24 September, 2025
जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत विशेष मोहीम • सेवा पंधरवाड्यात विविध उपक्रमांचे आयोजन
हिंगोली, दि. 24 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे.
या अभियानात जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उप अधीक्षक भूमी अभिलेख यांना शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत.
त्याअनुषंगाने हिंगोली जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 280 ग्रामसभा घेण्यात आलेल्या आहेत. जिल्हास्तरावरुन आतापर्यंत दोन बैठका घेऊन सेवा पंधरवाड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. तालुकास्तरावर क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी साधारणत: 15 प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले आहेत.
आतापर्यंत जिल्हास्तरावर सेवा पंधरवाडा प्रारंभाच्या दिवशी मेळावे, शिबीर घेण्यात आहेत. तसेच तालुकास्तरावर 5 तालुक्यातील 72 गावामध्ये मेळावे, शिबीरे घेण्यात आली आहेत. तसेच 691 गावांमध्ये शिवार फेरी झालेली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व विभागांनी त्या-त्या विभागाच्या योजना अभियान कालावधीत राबवून ते यशस्वी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
पाणंद रस्ते मोहिमेत आतापर्यंत जिल्ह्याचा सांकेतांक देवून तालुकास्तरावरुन तालुक्यांना सांकेतांक दिला आहे. तसेच तालुक्यातील गावांना यशस्वी सांकेतिक नंबर देण्यात आला. तालुकास्तरावर गावांचे गाव नकाशावर रस्त्याचे वर्गीकरण करण्याबाबतची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावरुन सुरु आहे. सर्व रस्त्याच्या याद्या तयार करुन ग्रामसभेच्या ठरावात अंतिम मान्यता देणे, गाव नकाशावर नसलेले व अतिक्रमित रस्ते तहसिलदारांनी पाहणी करुन नोटीस देण्यात आली आहे व रस्ता अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात नाविण्यपूर्ण उपक्रमामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रलंबित महसूली प्रकरणे तसेच जनतेने दिलेल्या तक्रारी, अर्जानुसार जनता दरबार आयोजित करुन निराकरण करण्यात येणार आहेत. तसेच प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. तसेच तालुक्यातील सर्व गायरान जमिनीची केएमएल फाईल बनविण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या अभियान कालावधीमध्ये पहिल्या टप्प्यात शेतरस्ते व पाणंद रस्त्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घरे या उपक्रमांतर्गत घरे बांधण्यासाठी निर्बाधरित्या वाटपास उपलब्ध असलेली शासकीय जमीन कब्जेहक्काने प्रदान करणे, अतिक्रमण नियमाकुल करण्याबाबतचे प्रस्ताव मागविण्यात येऊन त्यावर तातडीने निर्णय घेणे तसेच तिसऱ्या टप्प्यात नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यातील प्रलंबित महसुली प्रकरणे, जनतेने दिलेल्या तक्रारी, अर्जानुसार जनता दरबार आयोजित करुन निवारण व निकाली काढण्यात येणार आहेत. तसेच तालुक्यातील सर्व गायरान जमिनीची केएमएल फाईल बनविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
या अभियानांतर्गत आतापर्यंत निस्तार पत्रक, वाजिब उल अर्जामध्ये हिंगोली तालुक्यातील 12 व सेनगाव तालुक्यातील 9 अशा एकूण 21 पाणंद रस्त्याच्या नोंदी घेण्यात आल्या. जिल्ह्यात हिंगोली तालुका 05, सेनगाव 5, कळमनुरी 9, वसमत 3 आणि सेनगाव तालुक्यातील 1 अशा 23 रस्ता अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात हिंगोली 11, सेनगाव 8, कळमनुरी 4, वसमत 4 आणि औंढा नागनाथ 4 अशी एकूण 31 शेतरस्त्याची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. जिल्ह्यात हिंगोली 296, सेनगाव 212, कळमनुरी 132, वसमत 306 आणि औंढा नागनाथ 156 असे एकूण 1102 शिवपाणंद रस्त्याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच शेतीवर जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करुन घेण्यासाठी हिंगोली 4, सेनगाव 2, कळमनुरी 5, वसमत 3, औंढा नागनाथ 2 अशा एकूण 16 जणांचे संमतीपत्र प्राप्त करुन घेण्यात आले आहेत. तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील 3 शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
**
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment