे. यासाठी औंढा नागनाथ तालुक्यातील जनतेनी आपली गाऱ्हाणे, अर्ज, निवेदन, तक्रारीबाबत उपस्थित राहावेत, असे आवाहन औंढा नागनाथचे तहसीलदार हरीश गाडे यांनी केले आहे. *****

बहिर्जी स्मारक महाविद्यालयात गुरुवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

हिंगोली (जिमाका), दि. 22 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर व वसमत येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने गुरुवार (दि. 25) रोजी बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमत येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात पुर्णा सहकारी साखर कारखाना लि. वसमत, कपीश्वर शुगर्स ॲन्ड केमिकल्स लि. जवळा बाजार ता. औंढा नागनाथ, ग्रोवस ऑटो इंडिया प्रा.लि.पुणे, आर्मस इंडिया प्रा.लि. वाळूज एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर, उत्कर्ष स्मॉल फायनांन्स बँक, इन्स्पायर कोचिंग क्लासेस हिंगोली, मुथ्थुट फायनान्स हिंगोली, भारत फायनान्स हिंगोली, स्वतंत्र मायक्रो फायनान्स हिंगोली, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली, धूत ऑटोमोटीव्ह सिस्टीम्स प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर, नवभारत फर्टीलायझर लि. छत्रपती संभाजीनगर, सक्षम शक्ती फाऊंडेशन अशा महाराष्ट्रातील नामांकित कंपन्या व हिंगोली जिल्ह्यातील शासनाचे विविध महामंडळ रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार 350 पेक्षा अधिक रिक्त पदे https://rojgar.mahaswyam.gov.in व www.ncs.gov.in या संकेतस्थळावर अधिसूचित केली आहेत. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करून ऑनलाईन अर्ज करावे. तसेच स्वत: मूळ कागदपत्रांसह बहर्जी स्मारक महाविद्यालय, मुडी रोड, बहिर्जी नगर, वसमत येथे गुरुवार, (दि. 25) रोजी सकाळी 10 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे. ******

वसमत येथे शुक्रवारी जनता दरबाराचे आयोजन

• नागरिकांनी लेखी स्वरुपात अर्ज, तक्रारी सादर करावेत हिंगोली (जिमाका), दि. 22 : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत दि. 17 सप्टेंबर, 2025 ते दि. 2 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने हिंगोली जिल्ह्यात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. वसमत विधानसभा मतदार संघातील जनतेचे शासकीय प्रश्न सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व विधानसभा सदस्य यांच्या उपस्थितीत शुक्रवार, दि. 26 सप्टेंबर , 2025 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय, वसमत येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. वसमत विधानसभा मतदार संघातील वसमत व औंढा तालुक्यातील नागरिकांनी कोणत्याही शासकीय कार्यालयाकडे काम प्रलंबित असल्यास अथवा अडीअडचणी असल्यास त्याबाबत दि. 26 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता जनता दरबार, जनतेच्या शासकीय प्रश्नाचे निरासरण करण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने वसमत येथे एक खिडकी कार्यान्वित करण्यात आली आहे. या ठिकाणी दि. 19 ते 25 सप्टेंबर, 2025 या कालावधीत नागरिकांचे अर्ज, तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच दि. 26 सप्टेंबर, 2025 रोजी प्रत्यक्ष अर्ज, तक्रारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. नागरिकांनी आपले लेखी स्वरुपात अर्ज, तक्रारी अर्ज सादर करावेत, असे आवाहन वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले आहे. ******

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 15 मिमी पाऊस

हिंगोली (जिमाका), दि. 22 : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 15.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, कळमनुरी तालुक्यात सर्वात जास्त 27.6 मि.मी. पाऊस झाला आहे. तर सेनगाव तालुक्यात सर्वात कमी 0.1 मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 3.3 (883.9), कळमनुरी 27.6 (1070.5), वसमत 26.9 (1023.5), औंढा नागनाथ 21.5 (1039.1) आणि सेनगाव तालुक्यात 0.1 (823.8) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2025 ते 22 सप्टेंबर, 2025 पर्यंत सरासरी 962.2 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 127.6 अशी आहे. ******

20 September, 2025

हिंगोली येथे अमृत मेळावा उत्साहात संपन्न

हिंगोली (जिमाका), दि. 20 : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत आयोजित केलेला अमृत मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या अमृत मेळाव्याचे येथील गायत्री भवनामध्ये आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास विभागीय व्यवस्थापक दीपक जोशी तसेच कौशल्य विभागाचे योगेश जोशी यांची विशेष उपस्थिती होती. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना दीपक जोशी यांनी अमृतपेठ, अमृतवर्ग, व्याज परतावा योजना, स्वयंरोजगार संधी तसेच प्रशिक्षणाशी संबंधित विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. या योजनांचा प्रत्यक्ष लाभ कसा मिळविता येईल याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच मेळाव्यातील इतर मान्यवरांनी या उपक्रमाचे आयोजन हे समाज प्रबोधन व स्वावलंबनाकडे नेणारे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मत व्यक्त केले. या मेळाव्यात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, एमकेसीएल, जिल्हा उद्योग केंद्र आदी संस्थांचे माहितीपर स्टॉल व प्रदर्शने लावण्यात आले होते. यावेळी मान्यवरांचे स्वागत जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत धोत्रे व उपव्यवस्थापक संजय मेथेकर यांनी केले. शेवटी अमृत सखी सौ. दिपाली कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले. ******

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 21 मिमी पाऊस

• सेनगाव, गोरेगाव व आजेगाव या तीन मंडळात अतिवृष्टी हिंगोली (जिमाका), दि. 20 : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 21.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सेनगाव तालुक्यात सर्वात जास्त 41.1 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी 9.2 मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 20.6 (879.5), कळमनुरी 23.3 (1041.8), वसमत 9.2 (993.3), औंढा नागनाथ 11.9 (1017.8) आणि सेनगाव तालुक्यात 41.1 (821.5) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2025 ते 20 सप्टेंबर, 2025 पर्यंत सरासरी 945.1 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 127.1 अशी आहे. सेनगाव तालुक्यातील सेनगाव, गोरेगाव व आजेगाव या तीन मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या तीनही मंडळात प्रत्येकी 66.3 मिमी प्रमाणे पावसाची नोंद झाली आहे. ******